मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतरही कांद्याच्या खरेदीवरून विरोधकांचा सभागृहात गोंधळ !

विधानसभेत विरोधकांचा कांद्यावरून गोंधळ

मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – नाफेड कडून कांद्याची खरेदी चालू करण्यात आली आहे. सरकार शेतकर्‍यांच्या समवेत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देऊनही कांद्याच्या खरेदीवरून विरोधकांनी २८ फेब्रुवारी या दिवशी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला.

कांद्याची खरेदी नसल्याविषयी, तसेच बाजारभाव मिळत नसल्याविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ, नाशिक येथील भाजपचे आमदार राहुल अहेर, काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी कांदा खरेदीविषयी विविध प्रश्न उपस्थित केले. छगन भुजबळ यांनी नाफेडने शेतकर्‍यांच्या कांद्याची खरेदी करावी, अशी मागणी केली. या वेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रश्नांची गंभीर नोंद घेण्याचे आदेश दिला. या वेळी मुख्यमंत्री उत्तर देण्यासाठी उभे राहिले असता विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.

या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ‘शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे कि राजकारण करायचे आहे ?’, असा प्रश्न उपस्थित केल्यावर विरोधक जागेवर बसले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार शेतकर्‍यांच्या समवेत आहे. शेतकर्‍यांना आवश्यक ते सर्व साहाय्य करण्यात येत आहे. नाफेडने खरेदी चालू केली आहे. आतापर्यंत २.३८ मेट्रिक टन इतक्या कांद्याची खरेदी झाली असल्याचे सांगितले.