अंतर्मुख वृत्ती आणि अल्प अहं असलेले गोवा येथील कै. राघवेंद्र माणगावकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘काही दिवसांपूर्वी माझी माणगावकर यांच्याशी भेट झाली. त्या वेळी अंतर्मुख आणि भावावस्थेत असलेल्या माणगावकर यांना पाहिल्यावर ‘त्यांची साधना चांगल्या प्रकारे चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे ‘तुमची साधना चांगली चालू असल्याने आता मला तुमच्या साधनेची काळजी नाही’, असे मी त्यांना सांगितले.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ.  आठवले

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. तळमळीने प्रसारसेवा करणार्‍या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती कृतज्ञताभाव असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती रेखा माणगावकर (वय ६२ वर्षे) !

श्रीमती रेखा माणगावकर

‘काही दिवसांपूर्वी सनातनचे साधक-दांपत्य श्री. राघवेंद्र माणगावकर आणि त्यांच्या पत्नी सौ. रेखा माणगावकर यांच्याशी माझी भेट झाली होती. त्या वेळी मला काकांचे वेगळेपण अनुभवायला मिळाले. माणगावकरकाकू गोवा येथे प्रसारसेवा करतात. त्यांनी ‘सेवा करतांना, तसेच अन्य वेळी त्यांना येत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती सांगून त्या ‘भगवंताचे अस्तित्व आणि त्याची कृपा कशी अनुभवतात’, यांविषयी सांगितले.

माणगावकरकाकू प्रसारसेवा पुष्कळ चांगल्या प्रकारे करतात. त्यांच्यामध्ये कौशल्याने आणि तळमळीने सेवा करणे, हा मोठा समष्टी गुण आहे. कुठेही गेले, तरी ‘त्यांची प्रसारसेवा कशी सतत चालू असते ?’ याविषयीचे त्यांचे बोलणे ऐकतांना त्यांचे प्रसारकौशल्य लक्षात येत होते. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले कशा प्रकारे सेवा करवून घेतात’, या कृतज्ञताभावाने त्या भरभरून सांगत होत्या.

२. अहं अल्प असल्याने पत्नीच्या प्रगतीने स्वतःही आनंदी होणारे माणगावकरकाका !

कै. राघवेंद्र माणगावकर

काकूंच्या बोलण्यातून ‘त्यांची प्रगती चांगल्या प्रकारे होत आहे’, हे लक्षात येऊन मी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. काकूंचे बोलणे ऐकतांना माणगावकर काकांनाही पुष्कळ आनंद होत होता. यातून काकांचे वैशिष्ट्य लक्षात आले की, ते पत्नीच्या प्रयत्नांमधील आणि तिच्या सेवेतील आनंद स्वतःही अनुभवत आहेत. यातून ‘काकांमध्ये अहं अल्प आहे’, हे माझ्या लक्षात आले. काकांची शिकण्याची आणि भावाची स्थिती होती. त्यांना ‘पत्नीची प्रगती होत आहे’, याचा आनंद होत होता.

या भेटीनंतर आश्रमात मला काका कधी कधी दिसत. तेव्हा ‘ते अंतर्मुख असून त्यांचा नामजप चालू आहे आणि ते भावस्थितीत आहेत’, असे माझ्या लक्षात यायचे. त्यांची साधना आतून चालू असल्याने ते सतत आनंदी असायचे.

नुकतेच माणगावकरकाकांचे निधन झाले. ‘परिस्थिती स्वीकारून आनंदी रहाणे, मायेपासून अलिप्त असणे, अखंड नामानुसंधानात रहाणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा अन् उत्कट भाव असणे’, या सर्व गुणांमुळे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. ‘माणगावकरकाकांचा पुढच्या पुढच्या लोकांतील साधनेचा प्रवास जलद गतीने होवो’, अशी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (५.३.२०२४)