सांगली जिल्ह्यात ३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

प्रत्येकाने धर्मासाठी योगदान देणे आवश्यक आहे ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

विश्रामबाग येथे गुरुपौर्णिमा उत्सवात मार्गदर्शन करतांना अधिवक्ता समीर पटवर्धन

सांगली, १५ जुलै (वार्ता.) – मी सनातनच्या संपर्कात आलो आणि मनुष्यजन्माचे सार्थक झाले, असे मला वाटते. सनातनच्या साधकांवर विविध ठिकाणी खटले चालू आहेत; मात्र या सर्वांतून ते निर्दाेष सुटतील, याची आम्हाला निश्चिती आहे. धर्मविरोधकांच्या विरोधात साधक आणि मलाही लढण्यासाठी श्रीकृष्ण अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच बळ मिळते. प्रत्येकाने धर्मासाठी योगदान देणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणत्याही कायदेशीर मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केले. ते विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.

विश्रामबाग येथे गुरुपौर्णिमा उत्सवात मार्गदर्शन करतांना अधिवक्ता समीर पटवर्धन आणि उपस्थित जिज्ञासू

येथे सकाळी झालेल्या उत्सवात पू. राजाराम नरुटे यांची वंदनीय उपस्थिती होती, तर सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपचे नगरसेवक लक्ष्मण नवलाई उपस्थित होते. येथे १८० जिज्ञासू उपस्थित होते.

विश्रामबाग येथे गुरुपौर्णिमा उत्सवात ग्रंथदर्शन पहातांना उपस्थित जिज्ञासू
विश्रामबाग येथे गुरुपौर्णिमा उत्सवात अभिप्राय लिहितांना भाजप नगरसेवक श्री. लक्ष्मण नवलाई

विशेष – सोहळ्यानंतर ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादने यांच्या कक्षाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद लाभला.


सध्या हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर विविध आघात होत असून प्रत्येकाने त्यांचा यशाशक्ती प्रतिकार केला पाहिजे ! – ओंकार शुक्ल, भाजप

मिरज येथील दत्त मंगल कार्यालय येथे आयोजित उत्सवात बोलतांना श्री. ओंकार शुक्ल

मिरज – पूर्वी आपल्या देशात गुरुकुल परंपरा होती. ही परंपरा इंग्रजांनी बंद पाडली, तसेच हिंदूंमध्ये भेदभाव आणि जातीभेद निर्माण करून हिंदूंना त्यांच्या संस्कृतीपासून विभक्त केले. स्वातंत्र्य मिळाल्यावरही पुरोगामी, डाव्या विचारसरणीचे लोक यांनी हा ठेवा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अशा स्थितीत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवली आहे. सध्या हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर विविध आघात होत असून प्रत्येकाने त्यांचा यशाशक्ती प्रतिकार केला पाहिजे, असे आवाहन ‘भाजप सांस्कृतिक आघाडी’चे प्रदेश उपाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल यांनी केले. ते मिरज येथील दत्त मंगल कार्यालय येथे आयोजित उत्सवात बोलत होते. येथे २२५ जिज्ञासूंची उपस्थिती होती.

विशेष

१. सोहळा संपेपर्यंत सर्व जिज्ञासू कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. येथे प्रतिष्ठित आणि मान्यवर यांची उपस्थिती अधिक होती.

२. सर्वांनी एकाग्रतेने मार्गदर्शन ऐकले, तसेच सोहळा झाल्यावर तिघा जिज्ञासूंनी साधकांना भेटून ‘अध्यात्मप्रसारासाठी वेळ देऊ’, असे सांगितले.

उपस्थित मान्यवर

समर्थभक्त श्री. चंद्रशेखर कोडोलीकर, व्यापारी सेनेचे श्री. पंडिततात्या कराडे, उद्योजक श्री. दिगंबर कोरे आणि श्री. वसंत कुमार शेट्टी, अधिवक्ता सी.ए. पाटील


तासगाव येथील वीरशैव मंगल कार्यालय येथे उपस्थित जिज्ञासू
तासगाव येथील वीरशैव मंगल कार्यालय येथे मार्गदर्शन करतांना रणरागिणी शाखेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन
तासगाव येथील वीरशैव मंगल कार्यालय येथे मार्गदर्शन करतांना कु. प्रतिभा तावरे

तासगाव – वीरशैव मंगल कार्यालय येथे झालेल्या सोहळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे आणि रणरागिणी शाखेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन यांनी मार्गदर्शन केले. येथे २०० जिज्ञासू उपस्थित होते.