शेतकर्‍यांचा मित्र बळीराजा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे ज्येष्ठ बंधू बलराम !

भाद्रपद शुक्ल पक्ष षष्ठी म्हणजे बलराम जयंतीचा दिवस. शेतकर्‍यांचा मित्र बळीराजा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे ज्येष्ठ बंधू बलराम होय. आपल्याकडे काही जातीयद्वेष्ट्यांनी असुरराज बळी हाच शेतकर्‍याचा मित्र असल्याचे खोटे पसरवले आणि बुद्धीभेद करायचा प्रयत्न केला. बलरामाच्या हाती नांगर आणि मुसळ ही शस्त्रे आहेत. तीच आयुधे शेतकर्‍याची असतात ना ? ‘इडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, हे प्रतिदिन सायंकाळी म्हटले जात असे, केवळ बलीप्रतिपदेच्या दिवशी नव्हे !

डॉ. सच्चिदानंद शेवडे

बलराम हे द्वारकेचे महाराज होते. त्यांच्या काळात द्वारका हे संपन्न नगर होते. ते प्रजेची काळजी घेणारे होते. म्हणून त्यांचे राज्य येवो, ही प्रार्थना केली जात असे; पण आर्य-अनार्य सारखा जगातून विस्मृतीत गेलेला इतिहास आपल्याकडे अद्याप चघळला जातो, त्यातून असे खोटे निपजते. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हे बलराम यांची स्तुती करतांना काय म्हणतात ते बघा, ‘आपले स्वरूप अखिल विश्वमय आहे. आपणच सर्व लोकांचा संहार केल्यावर नारायणरूपात स्थिर रहाता. आकाश आपले मस्तक, जल मूर्ती, पृथ्वी पाय, अग्नि मुख, जीवसृष्टीचा जीवनदायिनी वायू आपला उच्छ्वास आणि चंद्रमा आपले मन आहे. आपले सहस्र मुख, सहस्र शरीर, सहस्र हात-पाय आणि सहस्र नेत्र आहेत. आपण पूर्वकाळात जे दृश्यमान केले, तेच देवता पहात आले आहेत. विश्वात जे काही जाणण्यायोग्य आहे, त्याचे आपणच प्रतिपादन केले आहे. एकमात्र आपल्याला जे तत्त्व माहिती आहे, ज्याला देवतासुद्धा जाणत नाहीत. देवांनासुद्धा आपण पूर्णपणे कळला नाहीत; म्हणून आपल्याला ‘अनंत’ म्हटले जाते. आपणच सूक्ष्म, महान आणि एक आहात. जसा मी संपूर्ण विश्वाचा अंतर्यामी आहे, तसेच आपणही आहात. मी सनातन विष्णु आणि तुम्ही पुरातन शेष आहात. जो मी आहे, तेच तुम्ही आहात आणि जे तुम्ही आहात, तो सनातन विश्वात्मा मीच आहे.’ (संदर्भ : महाभारत – खिलभाग हरिवंश – विष्णुपर्व १४ वा अध्याय)

– डॉ. सच्चिदानंद शेवडे, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली, महाराष्ट्र