रंग खेळतांना योग्य ती काळजी न घेतल्यास होऊ शकते मोठी हानी !

२२.३.२०२२ या दिवशी ‘रंगपंचमी’ आहे. त्या निमित्ताने…

१. ‘आपण रंगाने भिजण्यापूर्वी शरिरावर तेल किंवा इतर तेलकट पदार्थ (क्रीम वगैरे) लावावे.

२. केस आणि तोंड धुतांना डोळे बंद ठेवले पाहिजेत. त्यामुळे रंग डोळ्यांत जाणार नाही.

३. रंग खेळतांना डोळ्यांमध्ये ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ घातल्या असतील, तर डोळ्यांना हानी पोचू शकते.

४. आधुनिक वैद्य (डॉक्टर) लोकांना रंग खेळण्यासाठी केवळ नैसर्गिक (ऑर्गेनिक) रंगांचा उपयोग करण्यास सांगतात. रंगपंचमी खेळतांनाही त्यांनी हेच सांगितले आहे. बाजारात रासायनिक (केमिकल) आणि नैसर्गिक दोन्ही प्रकारचे रंग उपलब्ध असतात.

५. उपचारतज्ञ आणि पर्यावरणतज्ञ यांचे म्हणणे आहे की, लोकांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याच्या दृष्टीने केवळ नैसर्गिक रंगच वापरले पाहिजेत.

६. देहलीतील शालीमार बाग येथील ‘फोर्टिस’ रुग्णालयात त्वचाविकार विभागाचे वरिष्ठ सल्लागार श्री. नरेश भार्गव यांनी म्हटले आहे, ‘रासायनिक रंग त्वचेला हानी पोचवू शकतात. त्यामुळे त्वचेला खाज येणे, लाल चट्टे येणे, सूज येणे इत्यादी तक्रारी निर्माण होऊ शकतात. या रंगांमुळे डोळ्यांनासुद्धा हानी पोचू शकते. यामुळे डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे अन् डोळ्यांतून पाणी येणे इत्यादी समस्या होऊ शकतात. रासायनिक रंगांमुळे केसांचीही हानी होऊ शकते.’

७. रंगांमध्ये काचसुद्धा मिसळली जाते. ती त्वचेला हानी पोचवू शकते.

८. शरिराला लागलेला रंग धुऊन काढण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी कोमट पाणीच वापरले पाहिजे.

– हेमा गिरि (साभार : मासिक ‘अक्षय प्रभात’, मार्च २०१९)