अफाट कार्य करूनही दुर्लक्षित राहिलेले आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर !

‘दर्पण’कार बाळशास्‍त्री जांभेकर यांचा आज ६ जानेवारी २०२३ या दिवशी जन्‍मदिन आहे. हा दिवस ‘पत्रकार दिन’ म्‍हणून साजरा केला जातो. त्‍या निमित्ताने…

स्‍कॉटलंडच्‍या विद्यापिठामध्‍ये एका भारतीय व्‍यक्‍तीचा २०० वर्षांपूर्वी लिहिलेला अर्ज आदरपूर्वक जतन करून ठेवलेला आहे. नामवंत एल्‍फिन्‍स्‍टन महाविद्यालयाच्‍या प्राध्‍यापक पदासाठी केलेला तो अर्ज होता. नोकरीचा किरकोळ अर्ज संग्रहालयात ठेवण्‍याइतपत प्रभावीपणे मांडणार्‍या एका मराठी बुद्धीवंताचा म्‍हणजे आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर यांचा थोडक्‍यात परिचय आणि त्‍यांनी केलेले उत्तुंग कार्य येथे देत आहोत.

आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर

१. आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर यांचा जन्‍म, परिचय आणि पार्श्‍वभूमी

ब्रिटीश सत्ताधार्‍यांच्‍या पारतंत्र्यात भारत सखोल बुडालेला असतांनाच ६ जानेवारी १८१२ या दिवशी आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर यांचा जन्‍म झाला. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील देवगड तालुक्‍यात वाघोटन खाडीच्‍या किनार्‍यावर ‘पोंभुर्ले’ गाव आहे. या गावात अतिशय गरीब कुटुंबात त्‍यांचे बालपण गेले. हलाखीची परिस्‍थिती असतांनाही आई सगुणाबाई आणि वडील गंगाधरशास्‍त्री यांनी त्‍यांना शाळेत घातले अन् पुढे इतिहास घडला.
जन्‍मजात अफाट बुद्धीमत्ता लाभलेले बाळशास्‍त्री शालेय जीवनात प्रचंड वेगाने विद्याभ्‍यास करू लागले. त्‍यांचे पाठांतर दांडगे असल्‍यामुळे स्‍वतःच्‍या इयत्तेतील पुस्‍तके समजून घेतल्‍यानंतर पुढच्‍या २-२ इयत्तांमधील अभ्‍यास ते एकत्रितरित्‍या करू लागले. त्‍यांची तल्लख बुद्धीमत्ता पाहून सर्वजण त्‍यांना ‘बालबृहस्‍पती’ म्‍हणू लागले. वर्ष १८२६ मध्‍ये त्‍यांनी ‘मुंबई एज्‍युकेशन सोसायटी’ या इंग्रजी शाळेत प्रवेश घेतला. त्‍यांच्‍या सखोल अभ्‍यासामुळे वयाच्‍या १४ व्‍या वर्षी त्‍याच शाळेत ‘गणिताचे शिक्षक’ म्‍हणून त्‍यांना नोकरी मिळाली ती सुद्धा वेतनाची !

२. विविध भाषांवर प्रभुत्‍व आणि खगोलशास्‍त्रामध्‍ये पारंगत

त्‍यांना केवळ गणिताच्‍या बुद्धीमत्तेपुरते स्‍वतःचे ज्ञान मर्यादित ठेवायचे नव्‍हते आणि त्‍यामुळेच विविध भाषा शिकण्‍याचा त्‍यांनी सपाटा चालू केला. त्‍यांनी जिज्ञासेमुळे अल्‍पावधीतच मराठी, संस्‍कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगु, इंग्रजी, पारशी, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक, उर्दू या सर्व भारतीय आणि विदेशी भाषांवर प्रभुत्‍व मिळवले. हे कमी पडले म्‍हणून कि काय, त्‍यांनी खगोलशास्‍त्राचा अभ्‍यास चालू केला आणि त्‍यातही ते पारंगत झाले. ज्‍योतिषशास्‍त्रावरही त्‍यांनी स्‍वतःची पकड घट्ट केली. ‘बाँबे नेटिव्‍ह सोसायटी’चे बापू छत्रे त्‍यांचे शिक्षक. वर्ष १८३० मध्‍ये वयाच्‍या अवघ्‍या १८ व्‍या वर्षी बाळशास्‍त्री ‘बाँबे नेटिव्‍ह सोसायटी’चे ‘डेप्‍युटी सेक्रेटरी’ (उपसचिव) झाले.

३. एल्‍फिन्‍स्‍टन महाविद्यालयात नोकरी आणि ‘दर्पण’ या द्विभाषिक वर्तमानपत्राचा प्रारंभ

वर्ष १८३४ मध्‍ये एल्‍फिन्‍स्‍टन महाविद्यालयाची स्‍थापना झाली. त्‍या महाविद्यालयात रुजू होणारे आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर हे पहिले मराठी साहाय्‍यक प्राध्‍यापक. गणित, भौतिक आणि खगोल शास्‍त्र हे अवघड विषय ते शिकवायचे. दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड हे आचार्य बाळशास्‍त्री यांच्‍या हाताखाली शिकून गेलेले काही महान विद्यार्थी. एल्‍फिन्‍स्‍टन महाविद्यालयात रुजू होण्‍यापूर्वी आपल्‍या जन्‍मदिनी ६ जानेवारी १८३२ या दिवशी त्‍यांनी ‘दर्पण’ हे द्विभाषिक आणि महाराष्‍ट्रातील पहिले मराठी वर्तमानपत्र मुंबईत चालू केले.

४. महाराष्‍ट्रातील पहिले मराठी वर्तमानपत्र ‘दर्पण’ !

त्‍यापूर्वी वर्ष १७७९ पासून ‘बाँबे हेरॉल्‍ड’ हे महाराष्‍ट्रातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र उपलब्‍ध होते; परंतु मराठी भाषेमध्‍ये ‘दर्पण’ हेच पहिले वर्तमानपत्र बनले. एका बाजूला इंग्रजी आणि दुसर्‍या बाजूला मराठी लिखाण अशा दोन भाषेत हे वर्तमानपत्र होते. जांभेकरांचे वर्गमित्र भाऊ महाजन त्‍यातील इंग्रजी भाग संपादित करत. प्रारंभी ‘दर्पण’ हे पाक्षिक होते. ४ मासांनंतर ते साप्‍ताहिक बनले. याचा आकार १९ इंच लांब आणि १९.५ इंच रुंद असा होता. एकूण ८ पानांच्‍या या साप्‍ताहिकाची वार्षिक वर्गणी ६ रुपये होती. ‘दर्पण’चा खप ३०० प्रती इतका अत्‍यल्‍प असला, तरी त्‍या काळात इतर प्रथितयश वृत्तपत्रांचा अधिकतम खप ४०० प्रती इतकाच होता. ‘दर्पण’मुळे मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रचली गेली. पहिले मराठी पत्रकार होण्‍याचा मान अर्थातच आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर यांना त्‍यांच्‍या दूरदृष्‍टीमुळे मिळाला. यामुळेच ते आजही ‘दर्पणकार’ या नावाने ओळखले जातात आणि त्‍यांचा जन्‍मदिवस ‘पत्रकार दिन’ म्‍हणून साजरा केला जातो.

दुर्दैवाने १ जुलै १८४० या दिवशी ‘लास्‍ट फेअरवेल’ हा लेख लिहून ‘दर्पण’चा प्रसार थांबला. ‘लिमिटेड सर्व्‍हिस गॅझेट अँड लिटररी क्रोनिकल’ या पत्रात अखेरीस ‘दर्पण’ विलीन करण्‍यात आले.

५. शैक्षणिक मार्गदर्शन करणारे मासिक ‘दिग्‍दर्शन’ आणि महाराष्‍ट्रातील पहिले मराठी मासिक ‘प्रभाकर’ चालू करणे

‘विद्या हे बळ आहे’, असे मानणार्‍या बाळशास्‍त्रींनी त्‍यानंतर ‘दिग्‍दर्शन’ हे शैक्षणिक मार्गदर्शन करणारे मासिक काढले. हेसुद्धा ‘दर्पण’प्रमाणेच इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेत विभागलेले होते. भौतिक आणि रसायन शास्‍त्र, व्‍याकरण, गणित, भूगोल, इतिहास या विविध शाखेतील विषयांवर बाळशास्‍त्री ‘दिग्‍दर्शन’मध्‍ये मार्गदर्शन करत. त्‍यांचे वर्गमित्र भाऊ महाजन यांनी त्‍याच वर्षी ‘प्रभाकर’ नावाचे मराठी मासिक काढले. लोकहितवादींची गाजलेली १०८ शतपत्रे याच मासिकात छापली गेली. एकंदरीतच बाळशास्‍त्री यांच्‍या दूरदृष्‍टीमुळे मराठी वृत्तपत्र समूहाने आकार घेतला.

६. शालेय आणि उच्‍च शिक्षण यांसाठी पाठ्यपुस्‍तकांची निर्मिती

बाळशास्‍त्रींनी वर्तमानपत्रापुरते मर्यादित न रहाता पुस्‍तके लिहिण्‍याचा उपक्रम हाती घेतला. महाराष्‍ट्र शिक्षण प्रसारक मंडळासाठी विविध भाषेतील शालेय पाठ्यपुस्‍तके निर्मिती करण्‍यात त्‍यांचा सिंहाचा वाटा आहे. इतिहास, भूगोल, गणित, छंदशास्‍त्र, नीतीशास्‍त्र या विषयांवर त्‍यांनी पुस्‍तके लिहिली. ‘बाल व्‍याकरण’सारखी मराठी पाठयपुस्‍तके सर्वप्रथम त्‍यांनी बनवली. फक्‍त शाळकरी अभ्‍यासक्रमापुरते न थांबता उच्‍च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्‍यांसाठी त्‍यांनी पुस्‍तके लिहिली. इंजिनीयरिंगच्‍या विद्यार्थ्‍यांना गणितातील अवघड जाणार्‍या ‘डिफरनशियल कॅलक्‍युलस’सारख्‍या विषयावर आधारित ‘शून्‍यलब्‍धी’ हे पहिले पुस्‍तक त्‍यांनी लिहिले. प्रतिष्‍ठित ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’च्‍या नियतकालिकांमध्‍ये बाळशास्‍त्रींचे लेख प्रसारित होत. असा मान मिळवणारे ते पहिलेच भारतीय होते.

७. ‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाचे आद्यप्रकाशक’ आणि ‘आधुनिक भारताचे आद्यइतिहासकार’ बाळशास्‍त्री !

शैक्षणिक क्षेत्रातून आध्‍यात्मिक क्षेत्रात पाऊल टाकत वर्ष १८४५ मध्‍ये बाळशास्‍त्री जांभेकर यांनी ‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाचे पाठभेदांसहित संपादन करून त्‍याची पहिली छापील प्रत जगाला उपलब्‍ध करून दिली. त्‍यामुळेच त्‍यांना ‘ज्ञानेश्‍वरीचे आद्यप्रकाशक’ म्‍हणून ओळखले जाते. कोकणात गावागावांत जाऊन विविध भाषांमधील उपलब्‍ध ताम्रपटाचे वाचन करून इतिहास लेखनाचे महत्त्वपूर्ण काम त्‍यांनी केले. त्‍यांच्‍या या कार्यामुळे त्‍यांना ‘आधुनिक भारताचे आद्यइतिहासकार’ म्‍हटले जाते.

८. हिंदु धर्माचे कट्टर पुरस्‍कर्ते असलेले बाळशास्‍त्री जांभेकर !

हिंदु धर्माचे कट्टर पुरस्‍कर्ते असलेले बाळशास्‍त्री धर्मांतर करणार्‍या प्रवृत्तीच्‍या विरोधात होते. त्‍यांच्‍या काळात धर्मांतरावर गाजलेले शेषाद्री प्रकरण आजही चर्चेत आहे. अंबाजोगाई येथील गोविंद शेषाद्री यांना २ मुले होती. त्‍यापैकी मोठा मुलगा नारायण याला ख्रिस्‍ती मिशनर्‍यांनी धर्मांतर करून ख्रिस्‍ती पंथात सामील केले. त्‍याचा धाकटा भाऊ श्रीपती पुढे त्‍याच मार्गावर निघाला होता. बाळशास्‍त्रींना याची माहिती मिळताच त्‍यांनी श्रीपतीला गाठले. न्‍यायाधीश पेरी यांच्‍याद्वारे त्‍याचा ताबा घेतला आणि त्‍याचे मनपरिवर्तन घडवले. त्‍याची संमती मिळताच काशी येथे नेऊन त्‍याची शुद्धी करून त्‍याला पूर्ववत् हिंदु धर्मात प्रवेश करवून घेतला; परंतु त्‍यानंतर त्‍यांच्‍यावर या कृत्‍यावरून कडाडून टीका झाली. ५७ दिवस यवनांकडे राहिलेल्‍या हिंदु व्‍यक्‍तीला पुन्‍हा धर्मात आणल्‍याकारणाने अखेरीस पुण्‍यात त्‍यांच्‍यावर बहिष्‍कार घालण्‍यात आला.

९. तत्त्वनिष्‍ठ बाळशास्‍त्री

बाळशास्‍त्री तत्त्वाचे पक्‍के होते. मुंबई विभागाचे ‘शाळा निरीक्षक’ म्‍हणून नियुक्‍ती झाली असतांना एकदा वेतनात १ रुपया अधिक दिला गेला. ही गोष्‍ट त्‍यांनी संबंधित ब्रिटीश खात्‍याकडे कळवली आणि पुढील मासात तो १ रुपया न्‍यून देण्‍याची विनंती केली; परंतु पुढील मासात तो वाढीव रुपया वळता केला गेला नाही. असे ४ मास झाल्‍यानंतर बाळशास्‍त्री यांनी अधिकार्‍यांना खरमरीत पत्र लिहून ‘जोपर्यंत तुम्‍ही मला दिलेला अधिकचा रुपया जमा करत नाही, तोपर्यंत मी वेतन घेणार नाही’, अशी चेतावणीच दिली. या त्‍यांच्‍या पत्रामुळे अधिकारी हबकलेच !

१०. बाळशास्‍त्री यांनी भूषवलेली अनेक पदे आणि त्‍यांना मिळालेल्‍या पदव्‍या

बाळशास्‍त्री यांनी अनेक पदे भूषवली. शिक्षक ट्रेनिंग स्‍कूलचे ते संचालक होते. कुलाबा वेधशाळेचे संचालक म्‍हणून त्‍यांनी काम पाहिले. वर्ष १८४० मध्‍ये त्‍यांना ‘जस्‍टीस ऑफ पीस’ बहाल करण्‍यात आले. याद्वारे तंटे सोडवण्‍याचे कायदेशीर दायित्‍व त्‍यांना मिळाले. ‘विद्यामुकुटमणी’, पश्‍चिम भारतातील ‘आद्यकृषी’ अशा विविध पदव्‍या लोकांनी त्‍यांना दिल्‍या.

११. बाळशास्‍त्री यांनी केलेले विपुल लेखन

बाळशास्‍त्री यांनी विविध विषयांवर वैविध्‍यपूर्ण पुस्‍तके लिहिली. इंग्‍लंड देशाची बखर (वर्ष १८३२), ज्‍योतिषशास्‍त्र (१८३५), बाल व्‍याकरण (१८३६), भूगोल विद्या (१८३६), सार संग्रह (१८३७), नीती कथा (१८३८), हिंदुस्‍थानचा इतिहास (१८४६), हिंदुस्‍थानचा प्राचीन इतिहास (१८४९), हिंदुस्‍थानातील इंग्रज राज्‍याचा इतिहास, शून्‍यलब्‍धी, शब्‍दसिद्धी निबंध मानस शक्‍तीविषयक शोध इत्‍यादी पुस्‍तके लिहिली.

१२. आचार्य बाळशास्‍त्री यांचे निधन

दुर्दैवाने आचार्य बाळशास्‍त्री अल्‍पायुषी ठरले. १८ मे १८४६ या दिवशी वयाच्‍या अवघ्‍या ३३ व्‍या वर्षी त्‍यांचे निधन झाले. कोकणातील वनवेश्‍वर येथे इतिहासलेखन करत होते. त्‍या वेळी त्‍यांना ताप येऊन त्‍यांचा मृत्‍यू झाला. त्‍यांच्‍या निधनाची बातमी येताच मुंबई उच्‍च न्‍यायाधिशांनी न्‍यायालयाचे कामकाज स्‍थगित करून त्‍यांना मानवंदना दिल्‍याची नोंद आहे. ‘जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नही ।’, ही म्‍हण आपल्‍या अल्‍पायुषी कारकीर्दीत कामाचा प्रचंड डोंगर उभारून बाळशास्‍त्री यांनी खरी केली. बाळशास्‍त्री यांचे कार्य अफाट आहे; परंतु ते पुढे दुर्लक्षितच राहिले. ‘दर्पण’मुळे ते थोडेफार चर्चेत आले अन्‍यथा त्‍यांच्‍या विविधांगी कार्याची नोंद भारतीय जनतेने फारशी घेतलेली दिसत नाही.

(साभार : सामाजिक संकेतस्‍थळ)