इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे वारकर्‍यांच्या आरोग्याला धोका ! – दिलीप मोहिते पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई, २६ जुलै (वार्ता.) – आळंदी तीर्थक्षेत्रातील इंद्रायणी नदीमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमधून शुद्धीकरण (‘फिल्टरेशन’) न करता सांडपाणी सोडले जात आहे. आळंदी येथे येणार्‍या लाखो भाविकांना हे दूषित पाणी प्यावे लागते. इंद्रायणी नदीच्या तीरावरील आळंदी, पिंपळी, मूळी आदी गावांतील ग्रामस्थांना दूषित पाणी मिळत आहे. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे वारकर्‍यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, अशी समस्या आळंदी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी २६ जुलै या दिवशी औचित्याच्या सूत्राच्या अंतर्गत विधानसभेत उपस्थित केली.


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे शुद्धीकरण न करता सांडपाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडले जाते. दूषित पाण्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ‘नमामि गंगा’ या अभियानाप्रमाणे ‘नमामि इंद्रायणी’ हे अभियान सरकारने घोषित केले आहे. त्यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे, अशी मागणी या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली.