‘बिंदूदाबन’ – आपत्काळासाठी संजीवनी असलेली एक चिकित्सापद्धत !

महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधे प्रत्यक्ष जाऊन डॉ. दीपक जोशी बिंदूदाबन शिबिरे घेत आहेत. आपत्काळात आपल्याला औषधेही मिळणार नाहीत आणि मिळाली, तरी ती पुष्कळ महाग मिळतील, उदा. कोरोना महामारीच्या काळामध्ये ‘रेमडेसिविर’ हे इंजेक्शन ७०० ते ८०० रुपये किमतीचे असूनही ते एक ते दीड लाखाला  विकले गेले’, हे आपण अनुभवलेले आहे. तसेच ‘आपत्काळात आपल्याला वैद्य मिळतील कि नाही आणि मिळाले, तरी आपल्याला घराबाहेर पडता येईल का ?’, ते आपण सांगू शकत नाही’, हेही आपण कोरोना महामारीच्या काळात अनुभवले. अशा वेळी आपल्याला होणार्‍या शारीरिक त्रासांवर ‘बिंदूदाबन उपचार’, ही संजीवनी ठरणार आहे.

ठाणे येथे २ ते ४ जून २०२३ या कालावधीत पहिले बिंदूदाबन शिबिर पार पडले. या शिबिरात ‘विविध शारीरिक त्रास असणार्‍या साधकांवर त्यांच्या त्रासांच्या स्वरूपाप्रमाणे आवश्यक असे बिंदूदाबन, मणक्यांचे उपाय आणि सरकलेली नाभी मूळ स्थानावर आणणे’, असे उपाय करण्यात आले. या उपायांनी साधकांच्या वेदना न्यून होऊन त्यांना बराच लाभ झाला. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीने आपत्काळासाठी बिंदूदाबन का शिकायला सांगितले आहे ?’, त्याचे महत्त्व या शिबिरातून माझ्या लक्षात आले. या शिबिरात बिंदूदाबन उपचार केलेल्या रुग्ण साधकांना आणि उपचार करणार्‍या साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. – डॉ. दीपक जोशी

डॉ. दीपक जोशी

१. बिंदूदाबन उपचार करून घेतलेल्या रुग्ण साधकांना आलेल्या अनुभूती

१ अ. पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या समष्टी संत, वय ५४ वर्षे), ठाणे

१. ‘मला मान आणि पाठ यांचे दुखणे आहे. कुठल्याही स्थितीत बसले, तरी मला वेदना व्हायच्या. शिबिरात उपचार झाल्यानंतर माझी मान मोकळी झाली आणि वेदनाही नाहीशा झाल्या.’

१ आ. सौ. ज्योती कांबळे, बोईसर, जिल्हा पालघर.

१ आ १. कमरेपासून दोन्ही तळपायांपर्यंत तीव्र वेदना आणि ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण अल्प असल्याने अशक्तपणासारख्या त्रासांवर बिंदूदाबन उपाय होणे : ‘मला गेल्या ८ – १० वर्षांपासून कमरेपासून दोन्ही तळपायांपर्यंत तीव्र वेदना होत आहेत. त्यासह ओटीपोटात दुखते आणि माझ्या शरिरातील ‘हिमोग्लोबिन’चे प्रमाण अल्प असल्याने मला पुष्कळ अशक्तपणाही असतो. यावर मी वेळोवेळी औषधोपचारही करत आले आहे; मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. याचा परिणाम घरातील कामे आणि सेवा या दोन्हींवरही होतो.

१ आ २. उपचार झाल्यावर पायाचा त्रास पूर्ण थांबणे : बिंदूदाबन शिबिरात माझ्यावर उपचार करण्यात आले. शिबिराला येण्याच्या आदल्या दिवशी उजव्या पायाच्या नसा दुखू लागल्याने पायातून आणि कमरेच्या खाली पुष्कळ वेदना वाढल्या होत्या. त्याही स्थितीत मी उपचारांसाठी गेले. उपचार झाल्यावर पायाचा त्रास पूर्ण थांबला आणि चालतांनाही माझा पाय दुखत नव्हता.

१ आ ३. ‘वेदनाशामक गोळी घेऊन जशा वेदना थांबतात’, तशी गोळी न घेता वेदनारहित स्थिती अनुभवता येणे : मला हे सर्व अद्भुत वाटले. डॉ. जोशींनी केलेल्या उपचारांनी काही मिनिटांतच मला होणार्‍या तीव्र वेदना थांबल्या होत्या. पुढील दोन दिवस मला पुष्कळ उत्साह जाणवत होता. वेदनारहित स्थिती अनुभवता आली. ‘वेदनाशामक गोळी घेऊन जशा वेदना थांबतात’, तसे मला गोळी न घेता दोन दिवस अनुभवता आले. हे केवळ गुरुमाऊलींच्या कृपेने अनुभवता आले. ‘आपत्काळात वेदनाशामक गोळी न घेताही वेदनांचे शमन बिंदूदाबन उपचार करून कसे करायचे ?’, ते मला शिकायला मिळाले.’

१ इ. कु. वैभवी भोवर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय २६ वर्षे), ठाणे

१ इ १. मान आणि कंबर यांच्या दुखण्याचा त्रास बिंदूदाबन उपचारानंतर न्यून होणे : ‘मला तीन वर्षांपासून मानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होत आहे. ‘झोपतांना कंबर दुखणे आणि एका स्थितीत राहिल्यावर मान अवघडणे’, हे त्रास होत होते. सतत या दुखण्याची जाणीव असायची. परिणामी शारीरिक सेवांना मर्यादा येत होती. मी शारीरिक सेवा केल्याच, तर मला विश्रांती घ्यावी लागायची. शिबिरात माझ्यावर डॉ. जोशींनी उपचार केल्यावर त्याच क्षणापासून मणका, मान आणि कमरेतील जडपणा नष्ट होऊन हलके झाल्यासारखे वाटू लागले. बिंदूदाबन उपचारानंतर माझी मान लगेचच मोकळी झाली. गुरुदेवांची कृपा आणि संकल्प याची अनुभूती येऊन कृतज्ञतेचे अश्रू आले. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

(सध्या भ्रमणभाषच्या वाढत्या वापरामुळे बर्‍याच जणांना मानदुखी आणि पाठदुखी हे त्रास होत आहेत. यावर अनेक उपचार आता यूट्यूबवर सर्व जण शोधत असतात. मात्र ‘तुझे आहे तुजपाशी..’ या उक्तीनुसार ‘केवळ नेमकेपणाने कुठले बिंदू नियमित दाबायचे ?’, याविषयी समजून घेतले, तर हे दुखणे आपण मुळापासून बरे करू शकतो. – संकलक)

१ ई. श्री. संदीप अग्निहोत्री (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५९ वर्षे), डोंबिवली

१ ई १. गुडघेदुखी ७५ टक्के इतक्या प्रमाणात अल्प होणे : ‘दोन मासांपासून माझ्या डाव्या गुडघ्याच्या भोवतीचे स्नायू अशक्त होऊन गुडघा दुखत होता. त्यामुळे मांडी घालून बसणे आणि गुडघ्यावर जोर येईल, अशी कुठलीही कृती मला करता येत नव्हती. डॉ. जोशींनी केलेल्या उपायांनी गुडघेदुखी ७५ टक्के इतक्या प्रमाणात अल्प झाली आहे.’

(‘गुडघेदुखी म्हटले की, ‘डॉक्टर ‘कॅल्शियम’च्या गोळ्या, वेदनाशामक गोळ्या ते थेट ‘नी रिप्लेसमेंट’सारखे खर्चिक उपचार सांगतात. ‘आपत्काळात डॉक्टरांपर्यंत पोचू कि नाही ?’, अशीही स्थिती निर्माण होईल, त्या वेळी बिंदूदाबनासारखी स्वयंउपचारपद्धतीच उपयोगी ठरणार आहे.’ – डॉ. दीपक जोशी)

१ उ. सुश्री कुंदा नेसवणकर, ठाणे

१ उ १. मान, पाठ आणि कंबर दुखण्याचा त्रास न्यून होऊन पाय जमिनीला टेकवून चालता येणे : ‘मला एक वर्षापासून मानदुखीचा त्रास आहे. पाठ आणि कंबरदुखी बर्‍याच वर्षांपासून आहे. दीड मासांपासून पायाची शीर ओढली जाऊन उजवा पाय जमिनीला टेकवता येत नव्हता. परिणामी तीव्र वेदना व्हायच्या.

डॉ. जोशींनी केलेल्या उपायांमुळे माझ्या पाठदुखी आणि मानदुखी पूर्ण बर्‍या झाल्या. पायाची जी शीर ओढली गेली होती, तीही पूर्ववत् होऊन मला पाय जमिनीला टेकवून चालता येऊ लागले. उपायांनंतर सात दिवस मला पायांच्या शिरेचा त्रास झाला नाही आणि वेदनाही झाल्या नाहीत. आता मला खाली बसता येते. पाय आणि घोटा यांत पुष्कळ वेदना होत होत्या. पाय सरळसुद्धा रहात नव्हता. तो आता सरळ रहात आहे. पाठ आणि मान दुखत नाहीत. माझा त्रास ९० टक्के प्रमाणात अल्प झाला आहे.’

 (सर्व सूत्रांचा दिनांक १८.८.२०२३)                                               

(क्रमशः)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/800152.html