छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती शिकवली गेली असती, तर अफझल गुरु जन्मला नसता ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, राष्ट्रीय व्याख्याते आणि हिंदुत्वनिष्ठ पत्रकार

श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

ठाणे, १ डिसेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे कौशल्य, त्यांची युद्धनीती काय होती ? हे आपल्याला शिकवले जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी हिंदु राष्ट्राची भाषा केली. ‘आतंकवाद कसा संपवायचा असतो ?’ हे त्यांनी अफझलखानाचा कोथळा काढून दाखवून दिले. आज विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांची युद्धनीती शिकवण्याची आवश्यकता आहे. जर मुलांना ही युद्धनीती वेळीच शिकवली असती, तर अफझल गुरु जन्माला आला नसता. आपले दुर्दैव आहे की, राजकारण्यांनी आपल्याला निधर्मीवादाच्या नावाखाली खर्‍या इतिहासापासून लांब ठेवले. इतिहास त्याच्यासाठीच असतो की, ज्याच्यातून आपण शिकून चुका सुधारू शकतो. जो इतिहासातून शिकत नाही, तो इतिहासजमा होतो, हे लक्षात ठेवावे, असे वक्तव्य राष्ट्रीय व्याख्याते आणि हिंदुत्वनिष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी कल्याण येथे एका कार्यक्रमात केले.

येथील शिवप्रताप फाऊंडेशनच्या वतीने शिवप्रतापदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ बोलत होते. या कार्यक्रमात कल्याण येथील सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे मठाधिपती सद्गुरु श्री नवनीतानंद (गुरुवर्य पू. मोडक महाराज), स्थानिक आमदार गणपत गायकवाड आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी अफझलखानाच्या वधावरील लघुनाटिका आणि पोवाडा सादर करण्यात आला. या वेळी भोसरी येथील आमदार महेश लांडगे आणि शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू चौधरी यांना ‘हिंदु शौर्य पुरस्कार’ घेऊन गौरवण्यात आले.

पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ या वेळी म्हणाले,

१. आज ‘मी भला आणि माझे घर भले’ या भूमिकेमध्ये समाज अडकला आहे; मात्र आज आतंकवाद आपल्या घराघरापर्यंत येऊन पोचला आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे श्रद्धा वालकर हिचे हत्याप्रकरण आहे. अशा अनेक मुली लव्ह जिहादला बळी पडल्या आहेत. याचे गांभीर्य ओळखून हा आतंकतवाद संपवण्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करायला पाहिजे. कोणीतरी येईल आणि माझ्यासाठी प्रयत्न करेल, असे होणार नाही. प्रत्येकाने राष्ट्रासाठी वेळ द्यायला हवा. आतंकवाद हा पळून जाऊन संपत नसतो त्याला सामोरे जाऊनच संपवावा लागतो.

२. हिंदु समाज जातीपाती, पक्ष आणि संप्रदाय यांच्यात अडकला आहे. सर्वांनी ‘हिंदु’ म्हणून एकत्र यायला हवे. जेव्हा समाज त्यांचा ‘अजेंडा’ बदलतो, तेव्हा सत्ता चालवणार्‍यांना त्याची नोंद घ्यावी लागते. स्वतःला हिंदुत्वनिष्ठ म्हणणार्‍या शिवसेनेने ‘अजान स्पर्धा’ भरवणे चालू केल्यानंतर त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. ज्या दिवशी भारतातील सनातनी एकत्र येऊन त्यांच्या शक्तीचे प्रदर्शन करतील, तेव्हा सत्ताकेंद्र तुमच्यासमोर नतमस्तक होईल, हे लक्षात ठेवून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.