Giriraj Singh On Partition Mistake : फाळणीच्या वेळी मुसलमानांना भारतात राहू देणे, ही सर्वांत मोठी चूक !

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे विधान !

नवी देहली – धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली आणि तरीही मुसलमानांना येथे रहाण्याची अनुमती मिळाली, ही सर्वांत मोठी चूक होती. ही चूक झाल्यानेच तौकीर रझासारखे लोक येथे राहिले आहेत आणि त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. अशांना धडा शिकवणे आवश्यक आहे, असे विधान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले. बरेली (उत्तरप्रदेश) येथे इत्तेहादे मिल्लत कौन्सिलचे अध्यक्ष मौलाना तौकीर रझा २३ हिंदु तरुण आणि तरुणी यांचे धर्मांतर करून त्यांचा विवाह करून देण्याची घोषणा केली होती. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्यांनी वरील विधान केले. गिरिराज सिंह यांनी तौकीर रझा यांना चेतावणी दिली की, हिंदूंची परीक्षा घेऊ नका. हिंदूंच्या भावनांचा लवकरच स्फोट होईल.

गिरिराज सिंह

सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोटित मुसलमान महिलेला पोटगी देण्याचा निर्णय दिला. त्याचा संदर्भ देत गिरिराज सिंह यांनी ‘या प्रकरणी ममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि अखिलेश यादव गप्प का आहेत ?’, असा प्रश्‍न विचारला. गिरिराज सिंह म्हणाले की, ममता बॅनर्जी बंगालचा बांगलादेश आणि पाकिस्तान बनवण्याच्या सिद्धतेत आहेत. ममता बॅनर्जी यांचा हिंदूंवर विश्‍वास नाही. आता देशात कोणतेही नवीन राज्य निर्माण झाल्यास ते मुसलमान राज्य केले जाईल.