इंद्रायणीचे पाणी दूषित झाल्याने वारकऱ्यांनी ते न वापरण्याचा आळंदी नगरपरिषदेचा आदेश !

पुणे – येथील इंद्रायणी नदीत गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पाण्यात विषारी फेसाचा जाड थर आला आहे. नदीचे पाणी दूषित झाल्याने ‘नदीचे पाणी पिऊ नका’, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. पालखी प्रस्थान सोहळा २१ जून या दिवशी आळंदीत झाला. राज्यातून भाविक आणि वारकरी आळंदीत आले आहेत. ते इंद्रायणी नदीत स्नान करतात, अनेक वारकरी या नदीचे पाणी पितात, यामुळे वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या पाण्यात स्नान करणे, तर लांबच हातपायही धुणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आम्ही विशेष आदेश काढला आहे, असे आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले आहे.

आळंदी शहराला भामा आसखेड धरणाचे पाणी येते, इंद्रायणी नदीचे पाणी गावकऱ्यांना येत नाही. त्यामुळे वारकऱ्यांनी विहीर, तसेच नदीतील पाणी पिऊ नये. त्या व्यतिरिक्त नळाचे किंवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सोय असेल, तरच पाणी प्यावे, अशा सूचना आळंदी नगरपरिषदेकडून देण्यात आल्या आहेत. नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू असल्याचे जाधव यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळणारे जिल्हा प्रशासन ! पिंपरी पालिकेच्या हद्दीतील सांडपाणी, तसेच रसायनमिश्रीत पाणी थेट नदीत सोडण्यात येते. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे, ही जुनीच तक्रार आहे. प्रशासनाने आषाढी एकादशीपूर्वी चंद्रभागा नदीची तातडीने स्वच्छता का केली नाही ? हे समजले पाहिजे. यामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !