Farooq Abdullah On Pakistan Bomb:(म्हणे) ‘पाकने हातात बांगड्या घातलेल्या नाहीत, त्यांच्याकडे अणूबाँब आहे !’

पाकव्याप्त काश्मीरचे भारतात विलीनीकरणाच्या संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावर फारूख अब्दुल्ला यांचे राष्ट्रघातकी विधान !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पाकव्याप्त काश्मीरचे भारतात विलीनीकरण करण्याच्या वक्त्यावर ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी देशद्रोही विधान केले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानच्या लोकांनी हातात बांगड्या घातलेल्या नाहीत. पाकिस्तानकडे अणूबाँब आहे आणि तो अणूबाँब आपल्यावरच पडेल.

१. पूंछमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणावर अब्दुल्ला म्हणाले की, हे निराशाजनक वृत्त आहे. आमचे सैनिक हुतात्मा होत आहेत. याआधी आतंकवादी आक्रमणांसाठी कलम ३७० ला उत्तरदायी ठरवले जायचे. आज ते नसूनही आक्रमणे होतच आहेत. (कलम ३७० हे देशद्रोही कलम होते. अशी फुटीरतावादी वक्तव्ये करणार्‍या अब्दुल्ला यांना आता कारागृहात धाडले पाहिजे ! – संपादक)

२. ते पुढे म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांनी चर्चा केली पाहिजे. जर भारताने चीनसमवेत १९ वेळा चर्चा केल्या, तर ते पाकसमवेत चर्चा का नाही करत ?

३. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीन अनेक बांधकामे करत असल्याच्या प्रश्‍नावर त्यांचे मत विचारले असता, त्यांनी त्यास काही उत्तर दिले नाही.

४. भाजप राममंदिरावरून राजकारण करत आहे. राम केवळ त्यांचेच नाहीत, तर संपूर्ण विश्‍वाचे आहेत. निवडणूक प्रचाराच्या वेळी भाजप हिंदूंमध्ये भयाचे वातावरण निर्माण करत आहे.

संपादकीय भूमिका

सरकारने कलम ३७० रहित केले, हे योग्यच केले, त्यासह आता फारूख अब्दुल्ला यांसारख्या पाकप्रेमी नेत्यांना अटक करून त्यांना कारागृहात धाडले, तरच काश्मीरमध्ये शांतता नांदेल !