छत्रपती शिवरायांचे महत्व जाणणारे आणि लोकमान्‍य टिळक यांना साहाय्य करणारे रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) !

आज गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांच्‍या ८२ व्‍या स्‍मृतीदिन निमित्ताने विनम्र अभिवादन !

रवींद्रनाथ ठाकूर (टागोर)

१. बंगाली जनतेला प्रेरणा देण्‍यासाठी छत्रपती शिवरायांचे व्‍यक्‍तीमत्त्व बंगालीतून मांडणे

‘रवींद्रनाथांनी मुंबईवर ‘बोम्‍बई शहर’, असा एक निबंधच लिहिला. यात त्‍यांनी लिहिले, ‘मुंबईत दानाविषयी मात्र एक मुक्‍तहस्‍तता आहे. बंगालमध्‍ये सर्वांत अल्‍प दान मिळते.’ रवींद्रनाथांनी बंगालीजनांना प्रेरणा मिळावी, यासाठी छत्रपती शिवरायांचे असामान्‍य व्‍यक्‍तीमत्त्व बंगालीतून त्‍यांच्‍यासमोर मांडले. छत्रपती शिवरायांनी ज्‍या स्‍वराज्‍य धर्माच्‍या प्रतिष्‍ठापनेसाठी आयुष्‍य वेचले, त्‍याचाच उद़्‍घोष रवींद्रनाथांनी आपल्‍या काव्‍यातून केला.

२. लोकमान्‍य टिळक यांचे स्‍वराष्‍ट्रप्रेम आणि रवींद्रनाथ टागोर यांच्‍या विद्वत्तेविषयी परस्‍परांच्‍या मनात नितांत आदर !

वर्ष १८९८ मध्‍ये पुण्‍यात आलेल्‍या प्‍लेगच्‍या साथीत अनेक नागरिकांचा मृत्‍यू झाला. यामुळे व्‍यथित होऊन इंग्रज अधिकार्‍यांच्‍या वृत्तीची निर्भत्‍सना करणारा लेख रवींद्रनाथ यांनी त्‍यांच्‍या ‘भारती’ मासिकात लिहिला होता. त्‍याच वर्षी लोकमान्‍य टिळक यांना दीड वर्षाची शिक्षा झाली होती. तेव्‍हा टागोर यांनी टिळक यांच्‍या खटल्‍यासाठी बंगाली जनतेकडून साहाय्‍य म्‍हणून पैसा गोळा करून तो पुण्‍याला पाठवला होता. लोकमान्‍य टिळक यांच्‍या स्‍वराष्‍ट्रप्रेमाविषयी रवींद्रनाथ यांच्‍या मनात, तर  टिळक यांनाही रवींद्रनाथ यांच्‍या विद्वतेविषयी नितांत आदर होता.’

(साभार : दैनिक ‘तरुण भारत’, २.५.२०११)