स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणच्या फलकावर अशुद्ध लिखाण !

भगूर (नाशिक) येथील प्रकार !

भगूर येथील फलकवरील अशुद्ध लेखन !

भगूर (नाशिक) – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठी भाषाशुद्धीचे महद्कार्य केले; पण त्यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथील पदपथावरील दिशादर्शकांवर लावलेल्या फलकांवरील लिखाण अशुद्ध आहे. त्यामुळे सावरकरप्रेमी संतप्त झाले आहेत. याविषयी भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड यांनी सांगितले की, या फलकांमधील चुकलेल्या नावांत तातडीने पालट करून त्यात सुधारणा केली जाईल. यात कुठलाही विलंब केला जाणार नाही. (फलक बनवतांना तो शुद्धलेखनातील जाणकारांकडून पडताळून का घेतला नाही ? – संपादक)

फलकात असणार्‍या शुद्धलेखनाच्या चुका !

१. वीर सावरकर यांच्या नावात ‘वीर’ हा शब्द ‘विर’ असा अशुद्ध लिहिला आहे.
२. ‘पालिका’ आणि ‘भगूर’ हे योग्य शब्द अपेक्षित असतांना ‘पालीका, भगुर’ असे अशुद्ध लिहिले आहेत.

संपादकीय भूमिका

  • मराठी भाषाशुद्धीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तळमळीने प्रयत्न केले; पण त्यांच्याच जन्मस्थळाच्या ठिकाणी शुद्धलेखनाची अशी दुरावस्था होणे दुर्दैवी !
  • मराठी भाषेचे अशा प्रकारे वाभाडे काढणार्‍या संबंधितांना शिक्षाही करायला हवी !

२८ मे पर्यंत सुधारणा करावी ! – आमोद दातार, सावरकरप्रेमी

याविषयी आमोद दातार यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे; मात्र ‘यावर कार्यवाही करण्यात आली आहे’, असे उत्तर देण्यात आले आहे.

असे असले, तरी प्रत्यक्षात १७ मेपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. ‘वीर सावरकर यांच्या १४० व्या जन्मदिनापर्यंत म्हणजेच २८ मे पर्यंत तरी यात सुधारणा करावी’, असे दातार यांनी म्हटले आहे. (प्रशासनाला हे सांगावे का लागते ? – संपादक)