मौजे शिळ (जिल्हा ठाणे) येथे महिलेवर सामूहिक बलात्कार आणि तिची हत्या !

प्रतिकात्मक चित्र

ठाणे – मौजे शिळ गावात एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना १२ जुलै या दिवशी उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (६२), संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (४५) आणि राजकुमार रामफेर पांडे (५४) यांना अटक केली आहे.

घरातील वादविवादामुळे मानसिक तणावात असलेली ही महिला या परिसरात आली होती. या तिघांनी भांगेच्या गोळ्या मिसळलेला चहा देऊन तिचा अपलाभ उठवला. या महिलेला शुद्ध आल्यानंतर तिने आरडाओरडा करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु आरोपींनी तिला मारहाण करून तिचे डोके भूमीवर आपटून गळा दाबून तिची हत्या केली.

एका व्यक्तीने महिलेचा मृतदेह दिसल्याचे पोलीस ठाण्यात कळवले. नवी मुंबई येथील एन्.आर्.आय. पोलीस ठाण्यात ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार प्रविष्ट करण्यात आल्याने तिची ओळख पटली. आरोपींनी घोळ गणपति मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची केबल तोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे आरोपींना शोधले.

संपादकीय भूमिका :

महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी नीतीमान प्रजा हवी. नीतीमान प्रजा निर्माण होण्यासाठी धर्मशिक्षणाचा प्रसार करण्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्रातच हे शक्य होईल !