प्रत्येकाला रात्री फिरणे सुरक्षित वाटले पाहिजे, अशी व्यवस्था सरकारने निर्माण करावी !  

केरळ उच्च न्यायालयाने केरळ सरकारला फटकारले

विद्यार्थिनींना नाही, तर पुरुषांनाच कुलूपबंद ठेवायला हवे ! – उच्च न्यायालयाचे मत

कोची (केरळ) – कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना त्यांना रात्री साडेनऊ वाजल्यानंतर वसतीगृहातून बाहेर जाण्यास आणि आत येण्यास मनाई करण्यात आली होती. याविरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना केरळ उच्च न्यायालयाने ‘साडेनऊची संचारबंदी केवळ विद्यार्थिनींसाठीच का लागू करण्यात आली आहे ? राज्यातील एखाद्या मुलांच्या वसतीगृहात अशी बंदी आहे का ? वास्तवात समस्या निर्माण करणार्‍या पुरुषांनाच कुलूपबंद ठेवायला हवे’, असे नमूद करत राज्य सरकारला निर्देश दिले.

‘रात्री घाबरण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाला रात्री फिरणे सुरक्षित वाटले पाहिजे, अशी व्यवस्था सरकारने निर्माण करावी’, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला फटकारले.

संपादकीय भूमिका

रामराज्यात रात्री अंगावर दागिने घालून महिला फिरू शकत होत्या; मात्र आताच्या काळात दिवसाही अशा प्रकारे महिला फिरू शकत नाहीत. ही स्थिती धर्माचरणी शासनकर्ते आणि प्रजा यांचे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !