अहिल्‍यानगर येथे मुसलमान महिलेकडून हिंदु मुलींच्‍या धर्मांतराचा प्रयत्न !

  • भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्‍याकडून विधानसभेत सूत्र उपस्‍थित !
  • पोलिसांकडून हिंदु युवकांना अमानुष मारहाण करून त्‍यांच्‍यावर खोटे गुन्‍हे नोंद !

मुंबई – अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील राहुरी तालुक्‍यातील उंबरे गावात एक मुसलमान महिला हिंदु मुलींचे धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न करत आहे. याची माहिती उघड करणार्‍या हिंदु युवकांना अमानुष मारहाण करून पोलिसांनी त्‍यांच्‍या विरोधात खोटे गुन्‍हे नोंदवले आहेत, असे गंभीर सूत्र भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी औचित्‍याच्‍या सूत्राद्वारे २८ जुलै या दिवशी विधानसभेत उपस्‍थित केले. प्रश्‍नोत्तराच्‍या तासानंतर आत्‍यंतिक महत्त्वाच्‍या विषयावर सरकारचे लक्ष वेधण्‍यासाठी आयत्‍या वेळी मांडलेल्‍या सूत्राला ‘औचित्‍याचे सूत्र’ असे म्‍हणतात.

धर्मांतराच्‍या सूत्राविषयी अधिक माहिती देतांना लाड म्‍हणाले, ‘‘ज्‍या हिंदु मुलीने याला वाचा फोडण्‍याचा प्रयत्न केला, तिच्‍या आई-वडिलांना रात्री दीड वाजेपर्यंत पोलीस ठाण्‍याच्‍या बाहेर उभे करण्‍यात आले. या संदर्भात गृहविभागाने उच्‍चस्‍तरीय अन्‍वेषण करावे.’’

प्रसाद लाड यांनी सांगितलेली अन्‍य सूत्रे

१. आठवी इयत्तेत शिकणारी एक मुसलमान मुलगी हिना इरफान पठाण या धर्मांध शिक्षिकेकडे हिंदु मुलींना घरगुती शिकवणीसाठी घेऊन जात असे. ही शिक्षिका शिकवणीसाठी येणार्‍या हिंदु मुलींना इस्‍लाम आणि कुराण यांविषयी माहिती देऊन त्‍यांचे धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न करत असे.

२. ही शिक्षिका ईदच्‍या दिवशी या मुलींना धर्मांध युवकांसमवेत ‘सेल्‍फी’ (स्‍वत:चे छायाचित्र भ्रमणभाषद्वारे काढणे) काढण्‍यास सांगत असे. त्‍यानंतर ही छायाचित्रे ‘मॉर्फ’(मूळ छायाचित्रात छेडछाड करून खोटे छायाचित्र बनवणे) करण्‍यात येत असत. ‘ही छायाचित्रे सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करणार’, अशी हिंदु मुलींना धमकी देऊन त्‍यांना मुसलमान युवकांसमवेत बाहेर जाण्‍यासाठी बळजोरी करण्‍यात येत असे. या मुलींना नंतर गावातील मशिदीत नेले जात असे.

पोलिसांकडून हिंदु युवकांना अमानुष मारहाण !

१. या प्रकरणी एका हिंदु मुलीने वाचा फोडल्‍यावर गावकर्‍यांनी संबंधित शिक्षिकेला जाब विचारला असता पोलिसांकडून गावातील काही हिंदु युवकांवर मशिदीत तोडफोड केल्‍याचे खोटे गुन्‍हे नोंदवण्‍यात आले.

२. या प्रकरणाची माहिती घेणार्‍या एका हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या काही युवकांनी या प्रकरणाला वाचा फोडणार्‍या हिंदु मुलीस साई मंगल कार्यालयात अधिक माहिती घेण्‍यासाठी बोलावले होते.

३. ही गोष्‍ट पोलिसांना कळल्‍यावर त्‍यांनी पोलिसी बळाचा वापर करून हिंदु युवकांना अमानुष मारहाण केली. ही घटना साई मंगल कार्यालयाच्‍या ‘सी.सी.टी.व्‍ही.’त नोंद असल्‍याने पोलिसांनी तेथील ‘हार्डडीस्‍क’ काढून नेली.

४. या प्रकरणात या ठिकाणी उपस्‍थित नसणार्‍या २५ हिंदु युवकांना आरोपी बनवण्‍यात आले असून त्‍यांच्‍यावर खोटे गुन्‍हे नोंदवण्‍यात आले आहेत.

५. हे युवक त्‍या ठिकाणी नसल्‍याचे पुरावे पालकांकडे आहेत. तरी ‘या युवकांना पोलिसांनी आरोपी का बनवले ?’, हा गंभीर प्रश्‍न या निमित्ताने उपस्‍थित होतो.

६. २७ फेब्रुवारीला रामवाडी येथे दंगल झाली. त्‍यातही घटनास्‍थळी उपस्‍थित नसलेल्‍या हिंदु युवकांना आरोपी करण्‍यात आले. जे युवक हिंदुत्‍वाचे काम करतात, त्‍यांनाच आरोपी केले गेले.

या प्रकरणी लाड यांनी पुढील मागण्‍या केल्‍या –

१.  या संदर्भात उच्‍चस्‍तरीय अन्‍वेषण करून ‘आय.पी.एस्.’ अधिकार्‍यांकडून याचे अन्‍वेषण केले जावे.

२. या प्रकरणात ७ हिंदु मुलींचे धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न चालू होता; मात्र पोलिसांनी एकाच अल्‍पवयीन मुलीचा जबाब घेऊन तिच्‍या पालकांना रात्री दीड वाजेपर्यंत पोलीस ठाण्‍याच्‍या बाहेर ताटकळत ठेवले होते. याचे अन्‍वेषण करावे.

३. ज्‍यांच्‍या दबावाखाली पोलिसांनी खोटे गुन्‍हे नोंद केले आणि त्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी.

संपादकीय भूमिका

अशा गुंड पोलिसांवर सरकारने कारवाई करावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !