भारतातील सर्वाधिक युवावर्गाची जडणघडण, हे राष्ट्रीय दायित्वच !

विशेषांकाचे प्रयोजन

जागतिक आकडेवारीनुसार जगातील देशांमध्ये सर्वाधिक तरुणवर्ग हा भारतात आहे. त्यातही महाविद्यालयात शिक्षण घेणारा वर्ग अधिक आहे. भारतासारख्या विविध संस्कृती, भाषा, चालीरिती असणाऱ्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात असणारी युवाशक्ती ही देशासाठी अत्यंत लाभदायक आहे. भारतात सध्या भ्रष्टाचार, लाचखोरी, महिलांवरील अत्याचार, हिंदूंवरील आक्रमणे, लव्ह जिहाद असे अनेक गंभीर प्रश्न अस्तित्त्वात आहेत. हे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी युवा पिढी भरीव योगदान देऊ शकते. त्या दृष्टीने त्यांची जडणघडण करणे हे राष्ट्रीय दायित्व आहे; मात्र युवावर्गाला दिशा देण्यासाठी प्रस्थापित शिक्षणव्यवस्था तोकडी आहे. प्रस्थापित शिक्षणव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात पालट करून त्यात आदर्श आचार आणि विचार शिकवणारे धर्मशिक्षण अंतर्भूत करणे, ही आवश्यकता आहे. ते कार्य शासनकर्त्यांनी मनावर घेतल्यास केवळ शिक्षणव्यवस्थाच नव्हे, तर देशाचाच कायापालट होणार आहे. सर्वाधिक युवावर्ग असणाऱ्या देशाच्या शासनकर्त्यांनी ते मनावर घेणे आवश्यक !

जीवघेणी स्पर्धा, झटपट पैसा कमावणे, महागड्या गाड्या, असात्त्विक केशभूषा आणि वेशभूषा, ‘डे’ साजरे करणे, ‘पार्ट्या’, ‘विकेंड’ साजरे करणे, भ्रमणभाषचा दुरुपयोग, सेल्फी, अश्लील संकेतस्थळे, पाश्चात्त्य संगीत आणि त्याचे कार्यक्रम, चित्रपट आणि चित्रपटसंगीत, पब, सिगारेट, तंबाखू, मद्यपान, अमली पदार्थ आणि आत्महत्या या अंधःकाराच्या खोल खाईत लोटणाऱ्या सर्व गोष्टींना आजचा युवक अन् युवती बळी पडल्या आहेत !