दावा खरा असेल, तर मुसलमानांनी ज्ञानवापीची जागा हिंदूंना द्यावी !

समाजवादी पक्षाच्या नेत्या रुबीना खानम यांचे आवाहन !

ज्ञानवापी मशीद

नवी देहली -जर ज्ञानवापी मशीद पूर्वीचे मंदिर होते, हा हिंदूंचा दावा सिद्ध झाला, तर मुसलमान समाज आणि त्याचे धार्मिक नेते यांनी ती जागा हिंदूंना परत केली पाहिजे. कह्यात घेतलेली भूमी, बळकावलेली भूमी आणि बळाच्या आधारे मिळवलेली भूमी यांवर नमाजपठण करणे इस्लाममध्ये अयोग्य म्हटले आहे, हे मुसलमान समाज आणि धार्मिक नेते यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच ही भूमी हिंदूंची असल्याचे सिद्ध झाल्यास ती हिंदूंना देण्यात यावी, असे आवाहन समाजवादी पक्षाच्या नेत्या रुबीना खानम यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून केले आहे.

खानम यांनी पुढे म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी आणि दावा खरा निघाल्यास ती भूमी हिंदूंना द्यावी; मात्र दावा खोटा असल्यास हिंदु पक्षाने शांततापूर्ण मार्गाने ही भूमी मुसलमान समाजाला मशिदीसाठी द्यावी.

रुबीना खानम यांनी पूर्वी केलेली आक्षेपार्ह विधाने

रुबीना खानम यांनी यापूर्वी ‘जर कुणी आमच्या हिजाबवर हात टाकेल, तर आम्ही त्याचे हात तोडू’, असे विधान केले होते. तसेच ‘मुसलमान समाजाला भडकावण्याचा प्रयत्न करू नका. जर असे झाले तर सर्व मुसलमान महिला मंदिरांबाहेर बसून भोंग्यांवरून कुराणाचे पठण करतील’, असे विधान केले होते. यांमुळे त्यांच्या विरोधात तक्रारही करण्यात आली होती.

दावा खराच आहे आणि हा इतिहास आहे, त्यामुळे मुसलमानांनी तात्काळ ही भूमी हिंदूंना स्वतःहून द्यावी ! – संपादक