धार्मिक भावना दुखवायचा अधिकार कुणी दिला ?

‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांचा ‘आदिपुरुष’वरून प्रश्न !

कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटनिर्मितीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली परंपरेची खिल्ली उडवू नये’ – ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल

नवी देहली – ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची एका झलक पाहूनच सध्या चारही बाजूंनी चर्चा, वाद चालू झाला आहे. वाईट गोष्टी कानावर पडत आहेत. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांसारखे सर्व धर्मग्रंथ हे आपले सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहेत. ते आपल्या मानवी सभ्यतेचा पाया आहेत. ते पालटले जाऊ शकत नाहीत आणि त्यातून त्यात कुठलीही छेडछाड करणे योग्य नाही, असे मत रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत भगवान श्रीराम यांची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल यांनी व्यक्त केले आहे.

‘आजकाल सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा ट्रेंड (प्रथा) चालू झाला आहे. यांना अशा प्रकारे छेडछाड करून आमच्या धार्मिक भावना दुखवायचा अधिकार यांना कुणी दिला ? कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटनिर्मितीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली परंपरेची खिल्ली उडवू नये’, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

(सौजन्य : TIMES NOW Navbharat) 

अरुण गोविल पुढे म्हणाले की,

१. आपल्या धर्मग्रंथांतून आपल्याला संस्कार मिळतात, जगण्याचा आधार मिळतो. आपला हा वारसा आपल्याला जगण्याची कला शिकवतो. आपली संस्कृती ही जगातील सर्वांत जुनी संस्कृती आहे. अशा स्थितीत छेडछाड केल्यास धार्मिक भावना दुखावल्या जातात.

२. अडीच वर्षांपूर्वी जेव्हा कोरोना आला, तेव्हा आपल्या धार्मिक श्रद्धा दृढ झाल्या आहेत. एवढेच नाही, तर कोरोनाच्या काळात पुन्हा एकदा ‘रामायण’चे प्रक्षेपण चालू झाले, तेव्हाही त्याने विश्वविक्रम केला होता. आपल्या आजच्या तरुण पिढीने ३५ वर्षांपूर्वी साकारलेले रामायण पूर्ण श्रद्धेने पाहिले.

३. कुठल्याही प्रकारे आपल्या या परंपरेत पालट करता कामा नये. मीही यापुढे जे सत्य आहे, शाश्वत आहे, तेच दाखवायचा प्रयत्न करेन.