सहजभावात असलेले, इतरांना साहाय्य करणारे आणि संत अन् गुरु यांच्याप्रती भाव असणारे सनातनचे पहिले बालसंत मंगळुरू येथील पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) !

पू. भार्गवराम भरत प्रभु

१. वयाने मोठ्या असलेल्या बालसाधकाशी स्पर्धा लावल्यावर तिच्यात हरणे आणि स्वतःची हार सहजतेने स्वीकारणे

‘एकदा पू. भार्गवराम आणि मंगळूरू येथील कु. चरणदास गौडा (वय ८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५६ टक्के) या दोघांनी सायकल चालवण्याची स्पर्धा लावली. त्या वेळी पू. भार्गवराम मागे राहिले. तेव्हा पू. भार्गवराम चरणदासला म्हणाले, ‘‘मी मोठा झाल्यावर गतीने सायकल चालवायला शिकीन. आता मी लहान असल्यामुळे मी तुला हरवू शकत नाही. तू माझ्यापेक्षा वयाने मोठा आहेस ना !’’ अशा प्रकारे त्यांनी स्वत:ची हार संपूर्णपणे स्वीकारली. ते दोघे जण अनेक वेळा स्पर्धा लावतात आणि पू. भार्गवराम प्रत्येक वेळी मागे रहातात; परंतु त्यांचे वागणे सहजभावातील असते.

२. आपल्या परीने साधकांना सेवेत साहाय्य करून त्यांना प्रोत्साहन देणे

एकदा काही साधक एक-एक जड दगड एका जागेवरून उचलून दुसर्‍या ठिकाणी नेत होते. तेव्हा पू. भार्गवराम यांनी त्यांना साहाय्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना तो दगड उचलता आला नाही. नंतर पू. भार्गवराम यांनी साधकांना पाणी दिले आणि ते म्हणाले, ‘‘गुरुदेव तुम्हाला पुष्कळ शक्ती देतील. तुम्ही सर्व दगड उचलून ठेवू शकता. कुणालाही त्रास होणार नाही.’’ ते साधकांना असे वारंवार सांगून आणि त्यांचा उत्साह वाढवून त्यांना साहाय्य करण्याचा प्रयत्न करत होते.

३. नातेवाइकांच्या मृत्यूच्या प्रसंगात आईला सकारात्मक दृष्टीकोन देणे

माझ्या काकांचे निधन झाल्यावर मला त्यांची आठवण येऊन रडू येत होते. पू. भार्गवराम यांनी मला रडतांना पाहिल्यावर ते मला म्हणाले, ‘‘रडू नकोस. ते देवबाप्पाकडे गेले आहेत. परम पूज्यांनी त्यांना बोलावून घेतले आहे. गुरुदेवांनी आपल्याला आजी, पणजी, वडील आणि अन्य सर्व जण दिले आहेत. त्यामुळे रडायचे नाही.’’ पू. भार्गवराम यांनी दिलेल्या या सकारात्मक दृष्टीकोनामुळे माझ्या मनावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नाहीसे झाले आणि माझे दुःख न्यून झाले.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

एकदा पू. भार्गवराम सायकलवरून पडले आणि त्यांच्या पायाला मार लागला. त्या वेळी त्यांना वेदना होत होत्या. तेव्हा मी त्यांच्याकडे धावत गेले. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘आई, तू घाबरू नकोस. मला काही झाले नाही. गुरुदेवांनी माझे रक्षण केले आहे.’’

– सौ. भवानी भरत प्रभु (पू. भार्गवराम यांच्या आई), मंगळुरू, कर्नाटक. (२५.१०.२०२१)

भक्तीसत्संग ऐकतांना शिकण्याच्या स्थितीत राहून भावजागृतीची अनुभूती घेणारे पू. भार्गवराम !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. ‘पू. भार्गवराम राष्ट्रीय भक्तीसत्संगाच्या वेळी सतर्क राहून त्यातील कथा आणि भावजागृतीचे प्रयोग ऐकतात. त्यांना सत्संगातील काही सूत्रे समजली नाहीत, तर त्याविषयी ते मला त्वरित विचारतात.
२. पू. भार्गवराम राष्ट्रीय भक्तीसत्संगात सांगितलेला भावजागृतीचा प्रयोग करतात. तेव्हा ते आम्हाला त्यांना आलेल्या अनुभूती, उदा. देवीचे दर्शन होणे, सुगंध येणे, शांत वाटणे इत्यादी सांगतात.
३. भक्तीसत्संग संपल्यावर पू. भार्गवराम म्हणतात, ‘‘भक्ती सत्संग का संपला ? मला आणखी ऐकायचे आहे.’’
४. पू. भार्गवराम दुसर्‍या दिवशी भोजनाच्या वेळी मला आदल्या दिवशीच्या भक्तीसत्संगातील कथा पुन्हा सांगायला सांगतात.

‘पू. भार्गवराम एवढ्या लहान वयातही शिकण्याच्या स्थितीत असतात आणि ते सत्संगातून भावजागृतीची अनुभूती घेतात. हे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या कृपेमुळे होत आहे. त्यांनी आम्हाला या दैवी घटनेचे साक्षीदार बनवले आहे’, त्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’ – सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांच्या आई), मंगळुरू, कर्नाटक. (२५.१०.२०२१)

पू. भार्गवराम प्रभु यांचे त्यांच्या पणजी, सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु (वय ८४ वर्षे) यांच्या प्रतीचे प्रेम आणि भाव दर्शवणारी काही उदाहरणे !

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी

‘पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी (सनातनच्या ४४ व्या संत, वय ८४ वर्षे) पू. भार्गवराम यांच्या पणजी (पू. भार्गवराम प्रभु यांचे वडील श्री. भरत प्रभु यांच्या वडिलांची आई) आहेत. ‘पू. भार्गवराम यांच्या जीवनात पू. आजींना प्रथम स्थान आहे’, असे मला जाणवते.

सौ. भवानी भरत प्रभु

१. पू. राधा प्रभुआजी साधकांच्या समवेत नामजप करायला बसतात. त्या वेळी पू. भार्गवरामसुद्धा नामजप करायला बसतात. नामजप संपल्यावर लगेच पू. भार्गवराम पू. आजींच्या चरणांखालील पायथळ आणि चटई (मॅट) तत्परतेने काढून ठेवतात.
२. एकदा पू. आजी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बाहेर जाणार होत्या. तेव्हा पू. भार्गवराम यांनी स्वतः त्यांच्या साडीच्या निर्‍या व्यवस्थित केल्या. ते पाहून आमचा भाव जागृत झाला. ‘एवढ्या लहान मुलाला हे सर्व कसे समजते ?’, याचे पू. आजींना कौतुक आणि आश्चर्य वाटले.
३. घरी काही खाऊ बनवल्यावर तो चविष्ट असेल, तर ‘आजींनी खाऊ खाल्ला आहे ना ?’, असे पू. भार्गवराम विचारतात आणि जर त्यांनी तो खाल्ला नसेल, तर ते लगेच तो खाऊ पू. आजींना देतात.
४. पू. आजींना खोकला आल्यास पू. भार्गवराम धावत जाऊन त्यांना पाणी आणून देतात आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवतात.
५. कधी कधी पू. भार्गवराम खेळतांना खेळणी सर्वत्र पसरून ठेवतात. त्यांना ‘खेळणी आवरून ठेवा’, असे सांगितले, तरी ते तसे करत नाहीत; पण ‘पू. आजींच्या पायांना खेळणी लागतील. ती आवरून ठेवा’, असे त्यांना सांगितल्यावर ‘पू. आजींना काही होऊ नये’, या विचाराने ते सर्व खेळणी आवरून ठेवतात.
६. जेव्हा पू. भार्गवराम यांना नामजपादी उपायांची आवश्यकता वाटत असते, तेव्हा ते पू. आजींच्या समवेत रहातात. ‘पू. आजींच्या सहवासात चैतन्य मिळत असल्याची जाणीव पू. भार्गवराम यांना होत असते’, असे मला वाटते.

पू. आजींमुळे पू. भार्गवराम यांच्यावर चांगले संस्कार होत आहेत. ‘पू. आजींची सेवा आणि त्यांचा आशीर्वाद यांमुळे पू. भार्गवराम अन् माझी आध्यात्मिक प्रगती होईल’, असे मला वाटते. पू. आजींच्या चरणी कृतज्ञता !’

– सौ. भवानी प्रभु (पू. भार्गवराम यांच्या आई), मंगळुरू, कर्नाटक. (२०.४.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक