जम्मू-काश्मीरवासीय आता मुक्त जीवन जगत आहेत !

कलम ३७० रहित होऊन ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचे प्रतिपादन

जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा

श्रीनगर – जम्मू-काश्मीरवासीय आता त्यांच्या इच्छेनुसार मुक्त जीवन जगत आहेत. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रहित केल्याचा हा परिणाम आहे, असे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केले.

५ ऑगस्ट २०१९ या दिवशी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रहित करण्याचा धडक निर्णय घेतला. त्याला ५ ऑगस्ट २०२३ या दिवशी ४ वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्‍वभूमीवर सिन्हा पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारने कलम ३७० रहित केल्यानंतर जम्मू-काश्मीर-लडाख या राज्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन केले.

सिन्हा पुढे म्हणाले, ‘‘पूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत आतंकवादी आणि फुटीरतावादी यांनी पुकारलेल्या संपामुळे शाळा, महाविद्यालये आणि व्यवसाय वर्षांत अनुमाने १५० दिवस बंद असायचे. तो काळ आता संपला आहे. कलम ३७० रहित केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सर्वसामान्य लोक आता त्यांच्या इच्छेनुसार जगत आहेत. रस्त्यावरचा हिंसाचार संपला आहे. काश्मीरमधील तरुण आता रात्री उशिरा बाहेर फिरण्याचा आनंद घेत आहेत. ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत नुकतेच नूतनीकरण केलेला झेलम नदीकाठ आणि ‘पोलो व्ह्यू मार्केट’ येथे लोक भयमुक्त वातावरणात फिरू शकत आहेत. काश्मिरी तरुणांच्या स्वप्नांना पंख फुटले असून राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान अन्य कुणापेक्षाही अल्प नसेल. गेल्या वर्षी प्रशासनाने जम्मू-काश्मीरमध्ये ५ ऑगस्ट हा ‘भ्रष्टाचारमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्यास आरंभ केला आहे. भ्रष्टाचाराच्या या कर्करोगावर उपचार करणे फार महत्त्वाचे असल्याचे माझ्यापेक्षा जनता अधिक चांगल्या प्रकारे जाणते.’’