देशविघातक अमली पदार्थांवर अंकुश हवा !

अलीकडेच पुण्यासारख्या ‘सांस्कृतिक राजधानी’ अशी ओळख असणार्‍या शहरात अमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. या कारवाईविषयी पोलिसांचे कौतुक करायला हवेच; मात्र इतक्या राजरोसपणे असे देशविघातक कृत्य चालू असते आणि ते संबंधित यंत्रणांच्या लक्षातही येत नाही, हे मात्र न पटणारे आहे. आज देशातच नव्हे, तर जगभर व्यसनाधिनता वाढत असतांना अशा गोष्टींवर अंकुश ठेवायलाच हवा. याविषयी ऊहापोह करणारे विवेचन येथे देत आहे.

श्री. प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक

प्रतिकात्मक छायाचित्र

१. अमली पदार्थांचा उद्योग कसा चालू झाला ?

अलीकडेच पुणे पोलिसांनी अमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत केला. त्याचे बाजारमूल्य जवळपास ३ सहस्र ७०० रुपये कोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेच्या निमित्ताने एकूणच हा विषय ऐरणीवर आला असून त्यावर गांभीर्याने चर्चा होण्याची आवश्यकता आहे. या सगळ्याचा सूत्रधार एक विदेशी पारपत्रधारक असून त्याला काही वर्षांपूर्वीच ‘नॉर्कोटिक्स ब्युरो’ने (अमली पदार्थविरोधी यंत्रणेने) अटकही केली होती. अशी पार्श्वभूमी असणार्‍या या व्यक्तीने पुन्हा एकदा भारतात प्रवेश केला आणि येथील काही उद्योजकांच्या साहाय्याने पुण्याजवळील कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीमध्ये तयार अन्न घटक बनवण्याचा उद्योग चालू केल्याचे दाखवले. प्रत्यक्षात त्या ठिकाणी अमली पदार्थ मोठ्या प्रमाणावर सिद्ध होत होते. नंतर मोठ्या प्रमाणात बाजार असणार्‍या देहलीसारख्या ठिकाणी तो माल साठवला जात होता. एवढेच नव्हे, तर हा माल इंग्लंडपर्यंत पाठवण्याचा उद्योगही चालू होता.

२. देशविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी करावयाची उपाययोजना !

श्री. प्रवीण दीक्षित

हे सगळे लक्षात घेता पुन्हा असे प्रकार होऊ नयेत, या हेतूने पुढील काळात काही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. त्यात…

. पहिले म्हणजे पूर्वी अशा स्वरूपाची कारवाई ज्याच्यावर झाली आहे, अशा त्या विशिष्ट गुन्ह्याची पार्श्वभूमी असणार्‍यांवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे; कारण हे लोक शिक्षा भोगूनही पुन:पुन्हा त्याच त्याच प्रकारचे गुन्हे करत असतात.

. दुसरे म्हणजे अमली पदार्थांसंदर्भात कार्यरत असणार्‍या वा तशी पार्श्वभूमी असणार्‍या परदेशी व्यक्तींवर भारताच्या परराष्ट्र आणि गृह खात्यांनी ते आपल्या देशात कधीही परत येणार नाहीत, या दृष्टीने उच्चायुक्त, दूतावास, विमानतळे अशा सर्व ठिकाणी तशा सूचना देणे आवश्यक आहे. हे लोक भारतात येऊन तेच गुन्हे करतात आणि देशाची सुरक्षा धोक्यात येते; म्हणूनच ही दक्षता घ्यायला हवी. आता सुदैवाने चांगल्या प्रकारची संपर्क यंत्रणा सर्व विभागांना उपलब्ध आहे. त्याचा पूर्ण उपयोग करून अशा गुन्हेगारांविषयीची अद्ययावत् माहिती सर्व संबंधितांना पोचली आहे कि नाही ? हे पहाणे आवश्यक आहे.  यामध्ये कारागृह विभागाकडून गुन्हेगार सुटण्याच्या माहितीचाही अंतर्भाव असावा. यामुळे कारागृहात कोणता गुन्हेगार सुटला वा कोणता सुटणार आहे ? त्याच्यावरील गुन्ह्याचे स्वरूप काय ? हे आधीच संबंधित यंत्रणांना समजले, तर योग्य ती खबरदारी घेणे शक्य होईल. विमानतळ, दूतावास आदी ठिकाणी ही माहिती पोचली, तर विमानतळावरील अधिकारी त्यांचे काम करून गुन्हेगारांकडून होणार्‍या देशविघातक कृत्यांना वेळीच पायबंद घालू शकतील.

३. देशविघातक कृती रोखण्यासाठी विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या समन्वयाची आवश्यकता !

देशात वा राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ सापडण्याची ही काही पहिलीच घटना नाही. ठिकठिकाणच्या औद्योगिक वसाहतींमध्ये असे प्रकार पूर्वीही उघडकीस आले आहेत. एक म्हणजे या वसाहती मुख्य जिल्हा, गाव वा शहर यांपासून दूरच्या भागात विकसित केल्या जातात. ओसाड प्रदेशातच ‘एम्.आय.डी.सी.’ (औद्योगिक वसाहती) काढल्या गेल्या आहेत. त्यामुळेच आजूबाजूला तशीही फारशी वस्ती नसते. साहजिकच अशा एरव्हीही फारशी वर्दळ नसणार्‍या या भागांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हव्या त्या देशविघातक कारवाया करण्यासाठी प्रशासनाच्या साहाय्याने मोकळे रान मिळाले असल्यासारखे चित्र निर्माण होते.

खरेतर प्रत्येक औद्योगिक वसाहत, अन्न आणि औषध प्रशासन यांचे अधिकारी असतात वा कायदा अन् सुव्यवस्थेची काळजी घेणारेही अधिकारी असतात. प्रत्येक औद्योगिक वसाहतीचे ‘चेंबर ऑफ कॉमर्स’ असते. या सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या परिसरातील प्रत्येक उद्योग काय करतो ? याची सविस्तर चौकशी प्रत्येक मासाला करणे आवश्यक आहे. आज ही चौकशी होत नसल्यामुळे या लोकांना मोकळे रान मिळाले असून आज त्यातील काही ठिकाणे देशविघातक कृती करण्याची केंद्र झाली आहेत. त्यामुळेच आधी उल्लेख केल्याप्रमाणे औद्योगिक वसाहतींचे प्रमुख, उद्योग सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक, प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी या सगळ्यांमध्ये समन्वय असण्याची आवश्यकता आहे. या अधिकार्‍यांनी कोणत्या कारखान्यांना भेट दिली ? तिथे काय सापडले ? त्यात शंका घेण्यास जागा आहे का ? या सगळ्याविषयीची सविस्तर माहिती ‘ऑनलाईन’ पद्धतीने मंत्रालय, पोलीस महासंचालक आणि इतर संबंधित अधिकारी यांच्याकडे वेळच्या वेळी पाठवली, तर मोठे धोके टाळणे सहज शक्य होईल.

४. देशविघातक कृत्यात सहभागी असणार्‍या कामगारांची स्थिती ! 

बर्‍याचदा अशा धंद्यांमध्ये वा अमली पदार्थांच्या उत्पादनामध्ये अनेकांचा सहभाग असूनही ही माहिती सहजासहजी बाहेर पडतांना दिसत नाही. इथे यामागील कारणांची मीमांसाही व्हायला हवी. त्यातील पहिले म्हणजे या कारखान्यांमध्ये काम करणार्‍या लोकांना भरपूर पैसे दिले जातात. साहजिकच त्यांना ठराविक टक्केवारी दिली आणि पैशाची चटक लावली की, सिद्ध झालेल्या मालाचे पुढे काय होते ? याच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे रहात नाही. याखेरीज आपण एखादी देशविघातक गोष्ट करत आहोत, हे त्यातील काहींना कळतही नाही, म्हणजेच हे काम सगळे जाणूनबुजून करतात, असेही म्हणता येत नाही. साहजिकच यातून देशाची काय आणि किती हानी होणार आहे ? हे पुष्कळ थोड्या लोकांना ठाऊक असते.

५. प्रत्येक पालकाने जागरूक रहाणे आवश्यक !

दुसरे म्हणजे सध्या घराघरात पती-पत्नी दोघेही कामानिमित्त बाहेर जातात. साहजिकच मुलांकडे, त्यांच्या सवयींकडे, वागण्यातील पालटांकडे तितकेसे लक्ष जातेच असे नाही. अलीकडेच नाशिकमध्ये घडलेली एक घटना हे सत्य समोर मांडणारी आहे. तिथे एका शाळेत १४ वर्षांच्या मुलीकडे ‘इ-सिगारेट’ सापडली. त्यामुळे मुख्याध्यापकांनी तिच्या पालकांना याविषयी कळवले. हे मुलीला समजल्यानंतर तिने आत्महत्या केली, म्हणजेच नाशिकसारख्या ठिकाणी एखादी १४ वर्षांची मुलगी व्यसनाच्या इतक्या आहारी गेली असेल, तर वास्तव किती भीषण आहे, हे आपण समजून घ्यायला हवे. ‘ड्रग्ज’चे लोण किती खोलवर पोचलेले आहे, हे जाणून वेळीच लक्ष दिले, तर हा प्रश्न काही अंशी नियंत्रणात राहू शकेल. बर्‍याचदा आपले मूल व्यसनाधिन झाले आहे, हे पालक मान्यच करत नाहीत. मुलांनी पैसे चोरण्याच्या घटनेकडेही आजकाल दुर्लक्ष होतांना दिसते. हेही धोक्याचेच आहे; म्हणूनच प्रत्येक पालकाने जागरूक रहाणे आवश्यक आहे.

६. अमली पदार्थांचा पुरवठा म्हणजे एक प्रकारचे छुपे युद्ध !

अफगाणिस्तान, पाकिस्तान वा म्यानमार यांसारख्या देशांमधून अमली पदार्थांच्या पुरवठ्याच्या माध्यमातून एक प्रकारचे छुपे युद्ध खेळले जात आहे. त्यामुळेच कधी काश्मीर, पंजाब, गुजरात, मणीपूर, तर कधी महाराष्ट्र यांसारख्या भागांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे साठे सापडतात. गेली ३० वर्षे पाकिस्तान ड्रोन, बोटी, महिला आदींच्या साहाय्याने भारतात अमली पदार्थ पोचवत आहे. हे लक्षात घेऊन ही लढाई भारत-पाकिस्तान वा भारत-अफगाणिस्तान यांच्या लढाई इतक्याच गांभीर्याने घेण्याखेरीज पर्याय नाही. केवळ भारताच्या आजूबाजूचे नव्हे, तर अगदी दक्षिण अमेरिकेमधील काही देशांमध्येही प्रचंड प्रमाणावर अमली पदार्थांना आवश्यक असणार्‍या मालाचे उत्पादन होते. हाच माल समुद्रमार्गे जगभर पोचवण्यासह तो भारतातही येतो आणि येथून अन्यत्रही पोचवला जातो. त्यामुळे यावरही काळजीपूर्वक लक्ष ठेवून दोषींवर कारवाई करणे आवश्यक झाले आहे. असे झाले, तरच पुढची पिढी या संकटापासून सुरक्षित राहू शकेल.   (२.३.२०२४)

अमली पदार्थ विक्रीस साहाय्य करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे क्रमप्राप्त !

अमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाई करतांना पोलीस आणि अमली पदार्थ यांचे प्रातिनिधिक छायाचित्र

शेवटी असे गैरव्यवहार काही एका दिवसात झालेले नसतात. गेले काही मासच नव्हे, तर वर्षानुवर्षे ते चालू आहेत. त्यामुळेच याचे उत्तरदायित्व झटकणे, हे देशासाठी योग्य नाही. यामुळे देशाच्या सुरक्षेचाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. आज आंतरराष्ट्रीय पातळीवरून अमली पदार्थ्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची नोंद घेतली जात असली, तरी यासाठी पुष्कळ मोठा बाजार उपलब्ध असल्याचे नाकारून चालणार नाही. इंग्लंड, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित म्हटल्या जाणार्‍या देशांमध्येच आज ‘ड्रग्ज’चा प्रचंड प्रमाणात खप होतो आहे. इथे त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळेच यावरही बारकाईने लक्ष ठेवून त्यांच्याकडे असणारी माहिती जाणून भारतात त्यांना साहाय्य करणार्‍यांवर कठोर कारवाईचे शस्त्र परजायला हवे. कितीही कठोर कायदे केले, तरी गुन्हेगार अनेक पळवाटा शोधत असतात. अमली पदार्थांची तस्करी करणारेही अनेक मार्गांनी देश विघातक कृत्ये करत असतात. त्यासाठी अनेक चांगल्या योजनांचा गैरवापरही केला जातो. वारंवार होणार्‍या पडताळणी आणि अन्वेषण यांमुळे यास आळा घालणे शक्य होईल. – श्री. प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक

दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करायला हवी !

अमली पदार्थांच्या पुरवठ्याच्या संपूर्ण साखळीमध्येही बरेच भाग असतात. त्यामुळेही सगळ्यांकडेच याचा दोष जात नाही; मात्र इथे काही गैरव्यवहार होत नाही ना, हे पहाण्याचे उत्तरदायित्व असणार्‍यांवर मात्र दुर्लक्ष केल्याच्या कारणाखातर शासनाने कारवाई करणे आवश्यक आहे. एका बाजूला मी पुणे पोलिसांच्या कारवाईविषयी समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन करीन; पण त्यासह संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्याचा आग्रहही धरेन; कारण कुणीही पुढे अशा प्रकारचे दुर्लक्ष करण्यास धजावणार नाही, यासाठीची यंत्रणा निर्माण करणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ अशा भागांमध्ये ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा उभारणे शक्य आहे. ‘नेटवर्किंग’मधून (संपर्क यंत्रणांच्या माध्यमातून) महत्त्वाची माहिती मिळू शकते. शेवटी उपलब्ध तंत्रज्ञानाचा लाभ घ्यायला हवा. – श्री. प्रवीण दीक्षित, निवृत्त पोलीस महासंचालक