कोरोनाच्या कालावधीत ११ सहस्र ७१६ उद्योजकांच्या आत्महत्या

स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे ! साधनेमुळे व्यक्तीला जीवनाचे मुख्य ध्येय आणि उद्देश काय आहे, हे लक्षात येते, जीवनात येणार्‍या संकटांकडे तो साक्षीभावाने पाहू शकतो. त्यामुळे अशा गोष्टींचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही अन् तो ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेनेच वाटचाल करत रहातो ! – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली –  कोरोनाचे संकट आणि दळणवळण बंदी यांमुळे यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. वर्ष २०२० मध्ये देशातील एकूण ११ सहस्र ७१६ उद्योजकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारडून संसदेत देण्यात आली. या उद्योजकांपैकी ४ सहस्र २२६ दुकानदार, ४ सहस्र ३५६ व्यापारी आणि ३ सहस्र १३४ जण इतर व्यवसायिक होते. वर्ष २०१९ च्या तुलनेत, म्हणजेच कोरोना संकट येण्यापूर्वीच्या कालावधीची तुलना केल्यास ही आकडेवारी २९ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे.

१. गृह मंत्रालयाने ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’च्या आकडेवारीनुसार दिलेल्या माहितीत वर्ष २०१९ मध्ये ९ सहस्र ५२ उद्योजकांनी आत्महत्या केली, तर २०२० मध्ये ११ सहस्र ७१६ उद्योजकांनी आत्महत्या केली.

२. उद्योजकांनी केलेल्या आत्महत्येचा आकडा हा शेतकर्‍यांनी केलेल्या आत्महत्येच्या तुलनेत अधिक आहे. वर्ष २०२० मध्ये १० सहस्र ६६७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या.