कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे भारतात औषधांचा तुटवडा !

चीनमधील कोरोनाच्या उद्रेकाचा परिणाम !

मुंबई – चीनमध्ये औषधांसाठीचा सर्वाधिक स्वस्त कच्चा माल मिळतो. भारतीय औषधनिर्मिती आस्थापने तो माल चीनच्या शांघायमधून खरेदी करतात; पण तेथे सध्या कोरोनाचा उद्रेक झाल्याने कच्च्या मालाची बाजारपेठ थंडावली आहे. त्याचा फटका भारतासह आशियातील इतर देशांनाही बसला आहे. ज्या औषध आस्थापनांकडे आधीच्या मालाचा साठा आहे, ते औषध दुकानांना पुरवठा करतात. पालिका रुग्णालयात औषध उपलब्ध असेल, तर ते रुग्णांना विनामूल्य दिले जाते; पण ते नसल्यास बाहेरून विकत आणण्याविना पर्याय नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ‘गेल्या काही मासांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीही वाढ होत असल्याने त्याचा परिणाम औषधांची खरेदी आणि किंमती यांच्यावर झाला आहे’, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे ती बाहेरून विकत आणावी लागतात. औषधखरेदीसाठी निविदा मागवण्यात ७-८ मासांचा कालावधी लागतो. रुग्णांची परवड होत आहे, याविषयी काँग्रेस नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र पाठवले आहे. यासंदर्भात अधिक चौकशी केल्यावर संबंधित अधिकाऱ्याने वरील उत्तर दिले.

संपादकीय भूमिका 

पुढील आपत्काळात औषधेच मिळणार नाहीत, याविषयी अनेक संत वारंवार सांगत आहेत. लोकहो, अशा स्थितीला सामोरे जाण्यास तुम्ही सिद्ध आहात का ?