लाच घेतांना ४ शासकीय कर्मचार्‍यांना अटक; एका साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश !

पुणे जिल्ह्यांमधील तीन जण, तर अहिल्यानगरमध्ये एकास अटक

पुणे – जिल्ह्यांमध्ये ३ घटनांमध्ये लाच घेतांना शासकीय कर्मचार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागांकडून रंगेहात अटक करण्यात आले.

१. वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील (जी.एस्.टी.) मालती कठाळे यांना ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. तक्रारदार व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन सेवा आणि कर क्रमांक घेण्यासाठी अर्ज केला होता. तो क्रमांक देण्यासाठी लाच घेण्यात आली. याविषयी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

२. धामारी (ता. शिरूर) गावातील शेतभूमीची मोजणी करण्यासाठी आवश्यक ते शुल्क भरूनही भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक शिवराज बंडकर आणि अमोल कदम यांना ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. या दोघांविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

३. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील मद्य दुकानाचा परवाना रहित करण्याची तसेच दुकानचालक आणि ग्राहक यांवर कारवाई करण्याची धमकी देऊन, प्रतिमाह २० सहस्र रुपयांचा हप्ता देण्याची मागणी करणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव गर्जे याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गर्जे हे राहुरी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचाराने पोखरलेली प्रशासकीय यंत्रणा ! हे असेच किती दिवस चालणार ? यावरून समजते की, समाजाने धर्माचे पालन न केल्यास समाजाची नीतीमत्ता खालावत जाते ! समाज धर्मशिक्षित करणे आवश्यक आहे.