‘तहलका’चे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना २ कोटी रुपयांचा दंड !

माजी सैन्याधिकार्‍यांची मानहानी केल्याचे २२ वर्षांपूर्वीचे प्रकरण

‘तहलका’चे मुख्य संपादक तरुण तेजपाल

नवी देहली – ‘तहलका’ नियतकालिकाचे मुख्य संपादक तरुण तेजपाल यांना मानहानीच्या प्रकरणी देहली उच्च न्यायालयाने दोषी ठरवून २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. निवृत्त मेजर जनरल एम्.एस्. अहलुवालिया यांच्या याचिकेवर हा निर्णय देण्यात आला. वर्ष २००२ मध्ये ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. मार्च २००१ मध्ये या नियतकालिकात एक वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. यात सैन्यातील एका भ्रष्टाचारामध्ये मेजर जनरल अहलुवालिया यांना मध्यस्थ असल्याचे म्हटले होते.

या याचिकेद्वारे अहलुवालिया यांनी ‘तहलका’ला क्षमा मागण्यास सांगितले होते. त्यावर न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणाला २२ वर्षे झाली आहेत. या काळात अहलुवालिया यांनी पुष्कळ काही सोसले आहे. त्यामुळे केवळ क्षमा मागण्याने काही लाभ होणार नाही. एखाद्या प्रमाणिक सैन्याधिकार्‍याची प्रतिमा अपकीर्त करणे, यापेक्षा अधिक लज्जास्पद घटना दुसरी कुठलीही नसेल.

संपादकीय भूमिका

मानहानीच्या प्रकरणात २२ वर्षांनंतर न्याय मिळणे, याचा अर्थ ‘इतकी वर्षे व्यक्तीची मानहानी होत रहाणे’, असाच होतो, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ?