शिक्षण विभागाकडून २७ शिक्षकांना नियुक्तीसाठी अंतिम संधी !

नवी मुंबई, २२ जुलै (वार्ता.) – महापालिका शाळेत तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक भरतीमध्ये निवड होऊनही जे शिक्षक अद्याप नियुक्ती पत्र घेण्यासाठी आले नाहीत, अशा २७ शिक्षकांना शेवटची संधी म्हणून एक नोटीस पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रेय घनवट यांनी दिली. या शिक्षक भरती प्रक्रियेत प्राथमिक आणि माध्यमिक विभागासाठी अद्यापपर्यंत १५१ शिक्षक उपस्थित झाले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ५३ प्राथमिक आणि २३ माध्यमिक शाळा असून या शाळांमध्ये तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक नियुक्ती करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे.

प्राथमिक विभागासाठी १२३ शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. तसेच माध्यमिक विभागासाठी ६० शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी १० जुलै या दिवशी इच्छुक उमेदवारांकडून कागदपत्रे घेण्यात आली. त्यानंतर त्यांची छाननी करून गुणक्रमानुसार (मेरीट) निवड आणि प्रतिक्षा सूची प्रसिद्ध करण्यात आली.