परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात आणि सत्संगानंतर जाणवलेली सूत्रे

​‘पूर्वी एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या  सत्संगाचा लाभ मिळाला. या सत्संगाविषयी जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. काळ थांबल्यासारखे जाणवणे

श्री. सागर निंबाळकर

‘जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ‘श्रीमद्भगवद्गीता’ सांगत असतांना काळ थांबला होता’, असे दूरचित्रवाहिनीवरील ‘महाभारत’ मालिकेत पाहिले होते. त्याच प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले सत्संगात मार्गदर्शन करत असतांना ‘मी ते ज्ञान समजून घेत आहे आणि काळ थांबला आहे’, असे मला जाणवत होते. सत्संगात उपस्थित असलेल्यांपैकी कुणालाही वेळेचे भान राहिले नव्हते. संपूर्ण सत्संगात मी आनंदी होतो.

२. विचारांमध्ये सकारात्मकता येणे आणि शिकण्याचा आनंद घेता येणे

परात्पर गुरु डॉक्टर साधकांना चुकांविषयी मार्गदर्शन करतांना माझ्या मनात ‘मला जमत नाही किंवा जमणार नाही’, असा नकारात्मक विचार आला नाही. ‘माझ्यातील स्वभावदोष कसे घालवता येतील ?’, असाच सकारात्मक विचार माझ्या मनात आला. यातून मला शिकण्याचा आनंद घेता आला.

३. साधकांच्या सत्संगात रहायला मिळत असल्याविषयी कृतज्ञता वाटणे

​परात्पर गुरु डॉक्टर किंवा अन्य साधक एखाद्या साधकातील गुण सांगत असतांना ज्या साधकाचे गुण सांगितले जायचे, त्याच्याविषयी मला आतून प्रेम वाटत होते. ‘असा गुणी साधक माझ्या जवळच असतो, त्याच्याशी मला बोलता येते, त्याला भेटता येते’, या विचाराने मला कृतज्ञताही वाटत होती.

४. साधक बसलेल्या बसचे सारथ्य परात्पर गुरु डॉक्टर करत असल्याचे स्वप्न सलग रात्रभर पडणे

हा सत्संग झाल्याच्या रात्री झोपल्यानंतर मला एक स्वप्न पडले. त्यात मला दिसले, ‘एका मोठ्या बसमध्ये सर्व साधक बसले आहेत आणि परात्पर गुरु डॉक्टर ती बस चालवत आहेत. ‘ते आम्हाला कुठे नेत आहेत ?’, हे कुणालाही ठाऊक नव्हते; मात्र सर्व साधक आनंदी होते.’ मध्यरात्री मला जाग आली. तेव्हा  ‘ते स्वप्न होते. झालेल्या सत्संगाचा तो परिणाम असेल’, याची मला जाणीव झाली.

​त्यानंतर झोप लागल्यावर मला दिसले, ‘जेथे मध्येच प्रवास थांबला होता, तेथून पुढे तो प्रवास चालू झाला.’ असे आणखी एकदा झाले. तिसर्‍यांदा ती बस सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे आली. आधी परात्पर गुरु डॉक्टर उतरले. मग आम्ही उतरलो. नंतर भ्रमणभाषचा गजर वाजला.

५. सत्संगात मिळालेले चैतन्य आणि आनंद २ दिवस जाणवणे अन् त्यामुळे शारीरिक दुखण्याची जाणीव न होणे

या सत्संगातून मिळालेले चैतन्य आणि आनंद मला २ दिवस जाणवत होता. मला शांत वाटत होते. या २ दिवसांत माझ्याकडून सेवा मनापासून होत होती. मी सकारात्मक होतो. मला सेवेत नवीन सुचण्याचे प्रमाणही अधिक होते. माझ्या मनाविरुद्ध घडणार्‍या घटनांतही (उदा. साधकांनी चुका लक्षात आणून देणे, सहसाधकाकडून चुका होणे) मी स्थिर होतो.

​‘दोन दिवस मी शारीरिक सेवा (उदा. कपाटे हालवणे, अल्पाहार सेवा करणे) केली होती. त्यामुळे माझ्या ‘छातीत थोडे दुखत आहे’, याची जाणीव मला झाल्यानंतर मी चिकित्सालयात गेलो. दुसर्‍या दिवशी मला तसे मुळीच जाणवले नाही.

​हे गुरुदेवा, आपल्या कृपेमुळे मला या सत्संगाचा लाभ घेता आला आणि चैतन्य मिळाले. त्याविषयी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकटसर्वांनाच येतील असे नाही. – संपादक