भाववृद्धी सत्संग चालू झाल्यापासून केलेल्या प्रयत्नांमुळे साधिकेत झालेले पालट

सौ. मीना कदम

१. ‘साधकांची स्थिती काय आहे ?’, हे त्यांच्या स्थितीला जाऊन अनुभवण्याचा प्रयत्न होणे आणि देवाने अडचणींवर उपायही सुचवणे : ‘आधी ‘गुरुदेवांनी माझ्यासाठी काय काय केले ?’, ते आठवून माझ्याकडून भावजागृतीचे प्रयत्न व्हायचे. भाववृद्धी सत्संग चालू झाल्यापासून साधकांसाठी गुरुमाऊली जे जे करते, ते सर्व बघून आणि अनुभवून मला गुरुमाऊलीप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते अन् ‘सर्व साधक माझे गुरुबंधू आहेत’, असे वाटते. प्रारंभी साधकांकडून चुका झाल्यावर माझे मन पुष्कळ अस्वस्थ व्हायचे आणि मनात अपेक्षाही असायच्या. आता ‘साधकांची स्थिती काय आहे ?’, हे त्यांच्या स्थितीला जाऊन अनुभवण्याचा प्रयत्न होतो. देव त्यांच्या अडचणींवर उपायही सुचवतो. आता ‘गुरुमाऊली साक्षात् विष्णुस्वरूप असून आपली प्रत्येक चूक सुधारण्याची संधी देत असते’, असा माझा भाव असतो.

२. ‘भगवंतच पुढच्या टप्प्याला घेऊन जाण्यासाठी साहाय्य करत आहे’, असा भाव ठेवणे आणि चुका सांगितल्यावर त्या सुधारण्यासाठी प्रयत्न होणे : प्रारंभी उत्तरदायी साधक आणि माझे यजमान यांनी माझ्याकडून चूक झाल्यावर ‘मला समजून घ्यावे’, असे वाटत होते. आता ‘भगवंतच मला पुढच्या टप्प्याला घेऊन जाण्यासाठी साहाय्य करत आहे’, असा भाव ठेवून ते जे सांगत आहेत, ते समजून घेऊन चूक सुधारण्यासाठी प्रयत्न होतात. आधी मला त्रास होत असतांना यजमानांनी त्यांच्या साधनेसाठी काही साहाय्य मागितले, तर माझी चिडचिड व्हायची. आता स्वतःचा त्रास बाजूला ठेवून यजमानांना प्राधान्य देऊन त्यांना साहाय्य केले जाते आणि माझा त्रास न्यून होतो.

३. कर्तेपणाचे आणि अयोग्य विचार आल्यावर पुष्कळ खंत वाटून क्षमायाचना करणे अन् अपेक्षांचे प्रमाण पुष्कळ न्यून होऊन घरातील वातावरण शांत वाटणे : कर्तेपणा किंवा अयोग्य विचार मनामध्ये आल्यावर स्वतःची चूक पहाण्याचे प्रमाण यापूर्वी अल्प असायचे. आता कर्तेपणाचे आणि अयोग्य विचार मनात आल्यावर पुष्कळ खंत वाटून क्षमायाचना केली जाते. कर्तेपणाचे विचार मनात आल्यावर ‘देवा, असे पाप माझ्याकडून होऊ देऊ नकोस’, अशी देवाला पुनःपुन्हा क्षमायाचना करते. पूर्वी घरात मी किंवा यजमान आजारी पडल्यावर आमची एकमेकांकडून अपेक्षा असायची. ‘यजमानांनी माझी विचारपूस करावी’, असे मला वाटायचे आणि त्यांना समजून घेण्याचा भागही अल्प असायचा. त्यामुळे यजमानांची पुष्कळ चिडचिड व्हायची. घरात दाब जाणवायचा. आता एकमेकांना समजून घेऊन साहाय्य केले जाते. आता अपेक्षांचे प्रमाण पुष्कळ न्यून झाले असून घरातील वातावरण शांत वाटते.’

– सौ. मीना कदम (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), विशाखापट्टणम् (जानेवारी २०१७)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक