बंगाल पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येत नसेल, तर केंद्रीय सुरक्षा दलांना पाचारण करा ! – कोलकाता उच्च न्यायालय

बंगाल उच्च न्यायालय

कोलकाता – हनुमान जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, बंगालमधील पोलीस परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकत नसतील, तर त्यांनी केंद्रीय सुरक्षा दलांना पाचारण करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे, त्या ठिकाणी मिरवणुका काढू नयेत. श्रीरामनवमीच्या काळात बंगालमधील हावडानंतर हुगळी येथेही दंगल झाली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने बंगाल सरकारकडे अहवाल मागवला आहे.

मागील ६ दिवस बंगालमध्ये हिंसाचार चालू आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्या वेळी एका महिला अधिवक्त्याने, ‘शोभायात्रेच्या वेळी दगडफेक झाली आणि त्यात मी घायाळ झाले’, असे सांगितले. त्या वेळी न्यायालयाने बंगाल सरकारला ‘हनुमान जयंतीच्या अनुषंगाने तुमची काय सिद्धता चालू आहे ?’, असा प्रश्‍न विचारला.