बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे बंद महाविद्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ११ संगणक पळवले !

मुख्याध्यापकांची पांघरी पोलीस ठाण्यात तक्रार

बार्शी (जिल्हा सोलापूर) – बार्शी तालुक्यातील नारी येथील सरस्वती विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथील बंद असलेल्या संगणक कक्षाचे कुलूप तोडून चोरांनी ११ संगणकांसह अन्य साहित्य लंपास केले आहे. (राज्यात पोलीस आहेत का ? – संपादक) ही घटना २४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत घडली आहे. प्रभारी मुख्याध्यापक योगेश मारकड यांनी पांघरी पोलीस ठाणे येथे ४ फेब्रुवारी या दिवशी तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सरस्वती विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय गावाबाहेर आहेत. २४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत संगणक कक्ष बंद होते. याचा अपलाभ घेत अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून ही चोरी केल्याचे समोर आले आहे. पुढील अन्वेषण साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ननवरे करत आहेत.