शिक्षणक्षेत्रात जिहादचे विष पेरून हिंदूंची भावी पिढी धर्मांतरित करण्‍याचे घातक षड्‍यंत्र !

१. मध्‍य प्रदेशमधील ‘गंगा-जमुना’ शाळेचे प्रकरण 

१ अ. सरकारने ठरवलेल्‍या अभ्‍यासक्रमाव्‍यतिरिक्‍त अन्‍य धर्माची शिकवण देण्‍यास बंदी ! : मध्‍य प्रदेशमधील दमोह जिल्‍ह्यात गंगा-जमुना या शाळेतील मुख्‍याध्‍यापक, एक शिक्षक आणि सुरक्षारक्षक यांची न्‍यायालयाने नुकतीच जामिनावर सुटका केली; पण न्‍यायालयाने शाळेसाठी काही अटी ठेवल्‍या. शाळेत कोणत्‍याही मुस्‍लिमेतर विद्यार्थिनींना हिजाब घालण्‍याची सक्‍ती करता येणार नाही, तसेच मध्‍य प्रदेश सरकारने ठरवलेल्‍या अभ्‍यासक्रमाव्‍यतिरिक्‍त कोणत्‍याही धर्माची शिकवणूक देण्‍यास किंवा त्‍यासंदर्भातील साहित्‍य मुलांना शिकवण्‍यास बंदी घालण्‍यात आली. या अटी शाळेवर का लादल्‍या गेल्‍या ? मुख्‍याध्‍यापक, शिक्षक आणि सुरक्षारक्षक यांनी काय गुन्‍हा केला होता ? तर गंगा-जमुना शाळा ही परिसरातील एकमेव इंग्रजी माध्‍यमाची शाळा आहे. इद्रिस खान यांच्‍या मालकीची ती शाळा आहे. ‘आपला मुलगा मातृभाषेतून मोठा साहेब होईल कि नाही’, अशा गैरसमजुतीमुळे परिसरातील विडी कामगार, मजूर आणि शेतकरी या शाळेतच आपल्‍या मुलांना प्रवेश मिळावा; म्‍हणून धडपडतात.

१ आ. ४ हिंदु विद्यार्थिनींनी हिजाब घातल्‍याच्‍या विरोधात हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना एकवटल्‍या ! : काही मासांपूर्वी शाळेने इयत्ता दहावीमध्‍ये उत्तम गुण पटकावणार्‍या विद्यार्थ्‍यांची छायाचित्रे असलेले कापडी फलक शाळेबाहेर लावले. ते फलक समाजमाध्‍यमांवर, तसेच संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले; कारण विशेष प्राविण्‍य मिळवलेल्‍या विद्यार्थिनींमध्‍ये ४ हिंदु मुलीही होत्‍या. त्‍यांनी हिजाब परिधान केलेला होता. मुलींची नावे तर हिंदु होती. मग त्‍यांनी हिजाब का घातला ? याचे पडसाद मध्‍य प्रदेश सरकार आणि प्रशासन येथे उमटले. बाल आयोगानेही याकडे लक्ष दिले. स्‍थानिक जिल्‍हाधिकारी आणि इतर अधिकारी यांनी अहवालात म्‍हटले की, यात काही विशेष नाही. तो हिजाब नव्‍हता, तर स्‍कार्फ आहे. स्‍कार्फ घालण्‍यासाठी शाळा कुणावर बळजोरी करत नाही. छायाचित्रातील ४ हिंदु मुली किंवा त्‍यांचे पालक यांची यासंबंधी कुठलीही तक्रार नाही; मात्र या घटनेविरोधात हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना एकवटल्‍या. त्‍यानंतर बाल आयोगाने आणि प्रशासनाने चौकशी चालू केली.

१ इ. हिंदु विद्यार्थ्‍यांना इस्‍लाम धर्माचे शिक्षण दिले जात असल्‍याचे उघड ! : शेवटी सत्‍य उघडकीस आले की, शाळेत हिंदु विद्यार्थ्‍यांना कुराणातील आयती शिकवल्‍या जात आणि नमाज पढायला लावत असत. इतकेच काय, तर शाळेतील शिक्षिकांचेही धर्मपरिवर्तन केले गेले. इस्‍लामी प्रार्थना आणि मुसलमान धर्म-श्रद्धा यांविषयी विद्यार्थांना शिकवले जात होते. मुलांनी तसे न केल्‍यास त्‍यांना मारहाण होत असे.

१ ई. सत्‍य उघडकीस आल्‍यावर शाळाचालकाकडून सर्व प्रकारांवर बंदी ! : शाळेत चालणारा प्रकार उघडकीस आल्‍यावर शाळेचा सर्वेसर्वा इद्रिस खान याने पत्रकार परिषद घेतली आणि उदार अंतःकरणाने सांगितले, ‘आतापासून शाळेत हिजाब घालणे अनिवार्य नाही, तसेच आतापासून शाळेत अल्लामा इकबाल यांनी लिहिलेल्‍या ‘लब पे आती है दुवा बनके तमन्‍ना मेरी’ या प्रार्थना गीताऐवजी ‘जन-गण-मन’ मुलांना म्‍हणायला सांगू.’ केवढा मोठा त्‍याग इद्रिस आणि त्‍याच्‍या गंगा-जमुना शाळेचा !

ही घटना भारतियांच्‍या डोळ्‍यांत झणझणीत अंजन घालणारी आहे. गरीब वस्‍तीमध्‍ये एकमेव इंग्रजी शाळा उघडून तिथे हिंदूंच्‍या मुलांना प्रवेश द्यायचा. त्‍यांच्‍यावर मुसलमान धर्माचे आणि चालीरितींचे संस्‍कार रुजवायचे, मुलांना प्रार्थना म्‍हणून ‘जन-गण-मन’ न शिकवता उर्दू शायराचे ‘लब पे आती हैं दुवा’ हे मुसलमान प्रार्थनागीत शिकवायचे, हे सगळे कशासाठी ? शिक्षणासारख्‍या पवित्र क्षेत्रातही जिहादचे विष घुसलेले आहे, हेच यातून सिद्ध होते.

२. धर्मांतराविषयी पालकांना सुवेरसुतकच नसणे

शिक्षक किंवा कर्मचारी आपल्‍याला इतर धर्माचे पालन करायला लावत होते. याविषयी विद्यार्थी किंवा त्‍यांचे पालक यांना काहीच वाटत नव्‍हते का, आपल्‍या मुलामुलींनी हिजाब घातला काय, क्रॉस घातला काय, कुराण पढले काय किंवा बायबल वाचले काय, याविषयी काहीच वाटत नव्‍हते. मुलांवर शाळेत इतर धर्माचे आक्रमक शिकवणे होतांना पालक आपल्‍या मुलांना हिंदुु धर्माचे काही धर्मज्ञान, संस्‍कार देत होते का ? नसतील, तर भविष्‍यात त्‍यांच्‍या मुला-मुलींनी हिंदु धर्म त्‍यागून इस्‍लाम किंवा ख्रिस्‍ती धर्म स्‍वीकारला, तर पालकांचे काय म्‍हणणे असेल ? नक्‍कीच पालकांना आवडणार नाही; पण तेव्‍हा पुलाखालून पाणी वाहून गेले असेल.

३. मुलगा अट्टल चोर होण्‍यास आईचे दुर्लक्ष कारणीभूत !

एक मुलगा चोरी करतांना पकडला गेला. अट्टल चोर म्‍हणून त्‍याला गंभीर शिक्षा झाली. कारागृहात जाण्‍याआधी तो आईला भेटायला गेला. आईच्‍या गळ्‍यात पडत त्‍याने आईचे नाकच कापले. का ? तो म्‍हणाला, ‘‘मी पहिल्‍यांदा चोरी केली, तेव्‍हा आईने दुर्लक्ष केले. पुढे सोयीने ती दुर्लक्ष करत राहिली. तेव्‍हाच जर तिने मला रोखले असते, माझ्‍याकडे लक्ष दिले असते, तर आज मी अट्टल चोर झालो नसतो आणि ही शिक्षाही मला झाली नसती.’’ धर्मांतर करणार्‍यांचे पालक या चोराच्‍या आईसारखेच असतात.

४. हिंदूंमध्‍ये धैर्य निर्माण झाल्‍यानेच हिंदु धर्मासाठी आवाज उठवू लागले आहेत !

अजाण आणि अबोध बालकांना, विद्यार्थ्‍यांना बळजोरीने आणि फसवून शिक्षणाच्‍या माध्‍यमातून धर्मांतर करण्‍यास प्रवृत्त करणे, हा गुन्‍हाच आहे. हे सगळे आजच घडत आहे का ? तर नाही, इंग्रजांच्‍या काळापासून हे सगळे होतच आहे. देश स्‍वतंत्र झाल्‍यावरही हे प्रकार सुखनैव चालू होते; मात्र त्‍यांची नोंद घेतली जात नव्‍हती. आता हिंदूंच्‍याच नव्‍हे, तर सर्व धर्मियांच्‍या श्रद्धेचे रक्षण करणारे केंद्रात सरकार आहे. पंतप्रधानपदीही नरेंद्र मोदी आहेत. देशभरातील हिंदूंमध्‍ये धैर्य निर्माण झाले आहे की, रामलल्लांच्‍या अयोध्‍येचा निकाल ज्‍यांच्‍या सत्ताकाळात झाला ते सत्तेत आहेत. त्‍यामुळे कालपर्यंतचा दबलेला हिंदू आज धर्मासाठी आवाज उठवतो. त्‍यामुळेच या अशा घटना उघडकीस येत आहेत.

५. हिंदूंच्‍या पुढील पिढीत धर्मांतराचे बीज रोवण्‍याचे विघातक शक्‍तींचे कारस्‍थान

नाण्‍याच्‍या दोन बाजू असतात. कालपर्यंत हिंदू झोपलेला होता आणि धर्मपरिवर्तनाचे काळे धंदे जोमात चालू होते; पण आज हिंदू जागा झाला आणि त्‍याच्‍या हिताचे सरकारही सत्तेत आले. त्‍यामुळे हिंदूंवर धर्मांतराची सक्‍ती करू शकत नाही, याचा अंदाज विघातक शक्‍तींना आला. मग बळजोरीने धर्मांतर करण्‍याऐवजी हिंदूंच्‍या पुढच्‍या पिढीमध्‍येच धर्मांतराचे बीज रोवायला हवे, या सिद्धतेत ही विघातक शक्‍ती आहे.

६. पालकांनो, सावध रहा !

बालकांना जन्‍मजात हिंदु धर्मापासून तोडायला हवे, हा एकमेव उद्देश घेऊन काही लोक शिक्षणक्षेत्रात उतरले आहेत. पालकांनी सावध रहायला हवे. आपला धर्म मुलांना शिकवा, अन्‍यथा कुणीतरी अधर्मी मुलांना आपल्‍या धर्मापासून तोडायला टपलेला आहेच. शिक्षणात पूर्वी ख्रिस्‍ती धर्मांतराचे ‘क्रूसेड’ तर सक्रिय होतेच; पण आता जिहादी मानसिकताही दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी यांचे सरकार किंवा हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना या सगळ्‍यांना पुरून उरतील; मात्र हिंदू म्‍हणून पालकांचेही दायित्‍व आहे कि नाही ?

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, ३.९.२०२३)

हिंदु विद्यार्थ्‍यांच्‍या धर्मांतराचा प्रयत्न होत असल्‍याच्‍या देशभरातील घटना !

१. उन्‍हाळी शिबिरात इस्‍लामी धर्माचे शिक्षण देण्‍याचा प्रयत्न

काही मासांपूर्वी मुरादाबादच्‍या देहली ग्‍लोबल पब्‍लिक स्‍कूलने विद्यार्थ्‍यांसाठी उन्‍हाळी शिबिर आयोजित केले. त्‍यामध्‍ये इस्‍लामविषयक माहिती आणि ज्ञान हे विषय निवडले ? शाळेचे म्‍हणणे की, मुसलमान मुलांना शिक्षणाविषयी आत्‍मीयता वाटावी; म्‍हणून हे शिबिर आयोजित केले; पण या शिबिरामध्‍ये शाळेतील बहुसंख्‍य हिंदू मुले सहभागी होणार होती, हे विशेष ! हिंदु विद्यार्थ्‍यांना उन्‍हाळी शिबिराच्‍या नावाने इस्‍लामविषयक ज्ञान देण्‍यामागचे प्रयोजन काय असेल ?

२. हिंदु विद्यार्थिनीला अल्लाची प्रार्थना करण्‍यास सांगणे

बेंगळुरूमध्‍ये इयत्ता दुसरीच्‍या वर्गातील हिंदु विद्यार्थिनीला गणित सोडवता आले नाही; म्‍हणून शिक्षा दिली. शिक्षा काय, तर तिने सर्वशक्‍तीमान अल्लाची प्रार्थना करावी. पालकांनी यावर आक्षेप घेतला; पण शाळेची अपकीर्ती केल्‍याप्रकरणी शाळेने पालकांविरोधात पोलिसात तक्रार केली.

विचार करण्‍यासारख्‍या अशा अनेक घटना घडतात. सहिष्‍णु म्‍हणून बहुसंख्‍य हिंदू या घटनांकडे दुर्लक्ष करतात; मात्र या घटनांचे पडसाद उमटत रहातात.

३. विद्यार्थ्‍यांवर नमाज पढण्‍याची सक्‍ती !

मध्‍य प्रदेशातील ‘सीएम् राईज स्‍कूल’मध्‍ये राष्‍ट्रगीतानंतर विद्यार्थी ‘गायत्री मंत्र’ म्‍हणतात; म्‍हणून शाळेतील माजिदा सिद्धीकी या शिक्षिकेने विद्यार्थ्‍यांना नमाज पढण्‍याचीही सक्‍ती केली आणि गायत्री मंत्र म्‍हणण्‍यावर बंदी आणली. याची नोंद नंतर मध्‍य प्रदेश सरकारने घेतलीच म्‍हणा !

४. ‘जय श्रीराम’ लिहिणार्‍या विद्यार्थ्‍याला धर्मांध शिक्षकांकडून बेदम मारहाण !

जम्‍मूच्‍या एका शाळेतील विद्यार्थ्‍याने फळ्‍यावर ‘जय श्रीराम’ लिहिले; म्‍हणून शिक्षक फारूख अहमद याने त्‍याला मारहाण केली. प्राचार्य महंमद हाफिज हाही तेथे आला. चौकशी करायची म्‍हणत फारूख आणि महंमद यांनी त्‍या विद्यार्थ्‍याला भयंकर मारहाण केली. विद्यार्थ्‍याचा गुन्‍हा काय होता ? तर त्‍याने केवळ ‘जय श्रीराम’ लिहिले. आपल्‍या आराध्‍यदेवतेचे नाव घेणे किंवा लिहिणे, हा भयंकर अपराध कसा होऊ शकतो ? बरे ‘शाळेच्‍या फळ्‍यावर विद्यार्थ्‍यांनी काहीही लिहू नये’, असा दंडक असेल, तर विद्यार्थ्‍याला तसे समजावूनही सांगता आले असते; मात्र प्राचार्य महंमद आणि शिक्षक फारूख यांचा आक्षेप होता, तो या मुलाने ‘जय श्रीराम’ लिहिण्‍यावर ! ‘या मुलाची इतकी हिंमत कशी होऊ शकते ? त्‍याला धडा शिकवलाच पाहिजे’, या क्रूर मानसिकतेतून त्‍यांनी विद्यार्थ्‍याला मारहाण केली. ‘हिंदु विद्यार्थ्‍यांनी कपाळावर गंध, विद्यार्थिनींनी टिकली किंवा कुंकू असे काहीही लावून येऊ नये, हातात राखी किंवा रक्षासूत्र बांधून येऊ नये, त्‍यांच्‍या संस्‍कृतीप्रमाणे रहाणीमान ठेवू नये, त्‍यांच्‍या धार्मिक आस्‍थांप्रमाणे वागू नये’, याची सक्‍ती असल्‍या शाळांमध्‍ये का केली जाते ?

५. ‘जय श्रीराम’च्‍या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्‍यांना दोषी ठरवले !

‘प्रभु श्रीराम’ या देशाच्‍या आस्‍थेचा आत्‍मा आहेत. देशाच्‍या कानाकोपर्‍यात, घराघरात त्‍यांचे नामस्‍मरण केले जाते. लहान मुलांच्‍या तोंडीही प्रभु श्रीरामचंद्रांचे नाव आपसूक येते. मध्‍यप्रदेशाच्‍या सागर जिल्‍ह्यातील सेंट जोसेफ स्‍कूल येथे अशीच घटना घडली. मोकळ्‍या वेळेत विद्यार्थी ‘जय श्रीराम’च्‍या घोषणा देत होते. त्‍यानंतर शाळेने यातील ३० विद्यार्थ्‍यांना दोषी ठरवत त्‍यांच्‍यावर कारवाई केली.

६. ‘जय श्रीराम’ म्‍हणणार्‍या दोन विद्यार्थ्‍यांनाही मारहाण !

देहलीतील किडवईनगर येथील सेंट थॉमस स्‍कूलमध्‍येही दोन विद्यार्थी मधल्‍या सुट्टीमध्‍ये जेवत असतांना ‘जय श्रीराम’ म्‍हणाले. यामुळे शिक्षकाने त्‍यांना बेदम मारहाण केली होती. त्‍यामुळे ‘हिंदु सण-श्रद्धा यांविरोधात पद्धतशीरपणे वातावरण निर्माण केले जात आहे कि काय’, असा संशय यावा, अशा घटना घडत आहेत.

६. कपाळाला गंध लावलेल्‍या मुलाला शाळेतून काढण्‍यास शिक्षकांकडून दबाव !

राजस्‍थानच्‍या भिलवाडा येथील सेंट एल्‍सेम स्‍कूलमध्‍ये किशन माली या विद्यार्थ्‍याला मारहाण करून शिक्षा दिली; कारण तो श्रावण मासात पूजा केल्‍यानंतर शाळेत कपाळावर गंधाष्‍टक लावून येत असे. शिक्षकांनी त्‍याच्‍या पालकांवर दबाव आणला की, मुलाचा शाळेतील दाखला घेऊन त्‍याचे नाव शाळेतून काढून टाका.

७. ख्रिस्‍ती धर्माची शिकवण घेण्‍यासाठी पालकांना करारावर स्‍वाक्षरी करावी लागणे

कर्नाटकच्‍या क्‍लैरेंस हायस्‍कूलमध्‍ये विद्यार्थ्‍यांनी शाळेत प्रवेश घेण्‍यापूर्वी त्‍यांच्‍या पालकांना एका करारावर स्‍वाक्षरी करावी लागे. यामध्‍ये ‘पाल्‍यांना ‘हिम्‍स’ (ख्रिस्‍ती धार्मिक गीत) आणि ‘स्‍क्रीप्‍चर’ (बायबलचे पाठ) हे शिकणे सक्‍तीचे आहे’, असे सांगितले गेले.

८. हिंदु विद्यार्थ्‍यांच्‍या हातावरील राख्‍या कापल्‍या !

उत्तरप्रदेशातील बरेली येथील होली फॅमिली कॉन्‍व्‍हेंट स्‍कूल येथे रक्षाबंधनाच्‍या निमित्त मुले हातात राखी आणि रक्षासूत्र बांधून आली होती. शाळेने त्‍यांच्‍या हातातील राख्‍या कापून टाकल्‍या. ‘हिंदु धर्माचे विज्ञापन येथे करायचे नाही’, असेही म्‍हटले गेले.

९. टिकली लावणार्‍या विद्यार्थिनींना शिक्षा केली जाणे

दिवा (ठाणे) येथे सिम्‍बॉयसिस कॉन्‍व्‍हेंट स्‍कूलमधली घटना बरीच क्‍लेशदायक ! कपाळाला टिकली लावलेल्‍या विद्यार्थिनींना एका बाजूला उभे केले जायचे. त्‍यांना शिक्षा केली जायची. कुणाला ६० ते ७० उठाबशा काढणे, कुणाला गुडघ्‍यावर अर्धा घंटा चालणे, तर कुणाला मैदानामध्‍ये पाच ते सहा वेळा फेर्‍या मारणे. स्‍थानिक आगरी-कोळी संघटना आणि विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल यांनी या संतापजनक प्रकाराविषयी शाळेला माफी मागायला लावली आणि हा प्रकार बंद केला.

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, ३.९.२०२३)

संपादकीय भूमिका

हिंदूंनो, आपली भावी पिढी हिंदु म्‍हणून रहाण्‍यासाठी आतापासूनच त्‍यांना धर्मशिक्षण द्या !