औषध खरेदीच्‍या निविदा प्रक्रियेतील विलंबामुळे डिसेंबरच्‍या शेवटपर्यंत क्षयरोगावरील औषधे मिळणे अवघड !

क्षयरोगाच्‍या संदर्भात काम करणार्‍या संस्‍था आणि आधुनिक वैद्य यांचे मत !

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – क्षयरोगाच्‍या औषधांसाठी केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने निधी उपलब्‍ध केला आहे; पण तरीही औषधांचा तुटवडा संपलेला नाही. देशासह राज्‍यात क्षयरोगावर पुरेशी औषधे उपलब्‍ध नाहीत. राज्‍यात तर केवळ १ मास पुरतील, इतकाच साठा उपलब्‍ध आहे, असे वास्‍तव आरोग्‍य कार्यकर्त्‍यांनी निदर्शनास आणून दिले आहे. प्रत्‍यक्षात क्षयरोगाच्‍या औषधांचा साठा उपलब्‍ध असल्‍याचे केंद्रीय मंत्रालयाकडून सांगण्‍यात येत आहे; मात्र केंद्रीय मंत्रालयाने औषध खरेदीसाठीची निविदा प्रक्रिया ऑगस्‍टमध्‍ये चालू केली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन औषधे गोदामात येणे, तेथून त्‍यांचे वितरण राज्‍य स्‍तरावर होणे, तेथून जिल्‍हानिहाय केंद्रापर्यंत औषधे पोचणे आणि त्‍यानंतर प्रत्‍यक्ष क्षयरोग केंद्रापर्यंत औषधे उपलब्‍ध होण्‍यासाठी २-३ मास लागण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे डिसेंबरच्‍या शेवटपर्यंत औषधे मिळणे अवघड आहे’, असे क्षयरोगाच्‍या संदर्भात काम करणार्‍या विविध संस्‍था, समन्‍वयक, आधुनिक वैद्य यांच्‍याकडून सांगण्‍यात येत आहे.

क्षयरोगावरील औषधे म्‍हणजे जीवन-मृत्‍यूचा प्रश्‍न ! – गणेश आचार्य, कार्यकर्ता

‘क्षयरोगावरील औषधे शेवटच्‍या केंद्रापर्यंत पोचण्‍याची लांबलचक प्रक्रिया आहे. केंद्र सरकार औषधे खरेदी करण्‍यासाठी निविदा काढते. ही प्रक्रिया रुग्‍णांच्‍या हातात असली पाहिजे. ‘ही औषधे म्‍हणजे जीवन-मृत्‍यूचा प्रश्‍न आहे’, असे मत क्षयरोग कार्यकर्ता गणेश आचार्य यांनी व्‍यक्‍त केले.

संपादकीय भूमिका

  • रुग्‍णांच्‍या संदर्भात इतका अक्षम्‍य हलगर्जीपणा का ? औषधे समयमर्यादेत मिळण्‍यासाठी निविदा प्रक्रियेस कधी प्रारंभ करावा, ते सरकारने ठरवले नाही का ?
  • औषधांअभावी क्षयरोग एखाद्याच्‍या जिवावर बेतल्‍यास त्‍याला उत्तरदायी कोण ?