सातत्याने  येणार्‍या पुराच्या नियंत्रणासाठी ईशान्य भारतात ५० मोठे तलाव निर्माण करा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आदेश

नवी देहली – ईशान्य भारतात किमान ५० मोठे तलाव उभारण्यात यावेत, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. तलावांद्वारे ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी या तलावांमध्ये वळवता येईल आणि साठवता येईल. यामुळे अल्प खर्चात कृषी, सिंचन आणि पर्यटन विकास, तसेच पूरस्थिती हाताळण्यासही साहाय्य होईल, असे त्यांनी सांगितले.

पावसाळ्यातील पूर व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत शहा यांनी पूर आणि पाणी व्यवस्थापनासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अर्थात् इस्रोच्या उपग्रहांनी काढलेल्या छायाचित्रांचा वापर करण्याची सूचनाही यंत्रणांना दिली. ब्रह्मपुत्रा नदीला वारंवार येणारा पूर ही आसाम आणि ईशान्य भारताची प्रमुख समस्या आहे.