हिजाब आणि भगवे उपरणे घालून पोचलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी प्रवेश नाकारला !

कर्नाटकातील महाविद्यालयांतील हिजाबचे प्रकरण

  • दलित विद्यार्थ्यांकडून निळे रूमाल घालून मुसलमान विद्यार्थिंनीचे समर्थन

  • मुसलमान विद्यार्थिनींकडून ‘अल्ला हू अकबरचा, तर हिंदु विद्यार्थ्यांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा

‘दलित-मुसलमान भाई भाई’ असे म्हणून साहाय्य करणार्‍यांना दंगलीच्या वेळी धर्मांध ते दलित आहेत; म्हणून सोडतात कि ते ‘हिंदू’ आहेत; म्हणून त्यांच्यावर आक्रमण करतात, हे ते सांगतील का ? – संपादक

उडुपी (कर्नाटक) – येथील महाविद्यालयामध्ये हिजाब घालून येण्याच्या मुसलमान विद्यार्थिनींच्या मागणीचे सूत्र राज्यातील शिवमोग्गा, मंड्या, बागलकोट, बेळगाव, चिकबल्लापुरा, हासन आदी शहरांमध्येही पोचले आहे. आज अनेक महाविद्यालयांमध्ये मुसलमान विद्यार्थिनी हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करण्यासाठी पोचल्या होत्या. त्याच वेळी हिंदु विद्यार्थीही उपरणे आणि विद्यार्थिनी भगव्या ओढण्या परिधान करून महाविद्यालयात पोचल्या होत्या; मात्र सरकारने यापूर्वीच या हिजाब आणि भगवे उपरणे घालून येण्यावर बंदी घातली असल्याने या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे हिंदु आणि मुसलमान दोन्ही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. मुसलमान विद्यार्थिनी ‘अल्ला हू अकबर’ (अल्ला महान आहे), तर हिंदु विद्यार्थी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत होते. मुख्यमंत्री बोम्माई यांनी शांतता राखण्याचे आवाहन करतांना म्हटले की, न्यायालयाच्या निर्णयानंतरच सरकार पुढील पाऊल उचलेल.

१. चिकमगळुरू येथे काही दलित विद्यार्थी मुसलमान विद्यार्थिंनींचे समर्थन करण्यासाठी निळे रूमाल परिधान करून महाविद्यालयात आले होते. त्यांनी हिजाबच्या समर्थनार्थ ‘जय भीम’च्या घोषणा दिल्या.

२. उडुपीतील कुंडापूरमध्ये हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना पीयू सरकारी महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्यात आला; परंतु त्यांना वेगळ्या खोलीत बसवले गेले. त्यांना शिकवले गेले नाही.

३. शिक्षणमंत्री बी.सी. नागेश म्हणाले की, विद्यार्थिनींना गणवेश परिधान करण्याविषयी समजावून सांगण्यात आले आहे. त्या हिजाबवरच अडून आहेत. त्यानंतर त्यांना वेगळ्या वर्गखोलीत बसवण्यात आले; कारण रस्त्यावर या गोष्टीचे प्रदर्शन होणे योग्य नाही. त्यांना वर्गात येऊ दिले जाणार नाही.