फ्रान्‍स आणि भारत येथे होणार्‍या जाळपोळीच्‍या घटनांमागील राजकारण…

‘अडकलेला पतंग आधी काढायला बघतात, नाहीच निघत म्‍हटल्‍यावर फाडायला निघतात’ – चंद्रशेखर गोखले.

या चारोळीतून मानवी वृत्तीचे एक सहज दर्शन होते. ‘एखादी गोष्‍ट माझी नाही, तर ती कुणाचीच होऊ शकत नाही’, ही माणसाची एक सहज प्रवृत्ती असते. त्‍याच प्रवृत्तीतून मग असूया, द्वेष आणि सूडाची भावना निर्माण होते. या भावनांना हवा मिळाली की, त्‍याचे वणव्‍यात रूपांतर व्‍हायला वेळ लागत नाही. अनेकदा दुर्लक्ष वा सहन केलेल्‍या किंवा लपलेल्‍या भावना राक्षस बनून बाहेर पडतात. त्‍यातून फक्‍त आणि फक्‍त विनाश होतो. त्‍यात स्‍वतःची किती हानी होते ? याचा अंदाज येईपर्यंत कृती झालेली असते. अगदी सामाजिक माध्‍यमांवर प्रतिदिन घडणार्‍या घटनांतून दिसणारी ही कृतीच जागतिक पटलावर घडणार्‍या घटनांना कारणीभूत ठरते आहे. यात २ देश प्रामुख्‍याने होरपळतांना दिसत आहेत. त्‍यातील एक आहे फ्रान्‍स, तर दुसरा आहे भारत. नक्‍की कशामुळे या सूडाच्‍या भावना निर्माण झाल्‍या ? त्‍यातून काय निष्‍पन्‍न होत आहे ? भविष्‍यात याचे दूरगामी परिणाम काय होणार ? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

फ्रान्‍समधील हिंसाचार आणि जाळपोळ यांचे संग्रहित छायाचित्र

१. फ्रान्‍समधील हिंसाचाराची पार्श्‍वभूमी आणि झालेला हिंसाचार

श्री. विनीत वर्तक

सध्‍या युरोपमधील फ्रान्‍स हा देशात घडणार्‍या जाळपोळीत पोळून निघाला आहे. हळूहळू याचे लोण आजूबाजूच्‍या देशात सुद्धा पसरायला लागले आहेत. जर्मनी, बेल्‍जियम आणि युनायटेड किंगडम या देशातही हिंसाचाराच्‍या घटना घडलेल्‍या आहेत. नक्‍की कशामुळे हे घडते आहे ? याचा मागोवा घेतला, तर त्‍याचे अनेक कंगोरे आपल्‍या हाताशी लागतील. तरीही या सगळ्‍या घटनांच्‍या मागे एक छुपे राजकारण आणि स्‍वार्थ लपलेला असतो, हे उघड आहे. फ्रान्‍समध्‍ये हिंसाचाराच्‍या घटनांचा उद्रेक व्‍हायला कारण होते एका १७ वर्षीय अल्‍जेरियन मुलावर पोलिसांनी केलेला गोळीबार ! ज्‍यात तो मुलगा मृत्‍यूमुखी पडला. ‘नाहेल’ नावाचा हा युवक फ्रान्‍समध्‍ये विस्‍थापित होऊन आला होता. त्‍याला फ्रान्‍सने नागरिकत्‍व दिलेले होते. २७ जून या दिवशी वाहतूक पोलिसांनी त्‍याला गाडी चालवतांना थांबवण्‍याचा प्रयत्न केला. त्‍याच्‍या गाडीची लायसेन्‍स प्‍लेटही (वाहन क्रमांक) चुकीची होती. पोलिसांच्‍या कारवाईपासून वाचण्‍यासाठी त्‍याने गाडी पळवण्‍याचा प्रयत्न केला; पण तो वाहतुकीत अडकला. पोलिसांनी त्‍याला पकडतांना त्‍याच्‍यावर गोळीबार केला आणि त्‍यात त्‍याचा मृत्‍यू झाला.

पोलिसांच्‍या या कारवाईचा निषेध करण्‍यासाठी फ्रान्‍समध्‍ये मोर्चा निघाला. या मोर्च्‍याचे रूपांतर मग हिंसक आंदोलनात झाले. याच हिंसक आंदोलनात आजही फ्रान्‍स होरपळतो आहे. याला आता धार्मिक रंग देण्‍यात आला. याला आता विस्‍थापितांच्‍या प्रश्‍नांशी जोडण्‍यात आले आहे. नक्‍की कशासाठी हे आंदोलन चालू झाले, हे मागे पडून आता लोक रस्‍त्‍यावर अक्षरशः लुटालूट करायला आणि एकमेकांचे जीव घ्‍यायला उतरले आहेत. मुळात या सर्व घटनेत चूक कुणाची होती ? याचा शोध आणि कारवाई चालू असतांना अचानक या घटनेने अनेक निद्रिस्‍त प्रश्‍नांना जागे केले आहे. गेल्‍या काही वर्षांत इस्‍लामी राष्‍ट्रांतील असंतोषामुळे अनेक कुटुंबे युरोपातील देशात वास्‍तव्‍याला आली आहेत. प्रतिवर्षी त्‍यांच्‍या संख्‍येत भर पडते आहे. एकट्या फ्रान्‍समध्‍ये वर्ष २०२१ पर्यंत ५ लाखांहून अधिक विस्‍थापित लोक रहात आहेत. त्‍यातील अनेक आता फ्रान्‍सचे नागरिक बनले आहेत; पण माणुसकीच्‍या दृष्‍टीकोनातून घेतलेल्‍या निर्णयाचे चुकीचे पडसाद आता उमटायला लागले आहेत.

२. फ्रान्‍सचे मूळ नागरिक आणि विस्‍थापित यांच्‍यातील हिंसाचारामागील कारण

आपल्‍या मराठीत एक म्‍हण आहे, ‘भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी.’ (येथे कोणत्‍याही जातीचा अपमान करण्‍याचा उद्देश नाही. म्‍हणीचा वापर केवळ संदर्भासाठी केलेला आहे, याची वाचकांनी नोंद घ्‍यावी.) त्‍याप्रमाणे विस्‍थापित झालेल्‍या आणि आता नागरिक बनलेल्‍या लोकांनी हळूहळू मूळ लोकांच्‍या उरावर बसण्‍याचा प्रारंभ केलेला आहे. ‘आपल्‍याला दिलेले नागरिकत्‍व हा फ्रान्‍सच्‍या लोकशाहीचा भाग आहे, त्‍यामुळे आपणच किंवा आपली संस्‍कृती याचा अविभाज्‍य भाग असली पाहिजे’, असा मतप्रवाह चालू झालेला आहे. लोकशाहीच्‍या सार्वभौमत्‍व तत्त्वाचा आणि समान नागरिक असण्‍याचा अपलाभ घेत मूळ लोकांच्‍या घरावर स्‍वतःचा हक्‍क सांगितला जात आहे. त्‍यामुळे ज्‍यांचे हे घर होते किंवा मूळ फ्रान्‍सचे लोक आणि विस्‍थापित नागरिक यांच्‍यामध्‍ये आता धुसफूस चालू झाली आहे. हे लोण इकडे थांबणारे नाही; कारण या दोन नागरिकांमधील दरी आता वाढत जाणार आहे. ज्‍या निष्‍पाप लोकांना याचा त्रास झाला, ज्‍यांची दुकाने, व्‍यवसाय आणि इतर संपत्ती लुटली किंवा जाळली गेली, त्‍यांचा ‘लोकशाही’ या शब्‍दावरचा विश्‍वास डळमळीत झाला असेल, यात शंका नाही. याचा त्रास नुसत्‍या एका धर्मापुरता मर्यादित रहाणार नाही, तर हळूहळू तिकडे विस्‍थापित होणार्‍या अथवा कामानिमित्त जाणार्‍या प्रत्‍येक परदेशी नागरिकाला होणार आहे.

आपल्‍याच घरात घुसून जर बाहेरचे लोक आपल्‍याला कायदे आणि सर्वधर्मसमभाव शिकवायला लागले, तर आपली जी प्रतिक्रिया असेल, तीच प्रतिक्रिया किंवा ते पडसाद फ्रान्‍समध्‍ये येत्‍या काळात दिसून येणार आहेत. ते नक्‍की काय असतील ? याविषयी आताच सांगता येणे कठीण असले, तरी यामुळे एकूणच लोकशाहीच्‍या ढाच्‍याला धक्‍का बसणार आहे, हे नक्‍की आहे. याला दुसरी एक बाजूही आहे. ज्‍या पोलिसांनी मुलावर गोळी चालवली, त्‍यांना तसे करण्‍याचे योग्‍य कारण अजून देता आलेले नाही. तो मुलगा पळत असला, हे खरे असले, तरी तो आतंकवादी नव्‍हता अथवा तसे अजून तरी सिद्ध झालेले नाही. त्‍यामुळे ‘त्‍या पोलिसांनी वंशवादामुळे हे कृत्‍य केलेले आहे’, असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्‍यामुळे कुठे तरी त्‍यांची कृती समर्थनीय नाही; पण असे असले, तरी त्‍यांच्‍या चुकीला धर्माचा आधार घेत त्‍यातून एकूणच केलेली हानी कुठे तरी त्‍या धर्माच्‍या एकूणच मूळ तत्त्वांविषयी प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित करते. कोणताही धर्म, पंथ, जात अथवा संप्रदाय कोणत्‍याच प्रकारच्‍या अमानुष कृत्‍यांना थारा देत नाही; पण ‘लोकांच्‍या भावनांना चुकीची दिशा दाखवत त्‍याच भावनांचा आसरा घेत अनेक राजकारणी, संधीसाधू आणि सुप्‍त हेतू बाळगणारे या तत्त्वांना वेगळ्‍या चौकटीत बसवत संपूर्ण जगात हिंसाचार करू शकतात’, हे सिद्ध झालेले आहे. याला एका विशिष्‍ट धर्माचे लोक फसतात, हे आजवर सिद्ध झालेले आहे.

३. भारतातील खलिस्‍तान चळवळ आणि तिच्‍यामुळे विदेशात भारतीय वाणिज्‍य कार्यालयांवर होणारी आक्रमणे

भारतात जरी हिंसाचाराचे मूळ नसले, तरी भूतकाळात भारताच्‍या राजकारण्‍यांनी केलेल्‍या अक्षम्‍य चुकांमुळे आजही त्‍याची किंमत मोजावी लागत आहे. ‘खलिस्‍तान’ हा शब्‍द आज पुन्‍हा भारताच्‍या वेशीवर येऊन ठेपला आहे. खलिस्‍तानी विचारधारेचे समर्थन करणारे आज जरी भारतात हिंसाचार घडवत नसले, तरी त्‍यांनी विदेशातील भारताच्‍या वाणिज्‍य कार्यालयांना स्‍वतःचे लक्ष्य बनवले आहे. ‘मुळात खलिस्‍तान संकल्‍पना काय आहे ? अजूनही यावर हिंसाचार का होत आहे ?’, हे आपण समजून घेतले पाहिजे. वर्ष १९४७ मध्‍ये भारत स्‍वतंत्र झाला; पण भारतातील २ धर्मांना इंग्रज विभाजित करून गेले, हा इतिहास आपण वाचलेला आहे; पण हिंदु, मुसलमान या धर्मांच्‍या पलीकडे भारतात शीख धर्म ही महत्त्वाचा आहे. ज्‍यांना आपल्‍या धर्मासाठी एक वेगळा प्रांत हवा होता. भारतातील तत्‍कालीन राजकारण्‍यांनी स्‍वतःच्‍या स्‍वार्थासाठी हा लहान प्रश्‍न पुष्‍कळ मोठा केला. स्‍वतःचा कार्यभाग उरकून घेतल्‍यावर त्‍या लोकांना वाळीत टाकले ज्‍याचा परिणाम म्‍हणजे चालू झालेली खलिस्‍तानी चळवळ. या चळवळीत त्‍याच घराण्‍यातील लोकांचा जीव गेला ज्‍यांनी हा प्रश्‍न निर्माण केला. आज भारतात ही चळवळ थंडावलेली असली अथवा अनेक शीख लोकांनी भारताला स्‍वतःचे राष्‍ट्र, प्रांत मानून त्‍याच्‍या जडणघडणीत अमूल्‍य असे योगदान दिले असले, तरी विदेशी शक्‍ती आणि अखंड भारताचे तुकडे करण्‍यासाठी सज्‍ज असलेल्‍या टोळ्‍या ज्‍यात अनेक विद्रोही विचारसरणीच्‍या लोकांचा समावेश आहे, त्‍यांनी ही जखम पूर्ण भरू दिलेली नाही.

आज कॅनडा आणि अमेरिका येथील भारताच्‍या वाणिज्‍य कार्यालयांवर होणारी आक्रमणे हे त्‍याच शक्‍तींच्‍या वाईट कृत्‍यांचे एक प्रतीक आहे. भारताची जगात होणारी भरभराट, वाढती अर्थव्‍यवस्‍था, वाढता जागतिक दबदबा याला अंकुश लावण्‍यासाठी हेच देश आपल्‍या घरात अशा कृत्‍यांना पडद्यामागून समर्थन आणि संरक्षण देत आहेत. एखादी अशी घटना घडली की, निषेध करायचा; पण पाठीमागून अशा घटना घडतील, याची पुरेपूर सोय करायची, असे दुहेरी धोरण या देशांनी आज राबवले आहे. असे असले, तरी या सगळ्‍यात ‘त्‍यांचे स्‍वतःचे घरही जळते आहे’, याची जाणीव त्‍यांना अजून झालेली नाही किंवा त्‍यांनी त्‍याकडे सोयीस्‍करपणे दुर्लक्ष केलेले आहे. त्‍यामुळे येणार्‍या काळात अशा घटनांमध्‍ये वाढ झाली, तर मला आश्‍चर्य वाटणार नाही.

४. हीच वेळ आहे संयम ठेवून आग पसरू न देण्‍याची !

इकडे एक लक्षात घेतले पाहिजे की, भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही. ‘आमच्‍या घरात आग लावायला याल, तर तुमचे घर कधी जाळून खाक होईल, ते तुमचे तुम्‍हाला कळणार नाही’, हे भारताने दाखवून दिलेले आहे. खलिस्‍तानी चळवळीचे समर्थन आणि नेतृत्‍व करणार्‍या अनेक लोकांचा गेल्‍या काही मासात अचानक झालेला मृत्‍यू किंवा त्‍यांना भारताने जे सळो की पळो करून सोडलेले आहे, त्‍यातून स्‍पष्‍ट होते आहे. या शक्‍ती पुन्‍हा एकदा भारतात काहीतरी करून वातावरण बिघडवण्‍याचा प्रयत्न करणार, हे उघड आहे. ‘अडकलेला पतंग फाडायचा कि तो अलगद काढायचा ?’, हे आपण भारतीय नागरिक म्‍हणून ठरवायचे आहे. ‘दगड मारणारे हे दगड मारणार त्‍यांना कुणी थांबवू शकत नाही; पण मारलेला दगड परतवायचा कसा ?’, हे आपण शिकले पाहिजे. फ्रान्‍स आणि भारत हे दोन्‍ही देश सध्‍या जाळपोळीच्‍या घटनात होरपळून निघत आहेत. हीच वेळ आहे संयम ठेवून आग पसरू न देण्‍याची आणि हीच वेळ आहे अशी आग लावणार्‍या लोकांना योग्‍य तो धडा शिकवण्‍याची !’

– श्री. विनित वर्तक, अभियंता, मुंबई. (६.७.२०२३)

(साभार : ‘विनीत वर्तक यांच्‍या ब्‍लॉग’वरून)

संपादकीय भूमिका

धर्मांध जेथे अल्‍पसंख्‍यांक असतात, तेथे ते बहुसंख्‍यांकांना त्रास देऊन स्‍वतःचे वर्चस्‍व निर्माण करण्‍याचा प्रयत्न करतात !