‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मनात मृत्यूविषयी येणार्‍या विचारात एका दिवसात पालट होण्याची आध्यात्मिक कारणे’ या लेखाचा पहिला भाग वाचून श्री. माधव भातखंडे यांच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया

१८.२.२०१८ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या मनात मृत्यूविषयी येणार्‍या विचारात एका दिवसात पालट होण्याची आध्यात्मिक कारणे’ या संदर्भात ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांचा त्या संदर्भातील लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाच्या समवेत धर्माच्या अभ्यासकांना विनंती केली होती की, ‘ते ज्ञान योग्य कि अयोग्य ?’, यासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन केल्यास मानवजातीला नवीन योग्य ज्ञानाचा लाभ होईल. दादर, मुंबई येथील श्री. माधव भातखंडे यांनी या लेखामध्ये लिहिलेल्या काही संज्ञांच्या अर्थाशी निगडित असलेला आणि त्यांना समजलेला विषय सारांशरूपाने पुढे दिला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरूंच्या विचारांमध्ये सत्यकथन असल्यामुळे ते साधकांना सर्वार्थाने साधनेमध्ये पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक असणे

‘परात्पर गुरूंच्या विचारांचा अभ्यास केल्यामुळे साधकांना कोणता लाभ होतो ?’, या संदर्भात विचार केल्यावर लक्षात आले की, परात्पर गुरूंच्या विचारांमध्ये सत्यकथन असते. ते केवळ त्यांचे मत नसते, तर त्यामध्ये साधकांना साधनेमध्ये सर्वार्थाने पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन असते.

वरील सारणीवरून परात्पर डॉ. आठवले यांच्या विचारांची कारणे शोधण्याचे महत्त्व लक्षात येते. त्यांच्या मनातील विचार ईश्वराकडून येतात; म्हणून त्यांच्या मनात येणारे विचार, हे विचारात घेण्यासारखे आणि समष्टीला लाभदायक असतात.’

– श्री. माधव भातखंडे, दादर, मुंबई.  (वर्ष २०१८)

श्री. माधव सीताराम भातखंडे यांचा परिचय

श्री. माधव भातखंडे

दादर, मुंबई येथील श्री. माधव भातखंडे (वय ७३ वर्षे) हे गेल्या १५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि ज्ञानाचे अभ्यासक आहेत. ३१.३.२००९ या दिवशी, म्हणजे वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी सनदी लेखपाल (CA) या व्यवसायातून स्वेच्छानिवृत्ती घेतली.

सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज (नगर) आणि सद्गुरु ताई महाराज (जालना) यांच्या झालेल्या प्रत्यक्ष भेटींमध्ये त्यांना त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ झाला. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले (गोवा), स्वामी शिवोम् तीर्थ (इंदूर), स्वामी अडगडानंद (चित्रकूट) इत्यादी महान विभूतींच्या विविध ग्रंथांद्वारेही त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ झाला.

ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखाविषयी वाचक आणि ज्ञानाचे अभ्यासक श्री. माधव भातखंडे यांनी दिलेला अभिप्राय, विचारलेले प्रश्न अन् त्यांची ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाने दिलेली उत्तरे

१८.२.२०१८ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात मृत्यूविषयी येणार्‍या विचारांत एका दिवसात पालट होण्याची आध्यात्मिक कारणे’, या लेखाविषयी वाचक आणि ज्ञानाचे अभ्यासक श्री. माधव भातखंडे यांनी मला पुढील  अभिप्राय कळवला.

श्री. राम होनप

१. अभिप्राय

अ. हा लेख मी वाचला. त्यात परात्पर गुरु डॉक्टरांची आध्यात्मिक अवस्था दिली असून त्याचे तुम्ही ईश्वरी ज्ञानाद्वारे आध्यात्मिक विश्लेषण केले आहे. त्यापूर्वी मी अन्य एका संतांचा ग्रंथ वाचला आहे. त्या संतांची आणि परात्पर गुरु डॉक्टरांची आध्यात्मिक स्थिती सारखीच आहे. त्या ग्रंथात दिलेली अन्य संतांची आध्यात्मिक अवस्था आणि त्याचे विश्लेषण अन् तुम्ही दिलेला लेख यांतील शब्द भिन्न आहेत; पण अर्थ एकच आहे. दोन्ही लिखाणांत बरेच साम्य आहे. लेख वाचून मला आनंद झाला.

आ. आपल्या लेखात अध्यात्मातील पुढील पाच अवस्था दिल्या आहेत, ‘जीवदशा, जीवात्मादशा, शिवदशा, शिवात्मादशा आणि पाचवी अवस्था ‘गृहदशा’ दिली आहे. पहिल्या चार अवस्था मला पूर्वी ठाऊक होत्या; पण तुम्ही दिलेली गृहदशेची पाचवी अवस्था नवीन आहे. मी अनेक ग्रंथ वाचले आहेत. त्यांपैकी कुठल्याही ग्रंथात अशी अवस्था दिलेली नाही.

इ. तुमचे ज्ञान अपौरूषेय, म्हणजे ईश्वरीय आहे. हे मिळवणे कठीण असते. तुमचे ज्ञान विलक्षण आहे.

२. श्री. भातखंडे यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाने दिलेली उत्तरे

२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांमधील अंशमाया ही कार्यानुरूप असणे

श्री. भातखंडे : या लेखात ‘परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये देहधारणेपर्यंत ‘अंशमाया’ असणार आहे’, असे म्हटले आहे. मग त्यांना मोक्ष मिळाला आहे का ?

मी : हो. ही अंशमाया शुद्ध असून ती भगवंताच्या कार्यासाठी आहे. या मायेने कुठलीही आध्यात्मिक हानी होत नाही.

२ आ. अंशमाया, म्हणजे योगमाया असणे

श्री. भातखंडे : लेखात दिलेली परात्पर गुरु डॉक्टरांतील अंशमाया, म्हणजे योगमाया का ?

मी : हो.

२ इ. ईश्वरी ज्ञान मिळवतांना बुद्धीचा वापर होत असला, तरी ‘ज्ञान बुद्धीपलीकडील असते’, असे म्हणण्यामागील कारण

श्री. भातखंडे : ‘ईश्वरी ज्ञान मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील आहे’, असे आपण म्हणतो; पण ज्ञान मिळवतांना बुद्धीचा वापर होतोच ना ?

मी : हो. सूक्ष्मातील ज्ञान ग्रहण करणारी बुद्धी ही सर्वसामान्य मानवी बुद्धी नसते. साधनेने ती सूक्ष्म आणि ईश्वरीय बनू लागते. साधकाची प्रज्ञा टप्प्याटप्याने जागृत होते. सामान्य बुद्धी आणि ईश्वरीय बुद्धी यांतील भेद कळण्याच्या दृष्टीने ‘ईश्वरी ज्ञान बुद्धीपलीकडील आहे’, असे आपण म्हणतो.

२ ई. ईश्वरी ज्ञान कळण्यासाठी आवश्यक घटक

श्री. भातखंडे : ‘ईश्वरी ज्ञान किती जणांना कळते’, याचा तुम्ही कधी अभ्यास केला आहे का ?

मी : हो. ज्यांचा आध्यात्मिक ज्ञानाचा अभ्यास आहे, साधक आणि चांगली आध्यात्मिक पातळी असलेले जीव यांना ईश्वरी ज्ञान सहज समजते. इतरांना हे कळायला कठीण जाते.

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.२.२०१८)

श्री. माधव भातखंडे यांची जाणवलेली वैशिष्ट्ये

‘श्री. भातखंडे यांच्याशी भ्रमणभाषवर साधारण १० मिनिटे बोलणे झाले. त्या वेळी त्यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्ये पुढे देत आहे.

१. हे ज्ञानयोगी असून त्यांची साक्षीभावाची स्थिती आहे.

२. त्यांची वृत्ती स्थिर होऊ लागली आहे.

३. श्री. भातखंडे ज्ञानाचा सखोल आणि तटस्थपणे अभ्यास करतात.

४. ती. भाऊकाका (पू. अनंत आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू)) यांच्याशी बोलतांना जसा आपलेपणा जाणवतो, त्याप्रमाणे श्री. भातखंडे यांच्याशी बोलतांना मला आपलेपणा जाणवला.

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, गोवा. (२१.२.२०१८)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक