‘बिंदूदाबन’ – आपत्काळासाठी संजीवनी असलेली एक चिकित्सापद्धत !

महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये डॉ. दीपक जोशी बिंदूदाबन शिबिरे घेत आहेत. ठाणे येथे २ ते ४ जून २०२३ या कालावधीत झालेल्या शिबिरात ‘विविध शारीरिक त्रास असणार्‍या साधकांवर बिंदूदाबन उपाय करण्यात आले. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीने आपत्काळासाठी बिंदूदाबन का शिकायला सांगितले आहे ?’, त्याचे महत्त्व या शिबिरातून लक्षात आले. या शिबिरात साधकांना आलेल्या काही अनुभूती आपण २ जून या दिवशी पाहिल्या. आज पुढील अनुभूती पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/799728.html

डॉ. दीपक जोशी

१ ऊ. श्री. सतीश बांगर, ठाणे

१ ऊ १. कंबरदुखीच्या वेदना ५० टक्के प्रमाणात न्यून होऊन एका ठिकाणी सलग बसण्याची क्षमता दुपटीने वाढणे : ‘मला ४ ते ५ वर्षांपासून कंबरदुखीचा त्रास आहे. त्याच्या परिणास्वरूप मला पुष्कळ वेळ सलग एका ठिकाणी बसता येत नाही. माझी सेवा बैठी असल्यामुळे माझी कंबरसुद्धा आखडून जायची. त्यावर उपाय म्हणून मी व्यायाम करतो; मात्र शिबिरात माझ्यावर बिंदूदाबनाचे उपचार झाल्यापासून त्वरित परिणाम झाल्याचे मला अनुभवता आले. माझ्या वेदना ५० टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाल्या आहेत. माझी एका ठिकाणी सलग बसण्याची क्षमता दुपटीने वाढली आहे. पूर्वी मी अर्ध्या घंट्याच्या वर मांडी घालून बसू शकत नव्हतो. आता एक घंटा मांडी घालून बसू शकतो.’

१ ए. सौ. संचिता ठाकूर, अंधेरी, मुंबई.

१ ए १. ‘बिंदूदाबन आणि नाभी बसवणे’, हे उपचार केल्यावर हलकेपणा वाटून शिरा (नसा) मोकळ्या झाल्या आहेत’, असे जाणवणे : ‘मला पाच वर्षांपासून पोटात गॅस होणे, पोट साफ न होणे आणि गर्भाशयाशी संबंधित त्रास आहेत. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्त्रावाचे प्रमाणही पुष्कळ अल्प असते. माझा अनेकदा गर्भपातही झाला आहे. माझ्या अंडाशयावर गाठी झाल्या होत्या. त्या शस्त्रकर्म करून काढल्या आहेत.

शिबिरात माझ्यावर ‘बिंदूदाबन आणि नाभी बसवणे’, हे उपचार झाले. तेव्हापासून मला शौचाला साफ होत आहे. माझे पोट पूर्वी घट्ट वाटायचे; पण आता ‘मला हलकेपणा वाटून माझ्या नसा मोकळ्या झाल्या आहेत’, असे मला जाणवत आहे.

१ ए २. सलाईन लावल्याच्या ठिकाणी झालेल्या रक्ताच्या गाठी बिंदूदाबन उपचारानंतर दिसेनाशा होणे : २०१८ मधे मला सलाईन लावले होते. सलाईन लावल्याच्या ठिकाणी रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या होत्या. कोपर ते मनगट या भागात अशा २ – ३ गाठी झाल्या होत्या. बिंदूदाबन उपचारानंतर त्या गाठी दिसेनाशा झाल्या आहेत. आता केवळ हात लावल्यावर त्यांची जाणीव होते. आधी त्या डोळ्यांनी स्पष्ट दिसायच्या. ८० ते ९० टक्के इतक्या प्रमाणात मला लाभ झाल्याचे मी अनुभवले.’

१ ऐ. कु. भाग्यश्री हडकर, भांडूप, मुंबई.

१ ऐ १. नाभी बसवणे आणि बिंदूदाबन हे उपचार केल्यावर मासिक पाळीशी संबंधित शारीरिक त्रास न्यून होणे : ‘मला २०१४ पासून मासिक पाळीमध्ये अती रक्तस्त्रावाचा त्रास होत होता. मासिक पाळी आल्यानंतर १ मास रक्तस्त्राव व्हायचा. परिणामी मला थकवा जाणवायचा आणि ‘काहीच करू नये’, असेही वाटायचे. शिबिराआधी २ मास मला मासिक पाळी आलीच नव्हती.

शिबिरात माझ्यावर नाभी बसवणे (सरकलेली नाभी जागेवर आणणे) आणि बिंदूदाबन हे उपचार झाले. दुसर्‍याच दिवशी माझी मासिक पाळी आली आणि त्या वेळी अती रक्तस्त्रावाचा त्रासही झाला नाही. मासिक पाळी येण्यासाठी आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर ते पाळी येण्यासाठीच्या गोळ्या देतात; पण बिंदूदाबनामुळे विनाऔषध तोच परिणाम साधता आला, तसेच नियंत्रित रक्तस्त्राव झाला.’

१ ओ. सौ. निवेदिता जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५१ वर्षे), ठाणे

१ ओ १. पाच वर्षांपासून असलेला गुडघेदुखीचा त्रास ३ दिवस बिंदूदाबन उपचार केल्यावर पूर्ण बरा होणे : ‘५ – ६ वर्षांपासून माझ्या उजव्या पायाचा गुडघा आणि पाय पुष्कळ दुखत होते. त्यामुळे थकवा होता आणि ‘चालू नये’, असे मला वाटायचे. ‘गुडघा बरा होणार नाही’, असे नकारात्मक विचार यायचे. बिंदूदाबन उपचार तीन दिवस केल्यापासून माझा उत्साह वाढून पाय आणि गुडघा दुखणे पूर्णपणे थांबले आहे. आता मी सेवेच्या निमित्ताने बर्‍याच अंतरापर्यंत पायी चालले, तरी माझे पाय दुखत नाहीत. गुडघ्यासाठी कुठलेही औषध न घेता केवळ तीन दिवस बिंदूदाबन उपचार केल्यावर गुरुदेवांनी माझा पाच वर्षांपासून असलेला गुडघेदुखीचा त्रास पूर्ण बरा केला. ही किमया केवळ गुरुमाऊलीच करू शकते, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

१ औ. सौ. नीता चव्हाण, नवीन पनवेल

१ औ १. तीव्र डोकेदुखीच्या त्रासावर १० ते १५ मिनिटे बिंदूदाबन उपचार केल्यावर डोकेदुखी पूर्णपणे थांबणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या दिंडीच्या सेवेसाठी मी दादर येथे गेले होते. त्या वेळी माझे डोके पुष्कळ दुखत होते. त्या वेळी एक वैद्य साधिका तिथे होत्या. मी त्यांना माझ्या डोकेदुखीविषयी सांगितले. तेव्हा ताईंनी माझ्यावर डोकेदुखीवरील बिंदूदाबन उपचार केले आणि १० ते १५ मिनिटांत माझी डोकेदुखी पूर्णपणे थांबली. मला हा त्रास वारंवार व्हायचा. त्या वेळी वेदनाशामक गोळी घेऊनही परिणाम व्हायचा नाही; पण या वेळी १ मास होऊन गेला, तरी माझे डोके एकदाही दुखले नाही.’

१ क. सौ. धनश्री केळशीकर, गिरगाव, मुंबई.

१ क १. पोटाला मर्दन आणि सुदर्शन क्रिया यांसारखे उपचार झाल्यानंतर हलके वाटून मनाचा उत्साह वाढणे : ‘बिंदूदाबन शिबिरामध्ये उपचाराविषयी मला निरोप आल्यानंतर ‘उपचारासाठी जाऊ नये’, असे मला वाटत होते. मला एका साधिकेकडून ‘शिबिरात आध्यात्मिक उपाय होणार आहेत. तुम्ही यायला हवे’, असे सांगितले गेले. त्यामुळे मी तेथे गेले. पोटाला मर्दन आणि सुदर्शन क्रिया यांसारखे उपाय झाल्यानंतर मला पुष्कळ हलके वाटून माझ्या मनाचा उत्साह वाढला.

१ क २. आध्यात्मिक उपाय ५ – ६ घंटे केल्यानंतर जसे जाणवते, ते २० मिनिटांच्या बिंदूदाबन उपचारानंतर अनुभवता येणे : आध्यात्मिक उपाय केल्यानंतर जसा थकवा येतो, तसा थकवा मला उपचारानंतर वाटत होता; मात्र माझ्या शरिराला हलकेपणा जाणवत होता. आध्यात्मिक स्तरावर मला गुरूंच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. अशा प्रकारची स्थिती मला ५ – ६ घंटे आध्यात्मिक उपाय केल्यानंतर अनुभवता येते. ती केवळ २० मिनिटांच्या उपचारानंतर मला अनुभवता आली.’

(क्रमशः)

(सर्व सूत्रांचा दिनांक १८.८.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/800486.html