‘‘तुमचे योगदान जग कदापि विसरणार नाही !’’

‘परिचारिकादिना’निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून परिचारिकांविषयी गौरवोद्गार !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – तुमचा त्याग आणि समर्पण यांना मानाचा मुजरा आहे. तुमचे हे योगदान जग कदापि विसरणार नाही, अशा शब्दांत राज्यांतील परिचारिकांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गौरव केला. १२ मे या दिवशी असलेल्या ‘परिचारिकादिना’च्या निमित्ताने कोरोनाच्या काळात सेवेत सक्रीय असलेल्या राज्यातील परिचारिकांविषयी मुख्यमंत्र्यांनी गौरवोद्गार काढले.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘परिचारिका-रुग्णसेविका या ‘कोविड योद्ध्या’ आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत त्या आघाडीवर राहून रुग्णसेवेत कष्ट घेत आहेत. स्वत:चे घर, कुटुंब यांचे दायित्व सांभाळून त्यांनी रुग्णसेवेलाच प्राधान्य दिले आहे. आजही त्या डॉक्टर आणि तज्ञ यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे सहस्रावधी रुग्णांना कोरोनाशी लढण्याचे बळ मिळाले आणि बरे होऊन स्वत:च्या कुटुंबात परतता आले.’’