वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या प्रथम दिनी ‘हिंदू समाजाचे रक्षण’ या विषयावरील उद्बोधन सत्रात मान्यवरांनी मांडलेले ओजस्वी विचार !

हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिमालयाच्या उंचीचे धर्मकार्य करणे आवश्यक ! – पू. श्रीराम ज्ञानीदास महात्यागी, संस्थापक, तिरखेडी आश्रम, गोंदिया

पू. श्रीराम ज्ञानीदास महात्यागी

रामनाथी, १६ जून (वार्ता.) – देशाची प्रगती तर होत आहे; मात्र इंजिन बंद पडलेल्या विमानाप्रमाणे आपण भरकटलो आहोत. बौद्धिक क्षमता वाढली आहे; परंतु हृदय छोटे झाले आहे. भारतात ८० टक्के हिंदू आहेत; परंतु त्यांच्यातील किती हिंदूंमध्ये हिंदुत्व जिवंत आहे ? हिंदुत्व जिवंत असते, तर वर्ष १९४७ मध्येच भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाला असता. केवळ ज्ञानाने हिंदु राष्ट्र येणार नाही, तर ईश्वराप्रती भाव आणि हिमालयाच्या उंचीचे धर्मकार्य करणे आवश्यक आहे. मार्गदर्शन करणारे सहस्रावधी आहेत; मात्र हिंदुत्वाचे कार्य करणारे मोजके आहेत. हिंदु समाज विविध पंथांमध्ये विभागला गेला आहे. हिंदू समाज ‘हिंदु’ म्हणून एकत्र येईल, तेव्हाच ‘रामराज्य’ येईल. आता संतांनी मठ आणि मंदिरे यांच्या कोषातून हिंदु धर्माच्या प्रचारासाठी बाहेर पडण्याची वेळ आली आहे. त्यांनी गावागावांमध्ये जाऊन मठ, मंदिरे यांच्या ठिकाणी धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करायला करायला हवेत, असे तेजस्वी मार्गदर्शन गोंदिया येथील ‘तिरखेडी आश्रमा’चे संस्थापक पू. श्रीराम ज्ञानीदास महात्यागी यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या प्रथम दिनी ‘हिंदू समाजाचे रक्षण’ या विषयावरील उद्बोधन सत्रात मान्यवरांना संबोधित करत होते.
या वेळी व्यासपिठावर गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील डासना पीठाच्या महंत यति माँ चेतनानंद सरस्वती, छत्रपती संभाजीनगर येथील ‘ग्लोबल महानुभाव संघा’चे अध्यक्ष पू. सुदर्शन महाराज कपाटे, नागपूर येथील ‘श्री गुरुकृपा सेवा संस्थान’चे संस्थापक पू. भागीरथी महाराज, चेन्नई (तमिळनाडू) येथील ‘पी. गुरुज्’ या तमिळ वाहिनीचे  निवेदक जयकृष्णन् जी. आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

महानुभाव पंथाचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत सक्रीय सहभाग राहील ! – पू. सुदर्शन महाराज कपाटे, अध्यक्ष, ग्लोबल महानुभाव संघ, छत्रपती संभाजीनगर

पू. सुदर्शन महाराज कपाटे

प्रत्येक जण आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यावर प्रेम करायला शिकवतो; पण कोणीही आपल्या धर्मावर प्रेम करायला शिकवत नाही. त्यामुळे आपल्या मुलांना हिंदु धर्मशास्त्राची शिकवण दिल्याशिवाय हिंदु राष्ट्राची स्थापना होणार नाही. धर्मांध त्यांचे बांधव संकटात असतांना त्याच्या साहाय्यार्थ धावून जातात; मात्र हिंदू एका मुलीच्या देहाचे ३६ तुकडे होत असतांनाही तिला साहाय्य करत नाहीत. वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव संपल्यानंतर सर्व जण त्यांच्या घरी जातील; पण प्रत्येकाने या महोत्सवातील शिकवण आचरणात आणून प्रतिदिन काही घंटे धर्मासाठी देणे आवश्यक आहे. महानुभाव पंथ हा सनातन हिंदु धर्माचाच एक भाग आहे. त्यामुळे महानुभाव पंथाचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत सक्रीय सहभाग राहील.

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी देशपातळीवर कठोर कायदा निर्माण करणे आवश्यक ! – यति माँ चेतनानंद सरस्वती, महंत, डासना पीठ, गाझियाबाद, उत्तरप्रदेश

यति माँ चेतनानंद सरस्वती

हिंदू युवतींना ‘लव्ह जिहाद’ मध्ये षड्यंत्राप्रमाणे फसवले जात आहे. एखाद्या युवतीच्या मृत्यूनंतरही तिच्या मृतदेहावर बलात्कार करणे हे पशूलाही लाजवणारे कृत्य आहे. असे प्रकार जिहाद्यांकडून चालू आहेत. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी  जिहाद्यांच्या मनात भय निर्माण होईल, असा कायदा केंद्रीय स्तरावर निर्माण करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती संपवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ एका षड्यंत्र चालू आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’ हा संघटित गुन्हा मानला पाहिजे. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटातून हे सत्य बाहेर आले आहे. आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ गुप्तपणे चालू होता; परंतु देहली येथील युवती साक्षी मलिक हिची क्रूर हत्या पहाता हे प्रकार आता उघडपणे चालू करण्यात आले आहेत. हिंदु संस्कृती संपवण्यासाठी आध्यात्मिक परंपरा नष्ट करणे आणि महिलांना भ्रष्ट करणे ही षंड्यंत्रे चालू आहेत.
‘देशपातळीवर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायद्याची आवश्यकता ’ या विषयावर मार्गदर्शन करतांना यति माँ चेतनानंद सरस्वती बोलत होत्या.

हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन करण्याच्या कार्यात प्रसारमाध्यमांची भूमिका मोठी ! – जयकृष्णन् जी., निवेदक, पी. गुरुज् वाहिनी, चेन्नई

जयकृष्णन् जी.

सध्या आपण हिंदु धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर आहोत. प्रसारमाध्यमे हिंदु धर्माच्या पुनरुज्जीवनात पुष्कळ मोठी भूमिका बजावत आहेत. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी सामाजिक माध्यमे, मुद्रित प्रसारमाध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे यांचे पुष्कळ मोठे योगदान अपेक्षित आहे. सनातनने काळाची आवश्यकता ओळखून गोव्यात पुष्कळ मोठा प्रसारण स्टुडिओ (चित्रीकरण कक्ष) उभारला आहे. सनातनने आध्यात्मिक साधनेमध्ये कुलदेवतेच्या नामजपावर भर दिला आहे. अलीकडच्या काळात या विषयावर ‘कांतारा’ आणि ‘मल्लिकापूरम्’ यांसारखे चित्रपटही काढण्यात आले आहेत.
आज बरेच जण आक्रमणाच्या भीतीमुळे अल्पसंख्यांकांच्या धर्माविषयी बोलत नाही; मात्र सध्या हिंदु धर्माचे कार्य निर्भीडपणे पुढे नेण्याची वेळ आली आहे.

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक ! –  पू. भागीरथी महाराज, संस्थापक, श्री गुरुकृपा सेवा संस्थान, नागपूर

पू. भागीरथी महाराज

कोरोनाच्या काळात विदर्भामध्ये धर्मांतर रोखण्यासाठी आम्ही कार्य केले. धर्मांतर रोखण्याचे कार्य करत असतांना सातत्याने विरोध होत आहे. आसुरी शक्तींनी  मारुतीरायांनाही ईश्वरी कार्य करत असतांना रोखण्याचे काम केले. त्याप्रमाणे धर्मकार्य करतांना विरोध होणारच आहे. बीज ज्याप्रमाणे स्वत: नष्ट होऊन वृक्ष निर्माण करते, त्याप्रमाणे धर्मकार्यासाठी आपण सर्मपित होऊन कार्यरत रहायला हवे. क्रांतीकारकांनी राष्ट्रासाठी फाशी स्वीकारली, तर आपणही झोकून देऊन धर्मकार्य करायला हवे. लोकमान्य टिळक यांनी हिंदूंना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव चालू केला; परंतु सद्यःस्थितीत भगवंताला विसरून मंदिरामंदिरांमध्ये वाद चालू आहेत. वाद करण्याऐवजी मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना हिंदु धर्माचे शिक्षण देणे आवश्यक आहे.

वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

१. अधिवेशनात सहभागी हिंदुत्वनिष्ठांना एकमेकांशी भेटल्याचा पुष्कळ आनंद झाल्याचे दिसून आले. अधिवेशनाच्या मध्यंतराच्या वेळेत सर्व हिंदुत्वनिष्ठ एकमेकांची आस्थेने चौकशी करत होते. या वेळी सर्व हिंदुत्वनिष्ठांमध्ये कुटुंबभावना दिसून आली.

२.  अधिवेशनाच्या निमित्ताने HinduRashtra हा की वर्ड ‘ट्वीटर’ ट्रेण्डींग होता. त्याद्वारे हिंदु राष्ट्राची चर्चा देशभर चालू असल्याचे दिसून आले.

अधिवेशनाच्या ठिकाणी असलेले वैशिष्ट्यपूर्ण फलकांचे प्रदर्शन !

१. ‘जगात एकही हिंदु राष्ट्र नाही’, याची माहिती देणारा तक्ता सभागृहाच्या प्रदर्शनात लावण्यात आला होता. यामध्ये जगातील मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध, तसेच अन्य धर्मीय राष्ट्रांची आकडेवारी देण्यात आली होती. त्यामध्ये दिलेली जगात एकही हिंदु राष्ट्र नसल्याची माहिती भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी उद्युक्त करणारी होती.

२. ‘हिंदु राष्ट्र कसे असेल ?’ या फलकाद्वारे ‘हिंदु राष्ट्रामध्ये ‘शासनकर्ते, कायदा, समाज, दंडनीती, संरक्षणव्यवस्था, धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था कशी असेल ?’ याविषयी माहिती देण्यात आली होती. यासह अध्यात्मविषयक माहिती, हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या विविधांगी कार्याची माहिती देणारे विविध फलक सभागृहाच्या ठिकाणी लावण्यात आले होते.