देशद्रोही साम्‍यवाद्यांच्‍या दृष्‍टीने मणीपूर हे अराजकता पसरवण्‍यासाठी फक्‍त एक निमित्त आहे…

‘मणीपूरवरील सामाजिक माध्‍यमांवरील वादळ आता शांत झाल्‍याचे दिसत आहे. गेल्‍या काही दिवसांत या घटनेने देशात प्रचंड खळबळ उडाली. ४ मे या दिवशी घडलेल्‍या अत्‍यंत भीषण आणि दुर्दैवी घटनेचा व्‍हिडिओ संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू होण्‍याच्‍या पूर्वसंध्‍येला १९ जुलैला प्रसिद्ध झाला. या लाजिरवाण्‍या घटनेचा आधार घेत मणीपूरच्‍या मुख्‍यमंत्र्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नंतर रा.स्‍व. संघावर टीका केला जात आहे. २२ जुलैपर्यंत सर्व साम्‍यवाद्यांनी (डाव्‍यांनी) मणीपूरमधील लज्‍जास्‍पद घटना संघाच्‍या स्‍वयंसेवकांनी घडवून आणल्‍याच्‍या अफवा पसरवल्‍या गेल्‍या. कुठे तरी मणीपूरमधील २ संघ स्‍वयंसेवकांचे संघाच्‍या गणवेशातील पूर्वी प्रसिद्ध झालेले छायाचित्र देशभरात सर्व भाषांमध्‍ये प्रसारित करून ‘त्‍या दोघांच्‍या नेतृत्‍वाखाली ही घटना घडली’, अशी आरडाओरड केली.

१. निर्बुद्ध साम्‍यवाद्यांच्‍या ‘इकोसिस्‍टीम’ने छायाचित्र प्रसारित केलेले २ स्‍वयंसेवक कोण ?

(इकोसिस्‍टिम म्‍हणजे साम्‍यवाद्यांनी विरोधकांना शह देण्‍यासाठी विविध स्‍तरांवर राबवलेली कार्यप्रणाली)

या छायाचित्रामध्‍ये मणीपूरमधील भाजपचे प्रदेश उपाध्‍यक्ष चिदानंद सिंह आणि त्‍यांचा मुलगा त्‍यांच्‍या समवेत आहे. या दोघांचा या घटनेशी काहीही संबंध नाही. जेव्‍हा त्‍यांनी अशा खोट्या ट्‍वीटविषयी पोलिसांकडे तक्रार केली, तेव्‍हा साम्‍यवादी नेत्‍या सुभाषिनी अली यांनी त्‍यांच्‍या ट्‍विटरवर लिहिले, ‘हे चुकीचे आहे. मनापासून माफी (क्षमा) मागते.’ संघावर खोटे आरोप करून आणि वादळ निर्माण करून, या दोघा मान्‍यवर पिता-पुत्रांची अपकीर्ती करून त्‍यानंतर कायदेशीर कारवाईची भीती वाटल्‍यामुळे केवळ क्षमायाचना करणे पुरेसे आहे का ?

२. साम्‍यवाद्यांच्‍या ‘इकोसिस्‍टिम’ने भारतीय पोलिसांच्‍या विरोधात लेख लिहून रचलेले षड्‍यंत्र !

मार्क्‍सवादी, साम्‍यवादी आणि डावे उदारमतवादी यांचा हा खेळ आजचा नाही. ते नेहमीच भारतीय लोकशाहीशी असा खेळ खेळत आले आहेत. यासाठी पूर्वीचा अनुभव सांगतो –

३ वर्षांपूर्वीचा कोरोना महामारीचा काळ आठवा. अभूतपूर्व दळणवळण बंदी ! सर्व व्‍यवहार ठप्‍प. रेल्‍वे आणि हवाई सेवाही ठप्‍प. मे मासाच्‍या कडक उन्‍हात लाखो कामगार आपापल्‍या घराच्‍या दिशेने पायीच रस्‍त्‍यावर निघालेले ! असे असूनही कुठेही असंतोष दिसत नाही. व्‍यवस्‍थेच्‍या विरोधात कुणी बोलत नाही. याउलट पोलिसांची जी भयाण प्रतिमा आपल्‍या सर्वांच्‍या मनात भरलेली होती, तिचे तुकडे तुकडे झाले. पोलीस-प्रशासन हे सर्वसामान्‍यांचे सर्वांत मोठे साहाय्‍यक ठरलेे. लोक रात्रंदिवस कर्तव्‍यावर असलेल्‍या पोलीस हवालदारांना ‘चहा-पाणी-बिस्‍किटे हवीत का ?’ वगैरे विचारत होते. पोलीसही भावनिक होऊन जनतेच्‍या सेवेत गुंतले होते. सर्वाधिक प्रसारित झालेले छायाचित्र आठवा, ज्‍यात एक पोलीस हवालदार घरी जातांना एका कामगाराच्‍या पायाला मलम लावत आहे.

२ अ. साम्‍यवाद्यांच्‍या ‘इकोसिस्‍टिम’ने अमेरिकेतील घटनेचा भारतियांना पोलिसांच्‍या विरोधासाठी संबंध जोडणे

येथूनच साम्‍यवाद्यांच्‍या इकोसिस्‍टिमचा खेळ चालू झाला. पोलीस-प्रशासन आणि सामान्‍य जनता यांचे इतके गोड नाते ? हे कसे चालेल ? पोलिसांकडे केवळ खलनायक म्‍हणून पाहिले गेले पाहिजे आणि या साम्‍यवाद्यांच्‍या ‘इकोसिस्‍टीम’ला कारण मिळते ते अमेरिकेत ! २५ मे २०२० या दिवशी मिनियापोलिस, मिनेसोटा या अमेरिकेच्‍या शहरात जॉर्ज फ्‍लॉईड या कृष्‍णवर्णीय नागरिकाचा डेरेक चौविन या गोर्‍या पोलीस अधिकार्‍याने गुडघ्‍याने मान दाबून ठेवून हत्‍या केली. याच्‍या निषेधार्थ अमेरिकेत ‘ब्‍लॅक लाईव्‍हज मॅटर’ आंदोलन चालू होते. आता या आंदोलनाचा भारताशी काय संबंध ? साम्‍यवाद्यांचा गट त्‍याला भारताच्‍या व्‍यवस्‍थेशी जोडतो. भारतियांना पोलीस-प्रशासनाच्‍या विरोधात उभे करण्‍यात या लोकांनी पूर्ण भर दिला.

२ आ. साम्‍यवाद्यांनी भारतातील पोलिसांच्‍या विरोधात कथितपणे लिहिलेले लेख –

२ आ १. जॉर्ज फ्‍लॉईडच्‍या मृत्‍यूच्‍या एका आठवड्याच्‍या आत हे चालू होते. १ जून या दिवशी ‘द वायर’ नियतकालिकामध्‍ये एक मोठा लेख प्रसिद्ध झाला – ‘भारतीय लोक पोलिसांच्‍या क्रूरतेविरुद्ध रस्‍त्‍यावर का उतरत नाहीत ?’ कोरोना महामारीच्‍या त्‍या काळात या देशात पोलिसांची कोणती क्रूरता घडत होती ?

२ आ २. ३ जून या दिवशी रुचिका जोशी यांचा एक मोठा लेख ‘Scroll.in’ या नियतकालिकामध्‍ये प्रसारित झाला, ‘यू.एस्. प्रोटेस्‍ट्‍समध्‍ये भारतियांसाठी धडे, जे सामूहिक प्रतिकाराच्‍या शक्‍यतांवर विश्‍वास ठेवतात.’ त्‍या पुढे लिहितात, ‘हिंदू बहुसंख्‍य भारतातील मुसलमानांवर होणार्‍या दडपशाहीत पोलीस महत्त्वाचा घटक आहे.’

२ आ ३. त्‍यानंतर प्रकाश कुमार यांचा लेख ‘Foreign Policy.com’ वर आला (आपल्‍यापैकी अनेकांनी यांचे नाव ऐकले नसेल; पण विविध देशांतील परराष्‍ट्र सेवेतील अधिकार्‍यांमध्‍ये यांचे लेख वाचले जातात) – ‘भारतीय जॉर्ज फ्‍लॉईडला पाठिंबा देत आहेत आणि त्‍यांच्‍याच देशात पोलिसांच्‍या क्रूरतेकडे मात्र दुर्लक्ष करत आहेत.’

यात ते काय लिहितात ? हे पहाणे आवश्‍यक आहे, ‘अमेरिकेतील निदर्शने जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतही एक अस्‍वस्‍थ प्रश्‍न उपस्‍थित करतात. भारतात पोलिसांच्‍या अत्‍याचारांच्‍या वारंवार घडणार्‍या घटनांविषयी मोठ्या प्रमाणात निदर्शने का होत नाहीत ?’ ‘कॉमन कॉज’ नावाच्‍या स्‍वयंसेवी संस्‍थेने केलेल्‍या सर्वेक्षणाचा उल्लेख करून ते लिहितात, ‘भारतातील ५० टक्‍के पोलिसांना असे वाटते की, मुसलमान समुदायात मोठ्या प्रमाणात गुन्‍हेगार आहेत.’

२ आ ४. आता ८ जून या दिवशी अरुंधती रॉय यांनीही भारतविरोधी मोहिमेत उडी घेतली. परदेशात डाव्‍यांच्‍या (साम्‍यवाद्यांच्‍या) वर्तुळात लोकप्रिय असलेल्‍या ‘दलित कॅमेरा’ या ‘वेबपोर्टल’ला दिलेल्‍या मुलाखतीत रॉय म्‍हणतात, ‘काळ्‍या लोकांविषयीचा भारतीय वर्णद्वेष हा गोर्‍या लोकांच्‍या वर्णद्वेषापेक्षा वाईट आहे.’ या संपूर्ण मुलाखतीत या महिलेने ‘दलित आणि मुसलमान यांच्‍याविषयी हिंदूंचा द्वेष कसा आहे ?’, हे स्‍पष्‍ट केले आहे. रॉय या भारतात ‘#DalitLivesMatter’च्‍या आवश्‍यकतांविषयीही बोलतात. पुतळ्‍यांच्‍या विटंबनेविषयी त्‍या म्‍हणतात, ‘गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत कृष्‍णवर्णीय आफ्रिकनांवर वर्णद्वेषी टीका केली होती. त्‍यामुळे त्‍यांच्‍या पुतळ्‍याची विटंबना करण्‍यात आली.’

२ आ ५. लगेचच ९ जून या दिवशी ‘द वायर’ नियतकालिकात दिव्‍या चेरियनचा एक दीर्घ लेख प्रसारित झाला – ‘ब्‍लॅक लाइव्‍ह्‍स मॅटर प्रोटेस्‍ट्‍सद्वारे भारत पहाणे !’ यामध्‍ये दिव्‍या लिहितात, ‘या घटना भारताशी समांतर आहेत. घटनात्‍मक आणि कायदेशीर अधिकारांचा (अल्‍पसंख्‍यांकांचा) आदर करण्‍यात पोलीस अपयशी ठरत आहेत अन् ‘एक राष्‍ट्रीय नेता’ आहे, जो अल्‍पसंख्‍यांक आणि असंतुष्‍टांशी वैर धरून आहे.

२ आ ६. १७ जून या दिवशी ‘द डिप्‍लोमॅट’ नियतकालिकामधील सुरभी सिंह यांच्‍या लेखाचे शीर्षक आहे – ‘ब्‍लॅक लाइव्‍ह्‍स मॅटर’ हा भारतासाठी ‘वेक-अप कॉल’ (भारतियांनी जागे होण्‍यासाठी) असावा.’ यामध्‍ये सुरभी ‘भारतात मुसलमानांशी भेदभाव होत आहे’, असे आवर्जून सांगतात. त्‍या लिहितात, ‘धार्मिक अल्‍पसंख्‍यांक आणि विशेषतः मुसलमान ‘आतंकवादी’, ‘जिहादी’ आणि ‘पाकिस्‍तानी’ यांसारख्‍या अपमानाचे लक्ष्य बनले आहेत, तसेच जे अल्‍पसंख्‍यांकांच्‍या समर्थनार्थ बोलतात, त्‍यांना ‘देशद्रोही’ म्‍हणून संबोधले जाते.’

२ आ ७. २१ जून या दिवशी ‘द प्रिंट’ या नियतकालिकाच्‍या हिंदी आवृत्तीत कांचा इलय्‍या आणि शेफर्ड यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे, ज्‍यात डाव्‍यांचा हेतू स्‍पष्‍टपणे नमूद केला आहे. या लेखाचे शीर्षक आहे, ‘भारतातील जातीविरोधी चळवळीला चालना देण्‍यासाठी ‘ब्‍लॅक लिव्‍ह्‍स मॅटर’सारखी आग आवश्‍यक, तरच मुख्‍य खलनायकाशी लढा देता येईल. (त्‍यांचा मुख्‍य खलनायक पोलीस-प्रशासन आहे.)

३. साम्‍यवाद्यांचे षड्‍यंत्र : भारतात अराजकता पसरवणे

हे सर्व कालक्रमानुसार वाचल्‍यावर कोणते चित्र समोर येते ? ‘वायर’, ‘स्‍क्रोल’, ‘प्रिंट’ या सर्व साम्‍यवादी माध्‍यमांना या देशात केवळ अराजकता पसरवायची आहे. भारतीय पोलिसांच्‍या तथाकथित क्रूरतेचे विकृत चित्र संपूर्ण जगासमोर उभे करायचे आहे. कोरोना महामारीच्‍या ३ मासांच्‍या कालावधीत दिसून आलेला भारतीय पोलिसांचा सकारात्‍मक चेहरा या लोकांना नष्‍ट करायचा आहे. जगाच्‍या विविध व्‍यासपिठांवरून खोटेपणाचे बंडल घेऊन हे सर्व साम्‍यवादी लेखक एका पाठोपाठ एक हंबरडा फोडत आहेत. ‘या रेकण्‍याने असत्‍य सत्‍यात पालटेल’, असे साम्‍यवादी बिनडोकांना वाटते; पण या पालटलेल्‍या भारतात आता असे होणार नाही. साम्‍यवादी नेत्‍या सुभाषिनी अली यांनाही ते कळले असेल…!’

लेखक : श्री. प्रशांत पोळ

(साभार : ‘विश्‍व संवाद केंद्र’चे संकेतस्‍थळ, २७.७.२०२३)

संपादकीय भूमिका 

देशविघातक कृत्‍यांत गुंतलेल्‍या साम्‍यवादी संघटनांवर सरकारने तात्‍काळ बंदी आणणे देशहिताचे आहे !