गोव्यात ६०० बसगाड्यांचा तुटवडा असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर ताण

बसगाड्यांच्या तुटवड्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर आलेला ताण !

पणजी, २२ सप्टेंबर (वार्ता.) – राज्यात ६०० बसगाड्यांचा तुटवडा असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर ताण आलेला आहे. राज्यात सद्यःस्थितीत एकूण १ सहस्र ४०० खासगी आणि ५२० कदंब महामंडळाच्या बसगाड्या मिळून एकूण १ सहस्र ९२० बसेस आहेत.

राज्य सरकारने वर्ष २०२१ मध्ये सार्वजनिक वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी देहलीस्थित सल्लागाराची नेमणूक केली होती. या वेळी या सल्लागाराने वर्ष २०२१ मध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुदृढ करण्यासाठी एकूण २ सहस्र ५०० बसगाड्यांची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. यामुळे सद्यःस्थितीत राज्यात ६०० बसगाड्यांचा तुटवडा आहे, तसेच कोरोना महामारीनंतर खासगी बसगाड्या ३० ते ४० टक्क्यांनी अल्प झालेल्या आहेत. यामुळे एकूण बसगाड्यांची संख्या उणावली आहे. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यावर सरकार भर देत आहे. सल्लागाराने केलेल्या सूचनांची सरकार कार्यवाही करत आहे. सरकारने नुकतीच चालू केलेली ‘माझी बस’ योजना बंद असलेल्या खासगी बसगाड्या पुन्हा चालू करणे, हाच आहे. राज्यातील अनेक भागांत अजूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पोचलेली नाही. स्थानिक आमदार वारंवार गावामध्ये बसगाड्या चालू करण्याची मागणी करत आहेत; मात्र बसगाड्यांच्या कमतरतेमुळे ही मागणी पूर्ण झालेली नाही.