(म्हणे) ‘कर्नाटकमधील शैक्षणिक संस्थांमध्ये नमाजपठणासाठी स्वतंत्र खोली द्या !’

शाळांमध्ये श्री गणेशचतुर्थी साजरी करण्याला विरोध करत ‘वक्फ बोर्डा’ची मागणी

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी राज्यातील शाळांमध्ये श्री गणेशचतुर्थी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्याला मुसलमान संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. आता ‘वक्फ बोर्डा’ने विरोध करत शैक्षणिक संस्थांमध्ये नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्र खोली आणि मुसलमानांचे सण साजरे करण्यासाठी अनुमती देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची विद्यार्थी शाखा असणार्‍या कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष आठवुल्ला पुंजालकट्टे यांनी शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे.

स्वातंत्र्यापूर्वीपासून शाळांमध्ये साजरा होत आहे श्री गणेशोत्सव ! – बी.सी. नागेश

शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले होते की, श्री गणेशचतुर्थी हा धार्मिक कार्यक्रम नाही. हा सण लोकांना संघटित करतो. स्वातंत्र्याच्या आधीपासून शाळांमध्ये श्री गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. हे त्या वेळी स्वातंत्र्याच्या आंदोलनातील एक शस्त्र होते. लोकमान्य टिळकांच्या आवाहनानंतर शाळा, वसतीगृहे आणि सार्वजनिक ठिकाणी श्री गणेशोत्सव साजरा करण्यास प्रारंभ झाला. यामुळे आम्ही काही नव्याने याला अनुमती दिली आहे, असे नाही. हा सण परंपरेनुसार चालू आहे; मात्र यामुळे शाळांमध्ये अन्य धार्मिक कार्यक्रमांना अनुमती देण्यात येणार नाही, असेही नागेश यांनी स्पष्ट केले होते.

बी.सी. नागेश यांच्या विधानावरून मुसलमान संघटना त्याला हिजाबशी (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘हिजाबला बंदी, तर श्री गणेशचतुर्थीला अनुमती का ?’, असा प्रश्‍न ते विचारत आहेत.

नमाजपठणासाठी खोली देण्यास श्रीराम सेनेचा विरोध

श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी म्हटले की, आज ‘वक्फ बोर्ड’ शाळांमध्ये नमाजपठण करण्याची मागणी करत आहेत, उद्या ते शुक्रवारची सुटी देण्याची मागणी करतील. त्यामुळे सरकारने शाळांचे इस्लामीकरण करण्याला अनुमती देऊ नये.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्यानंतरच्या आजपर्यंतच्या शासनकर्त्यांनी  अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन केल्याचा हा परिणाम आहे !