वीज वितरण आस्थापनाला ९ लाख रुपये हानीभरपाई देण्याचा ग्राहक न्याय मंचाचा आदेश !

शेतकर्‍यांची वीज खंडित केल्याचे प्रकरण

नाशिक – सिन्नर तालुक्यातील २ शेतकर्‍यांनी वीज वितरण आस्थापनाला धडा शिकवला आहे. वेळेत वीजजोडणी न केल्याने शेतकर्‍यांच्या शेतीची हानी झाली होती. या प्रकरणी शेतकरी मधुकर ठोंबरे आणि विलास देवळे यांनी ग्राहक न्याय मंच न्यायालयात तक्रार प्रविष्ट केली. त्यावरून वीज वितरण आस्थापनाला ग्राहक न्यायमंचाने ‘९ लाख रुपयांची हानीभरपाई शेतकर्‍यांना द्यावी’, असा आदेश दिला आहे. यामध्ये वीज वितरण आस्थापनाला पिकांच्या हानीपोटी १ लाख रुपये आणि घरगुती अन् कृषीपंप यांची वर्ष २०१६ ते २०१७ या काळात वीजजोडणी न दिल्याने प्रतिदिन १ सहस्र २०० रुपये प्रमाणे ७ लाख ९२ सहस्र रुपये द्यावे लागणार आहेत. मधुकर ठोंबरे आणि विलास देवळे हे दोन्ही शेतकरी नियमित वीजदेयक भरणारे आहेत.