भिंगार (जिल्हा नगर) येथे हनुमान चालिसा लावल्याने धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाला मारहाण !

भिंगार येथील घटनेद्वारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

हिंदूंनो, आणखी किती काळ धर्मांधांकडून मार खाणार आहात ? आतातरी त्यांना धडा शिकवा ! – संपादक 

नगर – येथील द्वारकाधीश कॉलनी, आलमगीर रोड, भिंगार येथे मकरसंक्रांतीच्या निमित्त मुंडे कुटुंबीय घराच्या छतावर ‘हनुमान चालिसा’ ध्वनीक्षेपकावर लावून पतंग उडवत होते. या वेळी ‘हनुमान चालिसा हे धार्मिक गीत का लावले ?’ असे विचारत शोएब, सोहेल आणि आणखी एकजण यांनी मुंडे यांच्या घरात घुसून ध्वनीक्षेपकाची वायर फेकून मुंडे कुटुंबियांना शिवीगाळ, तसेच दमदाटी केली. लाथाबुक्यांनी मारहाणही केली. ही घटना १४ जानेवारी या दिवशी सायंकाळी घडली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शोएब, सोहेल आणि अजून एकजण या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रभावती दशरथ मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांना अटक करण्यात आली.

हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते आणि भिंगारकर शिवसैनिक यांच्यातील एकजुटीचे दर्शन !

या घटनेची माहिती मिळताच माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव आणि जिल्हाध्यक्ष विक्रम अनिल भैय्या राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक सचिन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. विचारपूस करून मुंडे परिवार आणि परिसरातील रहिवाशी यांना धीर दिला. शिवसेनेचे भिंगार शहरप्रमुख सुनील लालबोंद्रे यांना सूचना करून या परिसराला संरक्षण देण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. या वेळी इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते आणि भिंगारकर शिवसैनिक यांची एकजूट पहायला मिळाली.

दोषींवर कारवाई न झाल्यास इतर कोणत्याच धार्मिक स्थळावरील भोंगा वाजू दिला जाणार नाही !

शिवसेनेची चेतावणी

स्वतःचे भोंगे बंद न करता हिंदूंना दमदाटी करणारे धर्मांध ! – संपादक 

‘हिंदूंच्या हनुमान चालिसेला वारंवार विरोध करून दहशत माजवण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत आहेत. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न वारंवार आणि जाणूनबुजून केला जात आहे. नगर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांनी हे समजून घ्यावे. इतर धर्मीय दिवसातून ५-५ वेळा प्रार्थना करतांना कर्णकर्कश आवाजात ध्वनीक्षेपक लावतात. रात्री-अपरात्री भल्या पहाटे या भोंग्यांवरून बांग दिली जाते; पण इतर समाजबांधव कोणतीच तक्रार करत नाहीत, हे सर्र्वांनी समजून घ्यावे. हे प्रकार न थांबल्यास आणि दोषींवर कारवाई न झाल्यास इतर कोणत्याच धार्मिक स्थळावरील भोंगा वाजू दिला जाणार नाही’, अशी चेतावणी नगर शहर शिवसेनेच्या वतीने पत्रक काढून देण्यात आली आहे.