व्‍यक्‍ती, समाज, निसर्ग आणि परमात्‍मा यांच्‍यात संतुलन साधणे म्‍हणजे धर्म ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

मार्गदर्शन करतांना व्‍यासपिठावर प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

सांगली, ८ जानेवारी (वार्ता.) – विहित कर्म निरपेक्ष बुद्धीने देवाला अर्पण करणे म्‍हणजे स्‍वधर्म होय. व्‍यक्‍ती, समाज, निसर्ग आणि परमात्‍मा यांच्‍यात संतुलन साधणे म्‍हणजे धर्म होय, असे मौलिक विचार अयोध्‍या येथील श्रीरामजन्‍मभूमी न्‍यासाचे कोषाध्‍यक्ष प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्‍यास) यांनी केले. संत कोटणीस महाराज यांच्‍या शताब्‍दी पुण्‍यतिथी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘कैवल्‍यधाम’ येथे ते बोलत होते.

प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज पुढे म्‍हणाले, ‘‘धर्म हा २४ घंटे आपल्‍या जवळ पाहिजे. प्रत्‍येकाने निरपेक्ष बुद्धीने देवाला स्‍वकर्म अर्पण केले, तर आपण भक्‍त बनू आणि आपला संसार आपोआप परमार्थमय होईल.’’

या प्रसंगी प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज म्‍हणाले, ‘‘या ठिकाणी असणार्‍या १ घंट्याच्‍या कार्यक्रमासाठी मी का आलो, तर १ वर्षापूर्वी इथे येण्‍याचा शब्‍द दिला होता. मी जरी अव्‍याहत प्रवास करत असलो, तरी माझी दोरी आळंदीला बांधलेली आहे. त्‍या भूमीत सेवा रूजू होण्‍यासाठी मी येथे आलो आहे.’’

अयोध्‍येतील श्रीराम मंदिराचे काम जानेवारी २०२४ मध्‍ये पूर्ण होणार ! – प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज

सांगली – सगळ्‍या जगाला मेटाकुटीला आणणार्‍या रावणाचा वध श्रीराम यांनी केला. प्रभु श्रीराम यांच्‍या नामाची महती सगळीकडे पसरली आहे. अयोध्‍येत चालू असलेल्‍या भव्‍य श्रीराम मंदिराचे काम जानेवारी २०२४ मध्‍ये पूर्ण होणार आहे, अशी माहिती प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी दिली. ते विश्रामबाग येथील कल्‍पद्रूम क्रीडांगणावर चालू असलेल्‍या श्रीराम कथा आणि संकीर्तन सोहळ्‍यात बोलत होते. हा सोहळा १४ जानेवारीपर्यंत चालणार आहे.