भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी जनमानस जागृत होणे आवश्यक ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

हिंदु सेवा परिषदेच्या वतीने आयोजित व्याख्यानमाला

हिंदु सेवा परिषदेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत मार्गदर्शन करतांना श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी आणि व्यासपिठावर उपस्थित संत, मान्यवर

जबलपूर (मध्यप्रदेश) – हिंदु संस्कृती आणि सभ्यता टिकवून ठेवण्यासाठी देशव्यापी जनजागृती चालू आहे. तलवारीच्या बळाला लेखणीच्या जोरावर हरवता येऊ शकते; पण तेवढेच पुरेसे नाही, तर राजकीय आणि सामान्य जनमानस यांची शक्ती बनवून आपल्याला न्यायाची लढाई लढावी लागणार आहे. हा देश पुन्हा हिंदु राष्ट्र व्हावा, असे भारतीय युवकांना वाटते; पण त्यासाठी जनमानस जागृत होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांनी केले. ‘हिंदु सेवा परिषदे’च्या वतीने येथील मानस भवन सभागृहात दीपोत्सव आणि व्याख्यानमाला यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी जगद्गुरु स्वामी राघवदेवाचार्य, स्वामी मुकुंद दास, आचार्य धीरेंद्र, स्वामी पगलानंद, हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.

ज्ञानवापीच्या शिवलिंगाची तपासणी वैज्ञानिक पद्धतीने तज्ञांकडून झाली पाहिजे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

हिंदूंच्या विरोधात असलेले अनेक कायदे रहित करण्याची ही लढाई आहे. २७ हिंदु आणि जैन मंदिरे तोडून त्या ठिकाणी मशीद बनवण्यात आली आहे. ती मंदिरे वेळेत मिळवली नाहीत, तर आपली संस्कृती नष्ट होईल. त्यामुळे आपण काशीविश्वनाथ मंदिराची लढाई लढत आहोत. या ज्ञानवापी शिवलिंगाची तपासणी वैज्ञानिकदृष्ट्या तज्ञांकडून झाली पाहिजे. त्याचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण झाल्यावर ते शिवलिंग शिवमंदिराचेच असल्याचे सिद्ध होईल.

हलाल अर्थव्यवस्था भारताच्या विरोधात जिहादला प्रोत्साहन देत आहे ! – विश्वनाथ कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

श्री. विश्वनाथ कुलकर्णी

चीन भारतात त्याची उत्पादने विकून आपला देश आणि सैनिक यांच्या विरोधात षड्यंत्र रचत आहे. त्याचप्रमाणे हलाल अर्थव्यवस्था भारताच्या विरोधात जिहादला प्रोत्साहन देत आहे. हलाल अर्थव्यवस्थेच्या जोरावर देशात आतंकवाद्यांचे काम चालू आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदूने याचा विरोध केला पाहिजे.