यंदाचा अधिक श्रावण मास ग्रहशांतीसाठी विशेष उपयुक्‍त

सध्‍या चालू असलेल्‍या अधिक मासाच्‍या निमित्ताने…

१. ‘अधिक मास’ किंवा ‘पुरुषोत्तम मास’ म्‍हणजे काय ?

‘ज्‍योतिषशास्‍त्रामध्‍ये सूर्यमानानुसार एका वर्षात ३६५ दिवस, १५ घटी, ३१ पल आणि ३० विपल असतात, तर चंद्रमानानुसार एका वर्षात ३५४ दिवस, २२ घटी, १ पल आणि २३ विपल असतात. अशाप्रकारे, आपल्‍याला असे आढळून येते की, एका वर्षाच्‍या चक्रामध्‍ये सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यांच्‍यात अनुमाने ११ दिवसांचा फरक आहे. हेच कारण आहे की, हिंदु कालगणनेमध्‍ये प्रत्‍येक ३ वर्षांनी क्रमाने कोणत्‍याही एका चांद्रमासाची पुनरावृत्ती करून एका अतिरिक्‍त मासाने सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यांमध्‍ये आलेला हा फरक न्‍यूनतम केला जातो. या अतिरिक्‍त मासाला ‘अधिक मास’ किंवा ‘पुरुषोत्तम मास’ असे म्‍हणतात. त्‍यामुळे सौर वर्ष आणि चांंद्र वर्ष यांच्‍यात एका अंशापर्यंत सामंजस्‍य राखले जाते अन् मानव समाजाला काळाशी संबंधित सूर्यमान आणि चंद्रमान यांचा योग्‍य लाभ मिळत रहातो; कारण ज्‍योतिषशास्‍त्रानुसार सूर्य हा आपला आत्‍म्‍याचा आणि चंद्र हा आपल्‍या मनाचा कारक मानला जातो. अशा रितीने आत्‍मा म्‍हणजेच परलोक आणि मन म्‍हणजे इहलोक यांचा सुसंवाद साधला जातो अन् मनुष्‍याला जीवनात दोन्‍ही प्रकारच्‍या फलनिष्‍पती प्राप्‍त होतात.

आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र

२. अधिक मास शुभ कि अशुभ ?

अधिक मास शुभ कि अशुभ असण्‍याच्‍या संदर्भात एक कथा उल्लेखनीय आहे. ४ युगे, १२ मास, षड्‍ऋतू आणि सर्व दिवस यांचे कारक देव आहेत; परंतु जेव्‍हा काळाच्‍या गणनेमध्‍ये अधिक मासाचे प्रयोजन करण्‍यात आले, तेव्‍हा त्‍याला ‘मलमास’ म्‍हणजे अस्‍वीकारार्ह आणि ताज्‍य समजून तिरस्‍कृत करण्‍यात आले. त्‍यामुळे अधिक मासात अतिशय दुःखी झाला. तो भगवान श्रीहरि विष्‍णूंकडे गेला आणि प्रार्थनापूर्वक त्‍याने त्‍याची वेदना सांगितली. भगवान श्रीहरि विष्‍णु अधिक मासाला म्‍हणाले, ‘‘तू दुःखी होऊ नकोस. पुरुषांमध्‍ये सर्वश्रेष्‍ठ असल्‍याने माझे एक नाव पुरुषोत्तम आहे आणि आजपासून तुला ‘पुरुषोत्तम मास’ म्‍हणून ओळखले जाईल. या पुरुषोत्तम मासात केलेले शांती कर्म आणि इतर प्रापंचिक कर्मे माझ्‍याशी संबंधित समजली जातील, तसेच ती शाश्‍वत आणि श्रेष्‍ठ असतील.’’

३. पुरुषोत्तम मासामध्‍ये काय करावे ?

व्‍यावहारिक दृष्‍टीकोनातून कर्माचे दोन प्रकार आहेत,

अ. पौष्‍टिक कर्म, म्‍हणजे सांसारिक व्‍यवहाराशी संबंधित कर्मे

आ. ‘शांती कर्म’, म्‍हणजे परलोकिक किंवा धार्मिक-आध्‍यात्‍मिक कर्म.

अधिक मासामध्‍ये ‘शांती कर्म’, म्‍हणजे धार्मिक कर्म उदा. व्रत, उपवास, जप, ध्‍यान, उपासना, नि:स्‍वार्थ यज्ञ मोठ्या उत्‍साहाने केले पाहिजेत. त्‍यात तीर्थयात्रा आणि गंगास्नान करावे. थोर महापुरुष आणि संत यांच्‍या सहवासात सत्‍संग करावा. उपासना आणि ध्‍यान यांविषयी आत्‍मचिंतन करावे. अधिक मासात दान करणे विशेष महत्त्वाचे आहे. धर्मकार्य आणि मुमुक्षेकडे चिकाटी असावी. अधिक मासात दिवा आणि ध्‍वज यांचे दान करावे. श्रीराम कथावाचन, भागवत कथावाचन, श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेचा पुरुषोत्तम अध्‍याय या १४ व्‍या अध्‍यायाचे पठण आणि सत्‍संग करणे पुण्‍यकारक मानले जाते. भगवान श्रीहरि विष्‍णूंची या अधिक मासात विशेष पूजा करावी आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप अधिकाधिक करावा.

४. पुरुषोत्तम मासात काय करू नये ? 

अ. अधिकमासामध्‍ये ‘पोषक कार्य’, म्‍हणजे सांसारिक व्‍यवहाराशी संबंधित कार्य जसे की, विवाह, गृहप्रवेश, उपनयन, मुंडन इत्‍यादी शुभ कार्ये करू नयेत.

आ. अपवित्र वर्तन टाळावे.

इ. अखाद्य आणि अपेय वस्‍तूंचे सेवन करू नये.

ई. अधिक मासात नवीन कामाचा शुभारंभ करू नये. तथापि, निःस्‍वार्थपणे समाजोपयोगी कार्य करण्‍यास मनाई नाही.

उ. कपडे, दागिने, घर, दुकान, वाहन इत्‍यादी खरेदी करू नये. मासाच्‍या मध्‍यभागी शुभमुहूर्त असल्‍यास ज्‍योतिषाच्‍या सल्‍ल्‍याने दागिन्‍यांची खरेदी करता येते.

५. यंदाच्‍या पुरुषोत्तम मासाचे विशेष महत्त्व 

यावर्षी अधिक मास म्‍हणून श्रावण मासाची पुनरावृत्ती होत आहे आणि याच श्रावण मासापासून साधनेला पूरक पवित्र चातुर्मासही चालू होत आहे. श्रावण मास हा स्‍वत:च अतिशय पवित्र आहे; कारण हा देवाधिदेव भगवान शंकराशी संबंधित आहे, तसेच अधिक मासाच्‍या रूपात पुरुषोत्तम मासाला भगवान श्रीहरि विष्‍णूंचा विशेेष आशीर्वाद लाभला आहे. त्‍यामुळे या वेळी श्रावण मास विशेषत: ‘हरि’ आणि ‘हर’ या दोन्‍हींशी संबंधित आहे, असे म्‍हणता येईल. ज्‍योतिषशास्‍त्रामध्‍ये देवाधिदेव महादेव भगवान शंकराला ‘ग्रहाध्‍यक्ष’, म्‍हणजेच ‘ग्रहांचा स्‍वामी’ म्‍हटले गेले आहे. त्‍यामुळे यंदाचा अधिक श्रावण मास ग्रहशांतीसाठी विशेष उपयुक्‍त आहे.’

– आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, सभापती (एशिया चॅप्‍टर), विश्‍व ज्‍योतिष महासंघ, पाटलीपुत्र, बिहार. (१३.७.२०२३)

अलीकडे एक नवीन पद्धत निघाली आहे की, अधिक मासात मुलीने आईची ओटी भरावी. असे करू नये. याला कोणताही शास्‍त्राधार नाही. आपली भावना कितीही चांगली असली, तरी चुकीच्‍या काळात आणि वेळी केलेली गोष्‍ट शुभ फळ देत नाही; पण अयोग्‍य कर्माचे फळ अशुभ असते. (२८.७.२०२३)