उन्हाळ्याच्या प्रारंभीच सोलापूर येथील १९ गावांत टँकरने पाणीपुरवठा !

सोलापूर – दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या गावांतून मागणी आल्यानंतर प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा चालू केला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. माळशिरस, माढा, करमाळा, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या पाच तालुक्यांतील १९ गावांसाठी २१ टँकरने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्याचे कमाल तापमान ४० अंशांवर पोचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे बोअर आणि विहिरींमधील पाण्याची पातळी हळूहळू अल्प होऊ लागली आहे. उजनी धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने घट होत आहे. सध्या धरणातील पाणीसाठा उणे २८.१७ वर पोचला आहे. मागील वर्षी ५९.७२ एवढा पाणीसाठा होता. शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा, हिप्परगा तलावातील पाणीसाठाही संपण्याच्या मार्गावर आहे.

संपादकीय भूमिका

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, यासाठी प्रशासनाने प्रबोधन करणे आवश्यक !